घरफिचर्समायमहानगर ब्लॉगअस्तंगतीला चाललेले प्रादेशिक पक्ष

अस्तंगतीला चाललेले प्रादेशिक पक्ष

Subscribe

भाजप देशातील अनेक राज्यांमध्ये आता मुसंडी मारत आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका होत असताना भाजपचे नेते अमित शहांच्या सभा, रोड-शोला होणारी प्रचंड गर्दी विरोधकांना संभ्रमात टाकत आहे. त्यातूनच कधीकाळी प्रादेशिक अस्मिता जपणार्‍या, प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याची संकल्पना पुढे येऊ लागली आहे. मात्र ज्या प्रादेशिक पक्षांनी, स्वत:हून आपल्याला संपवले ते खरंच मोदी-शहांचे आव्हान स्वीकारू शकतात का, हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरीत आहे. प्रादेशिक पक्षांनी आपल्याला का आणि कशासाठी संपवले त्याचा घेतलेला हा आढावा...

लोकसभा जिंकताना भाजपने अनेक प्रादेशिक वा लहानसहान पक्षांना सोबत घेतलेले होते. पण सत्तेची गणिते जमवताना या प्रादेशिक पक्षांना डोईजड होऊ द्यायचे नाही, असाही ठामपणा मोदींनी दाखवला आहे. त्यांच्या अशा भूमिकेला अनेक राज्यात मिळणारा वाढता प्रतिसाद राजकीय विश्लेषकांना थक्क करून जातो आहे. कारण आजवर जिथे भाजपाला पाय टाकता येत नव्हता, तिथेही आता भाजप पाय रोवून उभा राहिला आहे आणि तिथल्या कडव्या प्रादेशिक अस्मितेच्या पक्षांना मागे टाकून मतदार भाजपला प्रतिसाद देतो आहे. त्याचे कोडे अनेक विश्लेषकांना उलगडता आलेले नाही. इंदिराजी व त्यांच्या वंशजांनी प्रादेशिक अस्मितेची पायमल्ली केली, तिथे प्रामुख्याने प्रादेशिक अस्मिता व त्यांचे पक्ष पुढे आलेले होते. तीच स्थिती भाजपच्या बाबतीत राहिलेली नसल्याने प्रादेशिक पक्षांना फटका बसतो आहे. पण त्याचे दुसरे एक कारण आहे.

मागल्या दोन दशकात प्रादेशिक पक्षांचे बळ वाढल्यानंतर त्यांच्या नेत्यांनी केंद्राच्या वा राष्ट्रीय राजकारणात अवास्तव लुडबुड आरंभलेली होती. ममता, जयललिता, चंद्राबाबू नायडू किंवा लालूप्रसाद, मुलायम यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्यांनी आपले स्थानिक वा व्यक्तीगत स्वार्थ मोठे मानून, राष्ट्रीय हिताचा बळी देण्यास मागेपुढे बघितलेले नाही. त्यामुळे एकूणच भारतीय जनमानसात अस्वस्थता येत गेलेली होती. आज ममतांनी भाजप विरोधासाठी बंगलादेशी घुसखोरांचे समर्थन करणे किंवा द्रमुकने तामिळी वाघांची पाठराखण करताना भारत सरकारच्या धोरणांना घातलेली खीळ, तामिळी जनतेलाही विचलीत करीत असते. अशा भावनांचा काँग्रेसने कधी विचार केला नव्हता की पर्वा केलेली नव्हती. अशा दुरावलेल्या प्रादेशिक जनतेला जोडण्यापेक्षा प्रादेशिक पक्षांचे खच्चीकरण करण्याला काँग्रेसने प्राधान्य दिल्यानेच राष्ट्रीय राजकारणाचा प्रवाह अशा अनेक राज्यातून आटलेला होता. तो पुन्हा प्रवाहीत होताना आता दिसतो आहे.

- Advertisement -

नोटाबंदी वा सर्जिकल स्ट्राईक असे विषय प्रादेशिक पक्षांचे नसतात. काश्मिरविषयक भूमिका तृणमूल वा द्रमुकसाठी असू शकत नाही. पण अशा पक्षांनी मागल्या दोन दशकात त्याही धोरणात आपल्या संसदेतील बळावर धुडगुस घातलेला होता. ती बाब सामान्य भारतीयांना विचलीत करणारी होती व आहे. सहाजिकच अशा पक्षांविषयी व नेत्यांविषयी सामान्य लोकांना प्रादेशिक आस्था असली तरी त्यांच्या राष्ट्रीय आडमुठ्या भूमिकेने लोकांना अस्वस्थ केले होते. भाजपाने तीच प्रादेशिक अस्मिता जपली आणि राष्ट्रीय भूमिकेतील लुडबुड रोखण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नेतृत्व उभे करून त्याला प्रादेशिक स्वायत्तता बहाल केली. त्यामुळेच एक मोठा बदल प्रादेशिक पक्षीय राजकारणात घडताना दिसू लागला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, हरयाणा, आसाम, उत्तराखंड अशा अनेक राज्यात प्रादेशिक पक्षांना धुळ चारून भाजपा हा राष्ट्रीय पक्ष, त्या राज्यांना पुन्हा राष्ट्रीय प्रवाहात ओढताना दिसतो आहे.

त्याचाच फटका विविध राज्यातील प्रादेशिक पक्षांना बसत चालला आहे. अन्य राज्ये सोडा, तामिळनाडू अर्धशतकापुर्वी राष्ट्रीय प्रवाहातून बाहेर पडलेले राज्य आहे. मागल्या चार दशकात तिथे दोन प्रादेशिक पक्षातच झुंज होत असते. कुठल्याही राष्ट्रीय पक्षाला दोनपैकी एका प्रादेशिक पक्षाच्याच आश्रयाला जावे लागत असते. आज अभिनेता रजनीकांत यांचा पक्ष भाजपत गेल्यास काय होईल, म्हणून त्या दोन्ही द्रविडी पक्षांची घाबरगुंडी उडालेली आहे. लालू गडबडले आहेत आणि नितीशने आपली प्रादेशिक पात्रता स्वीकारून मोदींच्या गोटात येणे पसंत केले आहे. मुलायम, मायावती निकालात निघाले आहेत आणि ममताची पाचावर धारण बसलेली आहे. ती प्रादेशिक पक्षांना लागलेली गळती नसून राष्ट्रीय प्रवाहाला फटकून वागण्याच्या अट्टाहासातून त्यांच्यावर अशी पाळी आली आहे. राज्य व त्याच्या हितापुरती त्यांनी आपल्या आग्रहाची मर्यादा राखली असती, तर त्यांच्यावर अशी पाळी आली नसती.

- Advertisement -

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती होण्यापूर्वी असलेले अनेक प्रादेशिक कुवतीचे पक्ष आज जवळपास अस्तंगत होऊन गेलेले आहेत. सहा दशकापूर्वी समितीच्या नावावर कम्युनिस्ट, समाजवादी, रिपब्लिकन, शेकाप असे पक्ष खरे काँग्रेसला पर्याय म्हणून जोरात होते. अशा पक्षांनी आपले बिगरकाँग्रेसी राजकारणाचे तत्व सोडून पुरोगामीत्व नावाचा मुखवटा चढवला आणि त्यांचा र्‍हास सुरू झाला. जातीयवादी सेना-भाजप युतीला संपवण्याच्या आवेशात ते काँग्रेसला वाचवत सती गेले आणि आज त्यांपैकी कोणाचे नामोनिशाण शिल्लक उरलेले नाही. आपल्या मुळच्या रुपाला काळानुरूप बदलणे भागच असते. पण मूळ तत्वालाच हरताळ फासण्यापर्यंत मजल गेली, म्हणजे तुमचे अवतारकार्य संपलेले असते. 1995 नंतर बहुतांश पुरोगामी पक्ष व प्रामुख्याने प्रादेशिक पुरोगामी पक्ष भाजपला संपवण्याच्या नादात काँग्रेसच्या आहारी गेले आणि त्यांचा काँग्रेसविरोधी पक्ष हा मुखवटा गळून पडला. तिथेच त्यांचा र्‍हास अपरिहार्य झाला होता.

