निळ्याश्यार आकाशात पांढरया ढगांमध्ये खेळण्या एव्हढ छोट्स विमान दिसल तरी डोळे किलकिले करत आनंदाने आकाशाकडे पहाणाऱ्या सिंधुदुर्ग वसियांचे स्वप्न आज सत्यात येत आहे. आपल्या जिल्ह्यात विमान येणार हे स्वप्न गेली 20 वर्ष जिल्हावासिय व चाकरमानी उराशी बाळगून आहेत. चिमटा काढून हे “स्वप्न की सत्य” पड़ताळावे अस स्थिती आहे, कारण उद्घाटनाची तारीख जाहीर व्हावी व रद्द व्हावी आणि प्रत्येक वेळी स्वप्न सत्यात उतरता उतरता हुलकावणी मिळत होती. सिंधुदुर्ग विमान तळाचे लोकार्पण आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय सूक्ष्म व लघू उद्योग मंत्री नारायण राणे व अन्य निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा होत आहे.
सिंधुदुर्ग मध्ये गेले काही दिवस झालेल्या विकास कामांवरुन शिवसेना व नारायण राणे समर्थक यांच्यात श्रेयवादाचा कलगीतूरा रंगताना दिसतो आहे. विमानतळ मुद्दा ही याला अपवाद नाहीय. श्रेयवादापेक्षा जिल्ह्यातील नेत्यांनी विकासाकड़े नेणाऱ्या विकासात्मक मुद्द्यावर एकत्र येऊन काम करावे व सिंधुदुर्गला नेहमी अग्रेसर ठेवण्याची गरज आहे. विमानतळ मंजूरीपासून आजपर्यंत अनेक वेळा हा प्रकल्प रखडला मात्र माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, माजी खासदार सुधीर सावंत, केंद्रीयमंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत यांनी विशेष प्रयत्न केले, आणि हा प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. मात्र सी वर्ल्ड, शासकीय मेडीकल कॉलेज व अन्य रेंगाळलेल्या प्रकल्पांना ही मूर्त स्वरूप देण्यासाठी ही प्रयत्न व्हायला हवेत. सिंधुदुर्ग देशातील पहिला पर्यटन जिल्हा जाहीर होऊन ही अजून ही इथे म्हणावे तसे पर्यटन व पर्यटनावर आधारित उद्योग व्यवसाय रुजलेले नाहीत, त्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे.
परुळे गावातील चिपी पठारावर हे विमानतळ साकाराले असल्याने या विमानतळाचा चिपी विमानतळ असा उल्लेख केला जातो. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं काम पूर्ण झालं आहे. जिल्ह्यामध्ये औद्योगिक गुंतवणूक वाढवणं आणि पर्यटनाचा विकास करणं या दृष्टिकोनातून हे विमानतळ उभारण्यात आलं आहे. २७४ हेक्टर जागेवर हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. विमानतळाची धावपट्टी ६० मीटर रुंद आणि २.५ किलोमीटर लांबीची आहे. सध्या या ठिकाणी तीन विमान पार्क करण्याची सोय उपलब्ध आहे. दुसऱ्या टप्प्यात ही क्षमता १५ पर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्याशिवाय या ठिकाणी नाईट लॅंडिगचीही व्यवस्था आहे. विमानात इंधन भरण्याचीही सोय या ठिकाणी करण्यात आली आहे.
१० हजार चौरस मीटरचे टर्मिनल काम असून सुमारे १८० प्रवासी क्षमतेची विमानं या ठिकाणी उतरू शकतात. त्याशिवाय एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) टॉवरचे कामही पूर्ण झालं आहे. हा टॉवर विमानांना उतरण्यास आणि उड्डाणास मदत करतो. विमानांना दिशा कळवण्याचे कामही टॉवर करतो. कुडाळ, कसाल आणि सातार्डा अशा तीन ठिकाणी या विमानतळाला राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. हवाईमार्गे येणारे पर्यटक हे गोवा राज्याकडे जातात. पण चिपीचं विमानतळ सुरु झाल्यानंतर थेट दिल्लीसारख्या महानगरातून जिल्ह्यात येणं पर्यटकांना सोपं जाणार आहे. त्यामुळे पर्यटनवाढीसाठी फायदा होणार आहे. जिल्ह्यात आंबा, काजू आणि मासळीचेही मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. सध्या देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सिंधुदुर्गच्या देवगड हापूस आंब्यानी मोठं नाव कमावलं आहे. आंबा देशाच्या इतर भागांत आणि परदेशात निर्यात होऊ शकतो. विमानतळामुळे चिपी परिसरात कार्गो हब निर्माण होईल. त्यामुळे आंबा देशातल्या आणि विदेशातील बाजारपेठेत थेट पाठवणं सिंधुदुर्गातील व्यापाऱ्यांना शक्य होईल. त्यामुळे आंब्याचा ताजेपणा आणि विशिष्ट चव राखणंही शक्य होणार आहे. एकूणच आंबा बागायतदारांच्या उत्पन्नात यामुळे वाढ होईल.
मत्स्य खवय्यांची संख्या वाढत आहे. हवाई वाहतुकीच्या माध्यमातून ताजी मासळी देशाच्या अंतर्गत भागात पोचवणं शक्य होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाला चांगला फायदा होणार आहे. रोजगारवाढीची संधीही उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय विमान वाहतूकीमुळे अनेक खासगी आस्थापना सिंधुदुर्गाकडे वळतील. त्यातून औद्योगिक गुंतवणुकीस चालना मिळेल. प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत होत असलेल्या या प्रकल्पाचे काम आय.आर.बी.कडे सोपवण्यात आले आहे. या विमानतळाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे. हे विमानतळ फोस सी प्रकारातील आहे. भविष्यातील लागणाऱ्या सर्व सोयींचा विचार करुन या विमानतळाची उभारणी केली आहे.
जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी आतापर्यंत अनेक तारखा या चिपी विमानतळ उड्डाणाबाबत दिल्या आहेत. मात्र चिपी विमानतळाला अदयाप मुहूर्त सापडलेला नव्हता. मात्र यावरून जिल्ह्यात राजकारण जोरात सुरु आहे. जिहयात विमानतळ झाले तरी स्पर्धा गोव्यातील मोपा शी आहे त्यामुळे विमानतळ परिसरातील सोई सुविधा, विमान तळाला जोड़नारे रस्ते व अन्य बाबी कड़े लक्ष देणे गरजेचे आहे.