घरफिचर्सबिगर बँकिंग-वित्तीय कंपन्या NBFCS ‘धोक्यात’

बिगर बँकिंग-वित्तीय कंपन्या NBFCS ‘धोक्यात’

Subscribe

भारतीय अर्थ-व्यवस्था इतकी महाकाय आहे कि केवळ बँक किंवा सहकार क्षेत्र ह्यांच्यापुरते ते काही सीमित नाही. अनेकविध गरजा आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी काही नवनव्या वित्त-विषयक संस्था निर्माण झाल्या.अर्थव्यवस्थेचा वेग वाढवणे आणि विविध प्रकारच्या ग्राहकांना सामावून घेण्यासाठी नवीन सोयीसाठी-सुविधा जन्माला आल्या.देशात असलेल्या विविध प्रकारच्या बँक्स कार्यरत असताना,नवीन गरजा-नवीन मागण्या ह्याकरिता एन.बी.एफ.सी. म्हणजेच बिगर बँकिंग/वित्तीय कंपन्या अस्तित्वात आल्या.वाढत्या व्यापारी-व्यावसायिक गरजांची मागणी आणि त्यासाठी नवीन अर्थ-साधने निर्माण झाली.तसा बँकिंगवरील बोझा काही प्रमाणात कमी झाला.अशी काही स्थित्यंतरे घडली,परंतु आता या एनबीएफसीज अश्या निर्णायक वळणावर आल्या आहेत.हे का ? व कसे झाले?हे पाहणार आहोत आणि भविष्यात अशा कंपन्यांना भवितव्य आहे का? हे पाहूया.एक ताजा विषय आपण जाणून घेणार आहोत.

पार्श्वभूमी – कोणे एके काळी बँका काही क्षेत्रात काम करता येणे शक्य नव्हते आणि नवनवीन अडचणींवर ‘उत्तरे’ शोधण्यासाठी आणि उद्योग-व्यवसायाला उभारी देण्यासाठी अशा बिगर बँकिंग कंपन्या जन्माला आल्या.आणि बघता बघता मोठ्या झाल्या.अर्थ-व्यापार विकसित होत असताना अशा अतिरिक्त वित्त कंपन्यांची आवश्यकता प्रत्ययास आली.अंतर्गत व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारास लागणारा निधी -अर्थ-पुरवठा करण्यासाठी आवश्यक अशी साधने प्रचलित झाली आणि व्यापार आणि निर्यात करणार्‍यांना ‘वित्त-सुविधा’ उपलब्ध झाल्या.

- Advertisement -

ट्रेड फायनान्स म्हणजेच उद्योग-व्यवसायाला अशा एनबीएफसीजचा मोलाचा हातभार लागला.अनेक नामांकित कंपन्या नावारूपाला आल्या,त्यांनी खूप मोलाची कामगिरी केली.इतके कि काही मोठ्या कंपन्यांचा कारभार व लौकिक बँकेप्रमाणेच ओळखला गेला.काही कंपन्यांचे पुढे ‘बँक’ म्हणून रुपांतरदेखील झाले.पण अनेक कंपन्या मात्र आहे त्याच स्तरावर राहिल्या आणि त्यांची प्रगती खुंटली.

काळानुरूप बदलण्याच्या नादात आणि ग्राहकाला ‘पाहिजे ते ते ‘ देण्याच्या नादात नियम बाजूला ठेवण्याच्या किंवा उल्लंघन करण्याचा प्रकार प्रगतीस खीळ घालणारा ठरला.परिणामी काही बिगर बँकिंग कंपन्या मागे पडल्या. आणि अलीकडील आयएफएलसारख्या महा-घोटाळ्यामुळे अधिक दारुण आर्थिक परिस्थितीत अडकल्याचे दिसून आले आहे.एनबीएफसीचे अस्तित्व आणि कार्य-विस्तार :-1960 साली अस्तित्वात आलेल्या बिगर बँकिंग कंपन्या हळूहळू विकसित होत गेल्या. आधी कंपनी कायदा आणि रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आणल्या गेल्या.