महाराष्ट्रातील पुरोगामी नगण्य होते. तुलनेने उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल इथे तर पुरोगामी म्हणवणार्‍या पक्षांचे बळ खूप मोठे होते. त्यांचे राजकारणच काँग्रेस विरोधावर पोसले गेलेले होते. त्यांनी काँग्रेसशीच हातमिळवणी केल्याने जी पोकळी निर्माण झाली, ती भाजप भरत गेला. ती बिगरकाँग्रेसी राजकारणाची जागा होती. थोडक्यात बुडत्याला आधार द्यायला गेलेल्या काड्या काँग्रेसला वाचवू शकलेल्या नाहीत. पण बुडणार्‍या काँग्रेसमुळे अशा प्रादेशिक शक्ती असलेल्या वा स्थानिक पक्ष असलेल्या काड्या बुडालेल्या आहेत. एका बाजूला आपली ओळख हे पक्ष गमावून बसले आणि दुसरीकडे प्रादेशिक नेतृत्वातून भाजप आपला राष्ट्रीय राजकारणाचा तिथे विस्तार करत गेलेला आहे. त्यात म्हणूनच काँग्रेसला पर्याय म्हणून उभ्या राहिलेल्या पक्ष व नेत्यांचा बळी जाताना दिसतो आहे. त्यांना भाजपाने संपवले असे म्हणण्यापेक्षा त्यांनीच आत्महत्येचा मार्ग पत्करला म्हणणे योग्य ठरावे.

विरोधासाठी विरोध आणि त्यातून चाललेला पोरकटपणा, हे मागल्या तीन वर्षात भाजप, अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी वरदान ठरलेले आहे. गंभीरपणे राजकारण खेळून विरोधकांना पराभूत करण्याचे कुठलेही संकट त्यांच्यावर आलेले नाही. कारण एकविसाव्या शतकातला भारत खूप बदलला आहे. 1980-90 च्या काळात खेळले जाणारे राजकीय डावपेच आता कालबाह्य झालेले आहेत. राजकीय मैत्री वा निवडणुका जिंकण्याचे ठोकताळे बदलून गेलेले आहेत. किंबहुना मोदी-शहा जोडीने नवे नियम प्रस्थापित केलेले आहेत. ते ओळखून वा अभ्यासून, त्यानुसारच त्यांच्यावर मात करता येऊ शकेल. पण या जोडीच्या सुदैवाने कुठला राष्ट्रीय वा प्रादेशिक पक्ष व नेता त्या सत्याकडे ढुंकून बघायला तयार नाही. त्यातच एकविसाव्या शतकातला भारतीय व या पिढीतल्या भारतीयाच्या आकांक्षा व अपेक्षाही बदललेल्या आहेत. त्याची कुठली दखल यापैकी कोणी घेत नसल्यामुळे, विरोधातल्या पक्षांची तारांबळ उडालेली आहे.

तसे नसते तर बंगाल, केरळ, ओडीशात वा इशान्येकडील राज्यांमध्ये अमित शहा इतकी मुसंडी मारून भाजपचा विस्तार करू शकलेले नसते. त्यांच्या वाटेत येणार्‍या राष्ट्रीय वा प्रादेशिक पक्षांच्या पराभवाची मागल्या दोनतीन वर्षात कोणी कारणमीमांसाही करू नये, हे राजकीय अभ्यासाच्या क्षेत्रातले आणखी एक आश्चर्य आहे. सहाजिकच त्यातून मोदी-शहा अजिंक्य भासू लागले आहेत. विरोधकांना तसेच वाटावे आणि तशा कुठल्याही भ्रमात न जगता, प्रत्येक निवडणूक सर्वस्व पणाला लावून लढण्याची या जोडीची जिद्द, हे म्हणूनच भारतातले नवल आहे. विजेता नव्या लढतीसाठी सिद्ध होत विजयाचे सोहळेही साजरे करण्यात वेळ दवडत नाही आणि पराभूत मात्र त्या अपयशातही विजयाचे कण शोधताना दिसतात, त्याला आश्चर्य नाही तर दुसरे काय म्हणता येईल? दुबळ्या राष्ट्रीय पक्षांच्या जुगारात प्रादेशिक पक्ष फुकटचे भरडले जात आहेत, हे त्यातले सत्य आहे.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -