लग्न म्हणजे दोन जीवांचा मेळ. तसेच दोन कुटुंबियांचे एकमेकांशी जोडले जाणारे घट्ट नाते. मार्च एप्रिलसह मे महिन्यात सर्वत्र लग्नसराईचा जल्लोष बघायला मिळतो. मात्र, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू असल्याने देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनमुळे पूर्वनियोजित लग्न सोहळे आणि साखरपुड्याचे नियोजन पूर्णतः फिस्कटले. मात्र, कोरोनामुळे ब्रेक लागलेल्या लग्नसराईला साधारण गणेशोत्सवानंतर पुन्हा सुरुवात झाली. तर दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना ऑफिसमध्ये न बोलवता ’वर्क फ्रॉम होम’ला सर्वाधिक प्राधान्य दिले. त्यामुळे पती-पत्नींना एकमेकांचा सहवास जरी मिळाला तरी काही दिवसांनंतर त्याचे रूपांतर वादात आणि पुढे घटस्फोटापर्यंत पोहचल्याची अनेक प्रकरणे समोर आली.
यंदा कर्तव्य पण जरा लेट
प्रत्येक तरुण-तरुणीच्या आयुष्यातील लग्न हा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, यावेळी अनेकांच्या लग्नांवर कोरोनामुळे विरजन पडले. ऐन लग्नसराईच्या काळात आलेल्या कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे धुमधडक्यात लग्न करण्याचे तरुण-तरुणींचे स्वप्न धुळीस मिळाले. दरवर्षी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात लग्न सराईचा हंगाम सुरू होतो. मात्र, २०२० या वर्षातील मार्चपासून कोरोनाचा कहर सुरू झाला आणि लग्नसराईला कोरोनाचा अडथळा निर्माण झाला. धुमधडाक्यात विवाह पार पाडण्याचे स्वप्न असलेल्या वधु-वरासह त्यांच्या कुटुंबियांचा देखील हिरमोड झाला. अनलॉकच्या प्रक्रियेत ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत प्रशासनाकडून ५० जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळे उरकण्यास परवानगी दिली. त्यामुळे गणेशोत्सवानंतर मोजक्याच मंडळींसोबत विवाह सोहळे उरकण्यात आले. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत लग्न सराईला प्रारंभ झाल्याने यंदा कर्तव्य आहे असे म्हणत इच्छुक वधु-वरासह पालकांनी देखील विवाहाची तयारी केली.
रजिस्टर मॅरेजला सर्वाधिक पसंती
कोरोनामुळे विवाह सोहळ्यावर निर्बंध आल्याने मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांतील विवाहाचे मुहूर्त चुकले. त्यानंतर केवळ ५० व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडण्याचे नियम सरकारतर्फे घालण्यात आले. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी रजिस्टर मॅरेजला पसंती दिली. कोरोनाच्या पाश्वर्र्भूमीवर हा आकडा कमी असला तरी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रजिस्टर मॅरेजला विशेष महत्त्व आले होते. मुंबई शहर व उपनगरातील रजिस्टर लग्नांची संख्या यंदा सुरुवातीपासून कमी झालेली दिसत आहे. मुंबई शहरात गेल्या वर्षी १ हजार २२९ विवाह रजिस्टर पद्धतीने झाले होते. मात्र, कोरोना काळात नोंव्हेबरपर्यंत ४४८ विवाह रजिस्टर पद्धतीने झाले. हीच परिस्थिती उपनगरातील मॅरेज रजिस्टर कार्यालयात दिसून आली. गेल्या वर्षी ३ हजार ४९५ विवाह रजिस्टर पद्धतीने झाले होते. तर यंदा १ हजार ८०६ विवाह रजिस्टर पद्धतीने झाले आहेत. ठाणे दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये तब्बल ४४४ जोडप्यांनी लग्नगाठ बांधल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यासोबतच ठाणे दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात सध्या दिवसाला १० ते १५, तर मुहूर्ताच्या दिवशी २५ ते ३० लग्न होत आहेत.
क्षुल्लक गोष्टींवरून नात्याचे धागे उसवले
कोरोनामुळे संपूर्ण जग ठप्प असल्याने कंपन्यांनी कर्मचार्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय दिला. ज्या घरातील पती-पत्नी नोकरी करत होते त्यांना ‘वर्क फ्रॉम होम’मुळे एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. पण २४ तास सोबत असून १२-१३ तास ऑफिसच्या कामात व्यस्त असल्याने एकमेकांच्या सहवासात जरी असले तरी त्यांना कामाव्यतिरिक्त एकमेकांसोबत वेळ घालवणे शक्य होत नव्हते. परिणामी त्यांच्यात वाद-विवाद होऊ लागले. महिलावर्ग ऑफिसचे काम सांभाळून घरची जबाबदारी पार पाडत होते. मात्र, ऑफिसचे काम झाल्यानंतर घरच्या कामात पतीने मदत करावी, अशी अपेक्षा पत्नींकडून व्यक्त होत होती. मात्र, पतीकडून कोणतीच मदत होत नसल्याने वाद होऊ लागले. त्यातच आर्थिक कारणांवरून भांडणेही होऊ लागली. या जोडप्यांमध्ये प्रौढांपेक्षा तरुण दाम्पत्यामध्ये वाद होण्याचे प्रमाण अधिक आहे.
घटफोस्टाच्या याचिकांमध्ये वाढ
कोरोना दरम्यान कौटुंबिक न्यायालयात दाखल झालेल्या घटस्फोटाच्या याचिकांची संख्या वाढलेली दिसून आली. किरकोळ, क्षुल्लक कारणावरून जसे की, नवरा घरात कमी पैसे देतो, टीव्ही मोबाईल जास्त पाहतो, घरातील कामात मदत करत नाही, मुलांची काळजी नीट घेत नाही अशा तक्रारी महिला वर्गाकडून येत असल्याने क्षुल्लक गोष्टींवरून बहुतेक घटस्फोटाचे अर्ज दाखल झाले. गेल्या दोन वर्षांत कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचे ७ हजार २७३ खटले दाखल झाले आहेत. त्यापैकी ३ हजार १३२ याचिका दोघांच्या संमतीने दाखल करण्यात आल्यात. कोरोनापूर्वी पत्नीच्या घरातून पैसे मिळवण्यासाठी होणारा छळ, सासरच्यांकडून होणारा मानसिक त्रास, पतीला मद्यपानाचे व्यसन याकारणामुळे घटस्फोट होण्याची कारणं होती. मात्र, कोरोना दरम्यान, एकमेकांना वेळ न देणं, सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर यामुळे घटस्फोटाचे प्रमाण अधिक वाढल्याचे समोर आले.