- Advertisement -

विविध प्रकारच्या एनबीएफसीज –

1 एसेट फायनान्स-मालमत्ता निमं करण्यासाठी वित्त-पुरवठा
2 इन्वेस्टमेंट कंपन्या  गुंतवणूकविषयक
3 लोन कंपनीज विविधरूपी कर्ज-पुरवठा करणार्‍या
4 इनफ्रास्ट्रक्चर कंपनी पायाभूत गोष्टींच्या उभारणीसाठी
5 इनफ्रास्ट्रक्चर डेब्ट कंपनी पायाभूतसाठी कर्ज-पुरवठा
6 हौसिंग फायनान्स कंपनी गृह-निर्माण क्षेत्रासाठी

विस्तारलेले कार्यक्षेत्र –एनबीएफसीजचे काही कार्य हे बँकिंगप्रमाणे असले तरी नवनवीन सेवा आणि साधने देत राहिल्याने आणि नवीन गरजा भागवल्या गेल्याने ह्याकंपन्या अधिक ग्राहक-प्रिय आणि उद्योग-लक्ष्यी राहिल्या. बँकेचे नियम-अटींची पूर्तता आणि वेळेचा खोळंबा अश्या कारणांनी या कंपन्या अधिक नफा कमावू लागल्या,त्यासाठी नियम धाब्यावर बसवणेदेखील त्यांना गैर वाटले नाही आणि एक वेगळ्या प्रकारची ‘ एनबीएफसी -कल्चर’ वित्त-संस्कृती निर्माण झाली. पुढे पुढे नियंत्रणे बाजूला ठेवून कार्य केल्याने फायदा वाढला परंतु व्यवस्थापन,नियम-पालन ह्यात शिथिलता येत गेली.
1980 ते 1990 छइऋउी तुफानी भरारी – जागतिकीकरण ,व्यापार-वृद्धी,आपल्या अर्थ-व्यवस्था खुली होणे आणि खाजगीकरण होण्याचा वाढता वेग अश्या अनेक कारणांनी संधी वाढल्या आणि तमाम एनबीएफसीजचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. 1981 मध्ये -7000 असलेल्या कंपन्या 1992 मध्ये चक्क 30,000च्यावर पोहोचल्या. मशरूम म्हणजेच कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे वाढ होत गेली असेही म्हटले गेले. कर्ज-पुरवठा ,नवीन प्रकारच्या वाढत्या गरजा ह्यांची निकड भागवण्यासाठी कंपन्या वाढल्या आणि त्यांचा वाढता नफा पाहून अनेक नवे ह्यालाटेत सहभागी झाले. कर्ज-पुरवठा म्हणजेच क्रेडीट ग्रोथमध्ये एनबीएफसीजने बँकांवर मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतली.

बँक आणि एनबीएफसीज ह्यांच्यातील मुलभूत फरक –

1 स्थापना / निर्मिती –

बँक- रिझर्व्ह बँक कायद्यानुसार स्थापन केल्या जातात
एनबीएफसी – कंपनी कायद्यान्वये स्थापन होतात.

2 व्यवसाय –

बँक- अनेक प्रकारच्या ठेवी,कर्ज,आयात-निर्यात व्यापार, विदेशी मुद्रा विनिमय असे असंख्य उद्योग व्यावसायिकपणे करू शकतात
एनबीएफसी- कर्ज-पुरवठा , शेअर्स -स्टोक्स -बॉण्ड्स ह्यांची खरेदी विक्री,शिवाय बील-डिस्कावुंटिंग,

3 ठेवींवर संरक्षण –

बँक – बँकांकडे ठेवलेल्या रु एक लाखांपर्यंतच्या रक्कमेवर विमा संरक्षण मिळू शकते.
एनबीएफसी – असे कोणतेच विमा संरक्षण मिळू शकत नाही

4 लवचिकता –

बँक – बँका या बाह्य आणि अंतर्गत नियमांनी बांधलेल्या असतात,एखादे धोरण वाकवणे किन्वा शिथिल करणे तितके सहज नसते
एनबीएफसी-लवचिकता हाच गुणधर्म आणि व्यवसाय-नीतीचा भाग असल्याने आणि नियमांत अधिक न गुंतल्याने ,ग्राहकांना सोयीची साधने देण्याची तयारी

5 धोरणात्मक –

बँक – बँकांची धोरणे ही व्यवस्थापन आणि सरकार तसेच वित्त मंत्रालय अश्या अनेक पातळींवर तयार होतात.
एनबीएफसी – फक्त व्यवस्थापन जबाबदार असल्याने धोरणे ठरवताना व्यवसाय गरज आणि ग्राहक सोय ह्यांना प्राधान्य दिले जाते

