घरफिचर्सक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके

क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके

Subscribe

वासुदेव बळवंत फडके हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे एक आद्य प्रवर्तक. त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 रोजी कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण (रायगड) गावी झाला. सातव्या वर्षांपासून त्यांच्या शिक्षणास सुरुवात झाली. प्राथमिक शिक्षण शिरढोण येथे झाले. १८५५-६० या पाच वर्षांत माध्यमिक शिक्षण कल्याण, मुंबई, पुणे या ठिकाणी झाले. घरगुती अडचणींमुळे म्हणा किंवा शिक्षणाची आवड बेताची असल्यामुळे म्हणा; पण वासुदेव यांनी इंग्रजी पाचवीनंतर शिक्षण सोडले आणि नोकरीला सुरुवात केली. पहिली नोकरी जी. आय. पी. रेल्वेत केली. वरिष्ठांपुढे उगाच विनम्र होण्याचा गुण अंगी नसल्यामुळे त्यांची रेल्वेमधली नोकरी सुटली व नंतरची ग्रँट मेडिकल कॉलेजमधील लेखनिकाची नोकरीही फार दिवस टिकली नाही. शेवटी १८६३ मध्ये वासुदेव लष्कराच्या हिशेबी खात्यात आले. त्यात ते २१ फेब्रुवारी १८७९ पर्यंत म्हणजे बंडाचा बावटा उभारीपर्यंत राहिले.

मुंबईहून त्यांची बदली १८६५ मध्ये पुणे येथे झाली आणि पुणे हीच त्यांची कर्मभूमी ठरली. कचेरीतील वातावरण यांत्रिक आणि वासुदेव यांची वृत्ती तर अत्यंत संवेदनशील आणि बेगुमान. वेळेवर रजा मंजूर न झाल्यामुळे आजारी आईची भेट झाली नाही, तेव्हा वासुदेव यांनी वरिष्ठांपर्यंत आपली तक्रार नोंदविली. त्यांच्या आयुष्याला क्रांतिकारक वळण लावणारी ही एक महत्त्वाची घटना होय. १८७६-७८ या दरम्यान महाराष्ट्रात मोठे दुष्काळ पडले. त्यातच प्लेग-पटकींसारख्या साथीच्या रोगांची भर पडली. गोरगरिबांचे पाण्याचे आणि खाण्याचे फार हाल झाले. शेतकर्‍यांची गुरेढोरे मेली. वासुदेव बळवंतांनी पायी प्रवास करून लोकांची विपन्नावस्था पाहिली. या परिस्थितीला परकीय सरकार जबाबदार आहे, त्याची हकालपट्टी करून आपल्या लोकांचे शासन स्थापन केले पाहिजे, असा प्रचार त्यांनी सुरू केला.

- Advertisement -

पुण्याजवळील लोणीकंद येथे बंडवाल्यांचे मुख्य कार्यालय स्थापन करण्यात आले. सरकारी खजिने, सावकार, बनिये यांच्यावर धाडी घालण्याच्या योजना आखण्यात आल्या. पुढील पाच आठवडे या बंडखोरांनी धामारी, दावडी, वाल्हे, हर्णे, सोनापूर, चांदखेड इ. सह्याद्रीच्या कुशीतील गावे लुटली. रघुनाथ भटांनी इस्माईल खान या रोहिल्यांच्या पुढार्‍याशी त्यांचा परिचय करून दिला. ५०० रोहिले इस्माईल खानसह त्यांना येऊन मिळाले. शिवाय रघुनाथ भटाने आणखी काही माणसे मिळवून दिली. अशा प्रकारे ९०० माणसांचे पाठबळ वासुदेवांना प्राप्त झाले. वासुदेव गाणगापुरास आहेत, ही बातमी ब्रिटिश सरकारला कळली. त्यांना पकडण्यासाठी ५ हजार ते १० हजार रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली. पोलीस आयुक्त अब्दुल हक याच्या फितुरीमुळे त्यांना त्यांचा ठावठिकाणा मिळाला आणि विजापूर जिल्ह्यातील देवर नावडगी या गावी त्यांना पकडण्यात आले. न्यूनहॅम यांनी त्यांना जन्मठेपेची- काळ्या पाण्याची शिक्षा फर्मावली. अशा या महान क्रांतिकारकाचे १७ फेब्रुवारी १८८३ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -