एका कार्यक्रमात नागराज मंजुळे म्हणाले, ‘भाषेत शुद्ध-अशुद्ध असं काही नसतं. ती प्रत्येकाची असते, स्वतंत्र असते.’ पण भाषेच्या शुद्धीकरणाबाबत बोलायचं झालं तर प्रत्येक भाषेचं स्वतःचं एक व्याकरण असतं, शब्दकोश असतो, लहेजा असतो, त्यात सरमिसळ झाली की ती अशुद्ध बनतेच. समजा, वैदर्भीय भाषा तुम्ही मालवणी लहेजात बोललात तर ऐकायला कसं वाटेल? किंवा मालवणी भाषेत नागपुरी शब्द वापरले तर मालवणकर पायताणाने हाणनार नाहीत?
मराठी भाषेचं अस्तित्व धोक्यात आलेले असतानाच प्रमाण आणि बोली भाषेवरून प्रचंड वाद होत आहेत. या वादातून शुद्ध आणि अशुद्ध भाषेचा उगम झाला असावा. प्रमाण भाषा शुद्ध आणि बोली भाषा अशुद्ध असं शहरी भागातील उच्चशिक्षितांना वाटतं. मात्र, शुद्ध आणि अशुद्धचं वर्गीकरण असं न करता तांत्रिकपद्धतीने केल्यास प्रमाण आणि बोली भाषांचा आदर राखला जाईल.
प्रमाण भाषेचे स्वतंत्र नियम आहेत. ते कालानुरूप बदलत गेल्याने जुन्या व्याकरणानुसार नव्या व्याकरणाच्या नियमांत बरेच बदल जाणवतात. पण, बोली भाषांचं तसं नाही. बोली भाषेबाबत जे नियम भाषेच्या जन्मापासून तयार झाले तेच आजतागायत राहिले आहेत. त्यामुळे बोली भाषा सर्वाधिक शाश्वत आणि जुनी आहे. हे नियमच भाषेतील गोडवा टिकवतात, म्हणूनच कोणतीही भाषा शब्दकोश, लहेजा आणि व्याकरण या अलंकारानेच सजते. परंतु, भाषेचे हे नियम पायदळी तुडवले की त्या भाषेचा आत्माच मरतो. अहिराणी, कोंकणी, मालवणी, नागपुरी, वऱ्हाडी, बेळगावी, कोल्हापुरी, कारवारी या बोली भाषा त्या त्या प्रदेशातच जाऊन ऐकण्यात गोडवा आहे. या भाषा कृत्रिमरित्या शिकल्या तरी त्यांचा लहेजा आपल्यात मुरत नाही. कारण बोली भाषांचे संस्कार मुळातूनच जीभेवर रोवले गेले पाहिजेत. जन्मापासूनच बोली भाषांचे उच्चार आपल्या कानावर पडले गेले पाहिजेत. तरच त्यांचा आस्वाद घेता येतो. पण गेल्या काही वर्षांपासून अनेक बोली भाषा मृतावस्थेत आहेत. कित्येक बोली भाषा लोप पावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे.
1961 च्या जणगणनेनुसार भारतात 1652 बोलीभाषा बोलल्या जात होत्या. मात्र द पीपल लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाने 2010 साली केलेल्या सर्वेक्षणात केवळ 780 बोली भाषा शिल्लक राहिल्या. तर, याच सर्वेक्षणातून असंही सिद्ध झालं होतं की 197 भाषांचं अस्तित्व धोक्यात असून 42 भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भाषा प्रवाही राहिली नाही तर ती नष्ट होते हे जगजाहीर आहे. त्यामुळे भाषेचा वापर सुरू राहणं गरजेचं आहे. मात्र प्रमाण भाषेचं वाढलेलं वर्चस्व आणि शिक्षणात झालेली क्रांती यांनी बोलीभाषांना नख लावले आहे.
आधुनिक जीवनशैलीला सामोरे जाताना आपापल्या बोलीचे स्वत्व व सौंदर्य टिकविण्याची आकांक्षा छोट्या छोट्या समुदायांमध्ये कशी पेरायची, हा खरा प्रश्न आहे. बोली भाषांचं जतन करण्याचं दुसरं साधन म्हणजे साहित्य. आज अनेक बोली भाषांचं केवळ मौखिक साहित्य उपलब्ध आहे. लोकसाहित्य, लोककलांमधून बोली भाषांचा प्रचार–प्रसार होत राहतो. मुळातच प्रत्येक बोलीची एक कला असते. त्यातूनच लोककलांचा उगम होतो. मात्र लोककलांना असलेली मागणी कमी होत गेल्याने बोलीभाषांचाही प्रसार कमी झाला. मालवणी, कोकणी, अहिराणी, गोंड, भिली, कोरकू या बोलीभाषांचे लिखित साहित्य उपलब्ध आहे. मात्र यापलीकडे देशभरातील स्थानिक बोलीभाषांचे साहित्य उपलब्ध नसल्याने या बोलीभाषा पुढच्या पिढीसाठी जतन करून ठेवणं कठीण होऊन बसलंय. ‘भाषा नष्ट होणं ही सांस्कृतिक हानी आहे. भाषा लुप्त होण्यानं दंतकथा, खेळ, संगीत, खाण्यापिण्याच्या पद्धती असं सगळंच रसातळाला जातं,’ असं भाषावैज्ञानिक डॉ.गणेश देवी सांगतात. त्यामुळे एक बोली भाषा नष्ट झाल्याने संपूर्ण संस्कृती नष्ट होते हे लक्षात घ्यायला हवे.
प्रत्येक बोली रसाळ असल्याने, बोलीची संस्कृती रंजक असल्याने या बोलींचा अभ्यास आता सुरू आहे. लोकसाहित्य, दलित साहित्य, नागरी साहित्यांसोबतच बोलीभाषेतील साहित्य, बोली भाषांचा अभ्यास सध्या सुरू आहे. आगरी, मालवणी, कोकणी, अहिराणी भाषेचा अभ्यास सुरू आहे. यातूनच कोकणी मुस्लिम बोली थेट द. आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये पोहोचली असल्याचे पुढे आले आहे. मात्र हे काही मोजके अपवाद सोडता अनेक बोली भाषांचा अभ्यास करायचा ठरवला तरी संदर्भ सापडणे कठीण आहे. त्यासाठी शासनस्तरावर ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. बोली भाषांचे जतन, संवर्धन करण्यासाठी आता जर पावले उचलली नाही तर अस्तित्वात असलेल्या बोली भाषाही संपतील. अनेक भाषावैज्ञानिक, भाषाअभ्यासक बोली भाषा टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या अभ्यासाला, त्यांच्या संशोधनाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष दिल्यास उरलेल्या भाषा जगवण्यासाठी आणि संस्कृती टिकवण्यासाठी मदत होईल.