6 हेतू आणि उद्देश्य –

बँक – नफा हे जरी उद्दिष्ट असले तरी राष्ट्रीय विकास आणि पायाभूत सुधारणांचा विचार करणे हेही बँकांना पहावे लागते.शेती आणि प्राधान्य क्षेत्राला कर्ज वा सवलती देणे हे अपरिहार्य असते.
एनबीएफसी – देश किंवा अर्थव्यवस्थेचे बोजे डोक्यावर नसल्याने निव्वळ व्यापारी हेतू आणि ‘नफा आणि अधिक नफा’ हेच महत्वाचे पुढच्या काळात आणि अलीकडेही अशा कंपन्यांचा कारभार ढेपाळला गेल्याचे जाणवले

एनबीएफसीजची घसरण काही ठळक कारणे खालीलप्रमाणे –

1 अल्प मुदतीच्या कर्जांचा उपयोग दीर्घ मुदतीच्या कर्जांसाठी वापरणे -कमी व्याज दराचा मोह पडणे
2 काही विशिष्ठ क्षेत्राला कर्ज-पुरवठा करताना कर्जाची प्रत-दर्जा न राखला गेल्याने कर्जे थकीत होण्याची प्रक्रिया
3 मालमत्ता आणि देणी ह्यांचा समतोल राखण्यात आलेले अपयश
4 नियम-पालन आणि नीतिमूल्ये पाळण्यात केलेली दिरंगाई आणि गलथानपणा
अलीकडेच झालेल्या आयएफएलएसच्या दिवाळखोरीने बिगर बँकिंग क्षेत्राला मोठा हादरा बसलेला आहे.घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची कुवत नसल्याने आता बँक्स एनबीएफसीजन वित्त-पुरवठा करण्यास राजी नाहीत.त्यातून निर्माण झालेले ‘लिक्विडिटीचे वादळ शमणारे नाही.अशा कंपन्यांची रोकड सुलभता एकूण कारभारालाच अडचणीत आणणारी आहे.

नेमके काय केले तर एनबीएफसीज पुन्हा मार्गावर येतील ?

1 आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी तांतडीने आर्थिक पाठबळाची गरज आहे.
2 बँकावर जसे नियंत्रण आहे ,तसे कठोरपणे अंमलात आणण्याची गरज आहे
3 कार्य-पद्धतीत सुधारणा अपेक्षित आहे.
4 व्यवसायिक धोरण अधिक सक्षम होणे जरुरीचे आहे.
गाळात रुतलेल्या बिगर बँकिंग कंपन्या गंगाजळी आटल्याने संकटात आहेत, घेतलेल्या बँक कर्जांची परतफेड बाकी आहे ,आधी त्यांना ह्यातून बाहेर काढले पाहिजे कारण आजही अनेक ग्राहक -कर्जदार अशा कंपन्यांवर अवलंबून आहेत. आणि अर्थ-व्यवस्थेच्या एकादेखील घटकाचे कोसळणे संपूर्ण यंत्रणेला महाग ठरू शकते.सरकार आणि वित्त खात्याने योग्य हालचाली आणि उपाययोजना त्वरित कराव्यात.

एनबीएफसीजचे महत्व अश्याकरिता आहे कि खालील घटकांना ह्यांच्यामार्फत कर्ज-सेवा पुरवल्या जातात.

1 मोठ-मोठे कॉर्पोरेटस – त्यांच्या आर्थिक गरजा ज्याबँकिंगद्वारे भागवल्या जावू शकत नाहीत
2 असंघटीत क्षेत्रातील गरजूंना कर्ज-पुरवठा करणे
3 स्थानिक छोट्या -मध्यम उद्योग-व्यवसायिकांच्या कर्ज-गरजा भागवणे
जिथे बँकिंग किंवा अन्य कर्ज-पुरवठादार पोहचू शकत नाहीत ,तिथे आणि तिथल्या घटकांना बिगर-बँकिंग कंपन्यांचा मोठा आधार आहे.म्हणून त्याकंपन्या टिकल्या पाहिजेत,मात्र त्यांच्यावर प्रभावी अंकुश असण्याची गरज मात्र आहे.

राजीव जोशी

-(लेखक अर्थ आणि बँकिंग अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -