घरफिचर्सलोकप्रिय जादूगार रघुवीर भोपळे

लोकप्रिय जादूगार रघुवीर भोपळे

Subscribe

जादू ही एक कला आहे. त्याचा खरे तर उगम हा भारतात झालेला आहे. पाश्चिमात्यांनी त्यात अधिक मूल्यवर्धन केले. पण भारतात जादू या कलेला तंत्रमंत्राचा मुलामा चढवला गेला. त्यातून भोपाळे यांनी लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जादूचे प्रयोग हा आबालवृद्धांच्या उत्सुकतेचा विषय असतो.

जागतिक किर्तीचे जादुगार रघुवीर भिकाजी भोपळे यांचा आज जन्मदिन आहे. २४ मे १९२४ रोजी त्यांचा जन्म झाला. ‘जादूगार रघुवीर’ हे नाव घेतलं की येणारा प्रतिसाद फारच चांगला असतो. त्याचं कारणही तसंच आहे. त्यांनी आपले सगळे आयुष्य जादू या कलेच्या संवर्धनासाठीच समर्पित केले होते. आपले तन मन धन त्यांनी जादू या कलेसाठी वाहून घेतले. जादू ही एक कला आहे. त्याचा खरे तर उगम हा भारतात झालेला आहे. पाश्चिमात्यांनी त्यात अधिक मूल्यवर्धन केले. पण भारतात जादू या कलेला तंत्रमंत्राचा मुलामा चढवला गेला. त्यातून भोपाळे यांनी लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जादूचे प्रयोग हा आबालवृद्धांच्या उत्सुकतेचा विषय असतो. जादूगार रघुवीर हे या मंडळींना आपल्या जादूने खिळवून ठेवत असत. डोळे बांधून रस्त्यावर मोटरसायकल चालविणे, स्वप्नसृष्टी, नोटांचा पाऊस, हातातून वीजनिर्मिती, भुतांचा नाच इत्यादी प्रयोग करणारे जादूगार रघुवीर म्हणजे अवलियाच होते.

जादूगार रघुवीर हे मूळचे चाकणजवळील आंबेठाणचे. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे रघुवीर पुण्यामध्ये आले आणि त्या वेळच्या अनाथ विद्यार्थी गृहामध्ये राहिले. माधुकरी मागून त्यांनी शिक्षण घेतले. एकदा रस्त्याने जात असताना राणा या राजस्थानी कलाकाराला त्यांनी जादूचे खेळ करताना पाहिले. त्यांच्याकडून जादूची ही कला रघुवीर यांनी आत्मसात केली आणि सुमारे ७५ वर्षांपूर्वी पहिला व्यावसायिक प्रयोग केला. गानहिरा हिराबाई बडोदेकर यांनी जादूगार रघुवीर यांना परदेश दौर्‍यावर नेले आणि तेथून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. जादूच्या कलेमुळे जगभरातील २७ देशांचा प्रवास केला असला तरी पुणे ही त्यांनी आपली कर्मभूमी मानली. आपल्या आयुष्यात त्यांनी सात हजार २३ प्रयोग केले. जादू हा तंत्रमंत्र नाही तर ती हातचलाखी आहे, हे ठसवताना त्यांनी प्रयोगांच्या माध्यमातून जनजागरण केले. ३६५ दिवसांत २०० प्रयोग व तेही हाउसफुल, असे विक्रम त्यांच्या नावावर आहेत. अनेक गावांतील मंदिरे, शाळा, हॉल, तालमीच्या बांधकामांसाठी निधी मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले कार्यक्रम फुकट दिले. त्यांच्या जादूचे आकर्षण कायम राहिले. त्यांनीही साधी, सोपी उदाहरणे, साधी, सोपी भाषा यातून त्यांनी जादूचे खेळ चालू ठेवले. जादू हा चमत्कार नाही ती हातचलाखी आहे, असे जाहीर करूनच ते खेळाला सुरुवात करायचे. हातचलाखी इतकी जबरदस्त, की लोक त्यांना मांत्रिक-तांत्रिकच समजायचे. भेटून आपल्या खासगी अडचणी सांगायचे. रघुवीरांनी बर्‍याच प्रयत्नांनी चित्र बदलले. जादू या कलेला मोठ्या रंगमंचावर आणले. जादूचे खेळ खिशातील चिल्लर पैसे टाकून नव्हे तर आधी तिकीट काढून पाहायचे असतात, असे नवे चित्र त्यांनी निर्माण केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जादूगार म्हणून कीर्ती मिळविली. निखळ करमणूक हे सूत्र ठेवून रघुवीरांनी अनेक वर्षे आबालवृद्धांवर अक्षरशः जादू केली. निरनिराळ्या शाळांतून जादूविद्येवर व्याख्याने देऊन त्यांनी तिचा प्रचार केला. त्यांची ‘जादूची शाळा’ नावाची एक संस्था पुण्यात आहे. जादूगार रघुवीर यांचे निधन २० ऑगस्ट १९८४ रोजी झाले.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -