घरफिचर्समायमहानगर ब्लॉगजिहादी मानसिकतेचे बळी!

जिहादी मानसिकतेचे बळी!

Subscribe

‘द डॉन’ हे पाकिस्तानातील एक प्रमुख मान्यवर इंग्रजी वृत्तपत्र आहे. त्याला जगभर मान्यता आहे. त्याने साधारण चार वर्षांपूर्वी लिहिलेले संपादकीय जगभरच्या मुस्लिम देशांसाठी एक इशारा होता. जगाला भेडसावणार्‍या जिहादचे खरे स्वरूप कुठले उदारमतवादी सांगू शकत नाहीत, इतक्या स्पष्ट शब्दात मांडण्याचे धाडस पाकिस्तानी संपादकाने दाखवले आहे. पाकिस्तानचे बुद्धीजिवी या सत्याकडे डोळे उघडून बघू शकत नाहीत. म्हणूनच त्यांच्यावर आरोप झाला, मग इस्लामचा आडोसा घेऊन ते हिंसाचाराच्या बचावाला पुढे येतात आणि त्याचाच आडोसा घेऊन तिथले जिहादी जगभर उच्छाद मांडत असतात. जिहादी हिंसेमागची प्रेरणा इस्लामी आक्रमकतेची असली, तरी त्याचा उच्चार केला तर हिंदू आक्रमकतेला चालना मिळेल, म्हणून इथले शहाणे जिहादींची पाठराखण करत असतात. अशा प्रत्येकाला वाटते की आपण इस्लामी मानसिकतेला चुचकारले, तर त्याला शांत करता येईल. पण त्यातूनच तो अतिरेक बोकाळत गेला आणि आता त्यांच्या जनकांनाही आवरणे शक्य राहिलेले नाही. डॉन वृत्तपत्राने त्याचीच जाहीर कबुली दिली आहे.

तिथेच न थांबता मुस्लीम देशांनी व राज्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन जिहादी मानसिकतेचे निर्दालन केले पाहिजे असे आवाहन केलेले आहे. ते आवाहन जगाच्या सुरक्षेसाठी नव्हेतर मुस्लिमांच्या हित व सुरक्षेसाठी केलेले आहे. कुठलाही आडपडदा न ठेवता जगभरच्या जिहादींना संपवायचा चंग मुस्लीम राज्यकर्त्यांनी बांधला नाही, तर अवघे जगच मुस्लिमांच्या विरोधात उभे ठाकण्याचा धोका असल्याचे या संपादकीयात म्हटले आहे. आता मुस्लीम राज्यकर्ते वा जिहादी यांच्यात फरक नाही आणि सगळेच मुस्लीम ‘तसेच’ असतात, अशी धारणा जगभर वाढीस लागत आहे. त्याचे दुष्परिणाम मुस्लिमांना भोगावे लागण्याचा धोका आहे. म्हणूनच डॉनचे संपादकीय म्हणते, जिहाद विरोधातली लढाई जगाची नाही तर ‘आपली’ म्हणजे मुस्लीम लोकसंख्येची व मुस्लीम देशांची आहे. जिहादी हिंसाचार करणार्‍यांना आटोक्यात राखणे, आता कुठल्याही मुस्लीम राज्यकर्त्याला शक्य राहिलेले नाही. काही काळ आपल्या राजकीय खेळीसाठी उभा केलेला हा भस्मासूर आता मोकाट झाला असून, त्याचे निर्दालन मुस्लीम देश राज्यकर्त्यांनाच शक्य आहे.

- Advertisement -

किंबहुना त्यात अन्य पाश्चात्य देशाची मदत घेतली जाऊ नये. अन्यथा त्याला धार्मिक तेढीचे रुप मिळेल आणि जिहादींना तेच हवे आहे. बहुतेक मुस्लीम देशांनी जिहादी गटांचा आपल्या राजकारणासाठी वापर करून घेतला. त्यासाठी जिहादींना जन्म दिला किंवा आश्रय दिला. पण त्यातून स्थानिक पातळीवर नैराश्याने घेरलेले तरूण त्यात ओढले गेले आणि स्थानिक राज्यकर्त्यांचे अपयश जिहादला आत्मघातकी लढवय्ये पुरवू लागले. विसाव्या शतकाच्या अखेरीस त्याचे भयाण परिणाम अल कायदाच्या स्वरुपात पुढे आले. इसिस व अल बगदादी यांच्या रुपाने त्यापेक्षाही भयंकर भस्मासूर उभा राहिलेला आहे. तो मुस्लीम अरबी देशांनाही गिळंकृत करत चालला आहे. जाकार्ता किंवा जलालाबाद येथील नुकत्याच आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी इसिसने घेतली असली, तरी प्रत्यक्षात त्यांची अफगाण वा इंडोनेशियात संघटना नाही. पण इसिसला तशा संघटनेची गरजही उरलेली नाही. बेकारी, गरीबी व उपासमारीने बेजार असलेल्या बहुतेक मुस्लीम देशात अशा भणंगांचे तांडे मोकाट फिरत असतात. त्यांना जिहाद शिकवणे सोपे असते. त्यांना इसिसने निव्वळ नैतिक पाठिंबा दिला, तरी ते उत्पात घडवायला पुरेसे आहेत आणि तेच सिरीया, इराक वा अफगाणिस्तानात घडताना दिसत आहे.

पाकिस्तानात तहरीके तालिबान वा अफगाणिस्तानात तालिबान आपल्याच सरकारला आव्हान देत आहेत. इंडोनेशियात अबु सयाफची जेमा इस्लामिया इसिसची भगिनीच आहे. त्यामुळे अशा विविध शेकडो लहानमोठ्या जिहादी गटांना प्रत्यक्ष इसिसमध्ये सहभागी व्हायची गरज नाही की, मदतीची गरज नाही. जागतिक पातळीवर सहकार्य वा नैतिक पाठिंबा पुरेसा आहे. कारण त्यांनी विविध मुस्लीम देशात आपले चांगले बस्तान बसवलेले आहे. अन्य कारणास्तव राज्यकर्त्यांनी त्यांना पोसलेले आहे. आता स्थानिक राज्यकर्त्यांनी वेसण घालावी, इतके हे जिहादी गट दुबळे राहिलेले नाहीत. म्हणूनच राष्ट्राध्यक्ष असताना मुशर्रफ यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत जैश-ए-महंमद संघटनेचे मजल गेली. आताही लष्करे जंघवी किंवा काही गट पाक लष्कराला आव्हान देण्यापर्यंत पोहोचले आहेत.

- Advertisement -

म्हणूनच त्यातून मुस्लीम देश क्रमाक्रमाने विस्कळीत होत अराजकाच्या गर्तेत ढकलले जात आहेत. त्यांच्या आक्रमक हिंसाचाराने मुस्लीम देशातील प्रशासन व कायदा व्यवस्था पोखरून टाकलेली आहे. कुठल्याही नैराश्य वा गरीबीला पुढे करून धर्मांध चिथावणी दिली, तरी सत्ताधार्‍यांच्या विरोधात हिंसा माजवणे त्या जिहादी गटांच्या हातचा मळ झालेला आहे. म्हणूनच मुस्लीम देशांचे स्थैर्य व राज्यच धोक्यात येत चालले आहे. धर्माच्या नावाने कुठेही धुमाकुळ घालणार्‍या अशा गटांत चांगला-वाईट असा भेदभाव करणे सोडून त्यांचा समूळ उच्छेद करणे हा प्राधान्याचा विषय आहे. मुस्लीम देश आणि त्यांच्या अस्तित्वालाच धोका झालेल्या जिहादींचा बंदोबस्त, म्हणूनच मुस्लीम राज्यकर्त्यांचा विषय आहे. आपापल्या देशातील जिहादी वृत्ती निर्दयपणे मोडीत काढायचे आवाहन पाकिस्तानच्या या प्रमुख दैनिकाने केलेले आहे. पठाणकोटच्या हल्ल्यानंतरचा हा सल्ला म्हणूनच महत्वाचा ठरावा. पाकिस्तान वा तत्सम देश जिहादने किती डबघाईला आलेत, त्याची ही चुणूक आहे.

सौदी अरेबियाने दहशतवाद विरोधी आघाडी उभी करताना त्यातून इराणला वगळले आहे. थोडक्यात, शिया-सुन्नी अशी विभागणी त्यात आहे. म्हणजेच शियापंथीय मुस्लिमांना संपवण्यासाठी सौदी सुन्नी अतिरेकाचे समर्थन करणार आणि इराण सुन्नींचे निर्दालन करणार्‍या जिहादी गटांना प्रोत्साहन देणार. त्यातून मुस्लिमांचे शिरकाण होते आहे आणि ते अधिकच वाढणार आहे. पाकिस्तानसारखे मिश्र मुस्लीम वस्ती असलेले देश, त्यामुळे रक्तपाताच्या संकटात सापडणार आहेत. त्याची भीतीच डॉनसारख्या वृत्तपत्राला भेडसावते आहे. पाकिस्तानात दर शुक्रवारी मशिदीतच स्फोट होतात आणि त्यात शिया मुस्लिम मारले जात आहेत. सौदी-तुर्कीने इराक सिरीयात जिहादींच्या मार्फत शियांचीच हिंसा चालविली आहे. दुसरीकडे शिया अतिरेकाला इराण मदत करतो आहे. हे सर्व धर्माच्या व इस्लामच्या नावानेच चालले आहे. थोडक्यात जगाला भेडसावणारा जिहाद, आता मुस्लीम जगतासाठीच एक दुष्टचक्र बनलेले आहे. त्यातून बाहेर पडण्याची चिंता डॉनसारख्या संपादक बुद्धीमंतांना भेडसावते आहे.

म्हणूनच अन्य कुठल्या देशाच्या मदतीशिवाय जिहादी मानसिकता खतम करण्याची लढाई मुस्लीम राज्यकर्त्यांनीच पुकारावी असे आवाहन केलेले आहे. हे धर्मयुद्धच मुस्लीम लोकसंख्या व मुस्लीम देशांच्या मुळावर येत चालले आहे. मात्र ते जगभरच्या उदारमतवादी सेक्युलर लोकांना दिसणार नाही. भारतातल्या पुरोगाम्यांना बघता येणार नाही. पण ज्यांचे अस्तित्व संकटात सापडले आहे, त्यांना त्यातला धोका जाणवला आहे. डॉन दैनिकाने संपादकीय लिहून त्याची कबुली दिलेली आहे. पण भारतातल्या बौद्धिक शहाण्यांना रझा अकादमीची हिंसा बघता येत नाही की मालदाच्या घडामोडीतला धोका दिसत नाही. मालदानंतर भारतातील माध्यमातली चर्चा बघा आणि पठाणकोट नंतर पाकिस्तानच्या मान्यवर दैनिकातील संपादकीयाचा सूर बघा. मग जगात काय चालले आहे त्याचा अंदाज येतो. जिहाद चुचकारू नका तर जिहाद विरोधातच जिहाद पुकारा, हे डॉनचे आवाहन आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -