घरफिचर्ससारांशव्यावसायिक यशाची दशावली!

व्यावसायिक यशाची दशावली!

Subscribe

यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी अंगी बाणवण्याची गरज असते. स्वतःमध्ये आवश्यक ते परिवर्तन करून स्वतःला व्यवसाययोग्य बनवणे आवश्यक असते. यात आपण कुणीही १०० टक्के परफेक्ट नाही, मीसुद्धा नाही. मीसुद्धा सतत माझ्यात परिवर्तन करायचा प्रयत्न करीत असतो आणि त्याचा चांगला परिणाम माझ्या कामावर नक्कीच दिसतो. या गोष्टी आपल्याला व्यावसायिक आयुष्यात सतत जाणवतात. यातील कमतरता आपल्याला कित्येक ठिकाणी माघार घ्यायला भाग पाडते. म्हणून या महत्त्वाच्या १० गोष्टींना आपण नियम समजूनच चालले पाहिजे.

– राम डावरे

१. वेळ
तुम्ही व्यवसायाला पुरेसा वेळ देऊ शकत असाल तरच व्यवसाय सुरू करा. इतरांवर विसंबून राहून तुम्ही व्यवसाय करू शकत नाहीत. वेळेचे योग्य नियोजन आवश्यक असते. व्यवसायासाठी वेळ देणे म्हणजे २४ तास व्यवसायाच्या ठिकाणी बसून राहणे नव्हे, तर त्याचे कामकाज योग्य पद्धतीने चालत आहे की नाही याकडे सतत लक्ष देणे आवश्यक असते. एकापेक्षा जास्त व्यवसाय असतील तर तुम्हाला वेळेचे योग्य नियोजन करावेच लागते. प्रत्येक व्यवसाय त्याच्या १०० टक्के क्षमतेने चालावा यासाठी त्याला आवश्यक तो वेळ द्यावाच लागेल.

- Advertisement -

२. कोणत्याही कामाची तयारी
एकाच ठिकाणी दिवसातील १८ तासांपेक्षाही जास्त वेळ काम करण्याची तयारी हवी. व्यवसायात काही वेळेस अशा घटना घडतात की तुम्हाला त्यासाठी तहान-भूक विसरून तासन्तास काम करावे लागते. कित्येक वेळा एखादी मोठी ऑर्डर असते किंवा कामकाजात एखादी अडचण येते. अशा वेळी तुम्हाला तहान-भूक विसरून तुमचे काम करावे लागते. अगदी १०, १५, १८ ताससुद्धा व्यवसायाच्या ठिकाणी काम करीत राहण्याची वेळ येऊ शकते. यासाठी तुमची मानसिक आणि शारीरिक तयारी असणे आवश्यक असते. ९ ते ५ काम करण्याचा हक्क फक्त कामगारांना आहे, मालकाला नाही. मालक हा कायम त्याच्या व्यवसायासाठी कर्मचारी असतो. यासोबतच तुम्हाला व्यवसायात कोणत्याही प्रकारचे काम करावे लागू शकते. अचानक एखादा कर्मचारी काम सोडून गेला तर तुम्ही तुमचे काम ठप्प करू शकत नाहीत. व्यवसाय करताना अगदी कामगारासारखे काम करण्याची तयारीसुद्धा असली पाहिजे.

३. ग्रहण क्षमता, संवाद कौशल्य
तुमच्यात उत्तम ग्रहण क्षमता असणे आवश्यक आहे. कमी बोलणे आणि जास्त ऐकणे हे उत्कृष्ट संवाद कौशल्याचे गमक आहे. समोरच्याच्या मनाचा ठाव घेणे आणि त्याच्याशी चर्चा करणे हे कसब तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. ते नसेल तर तुम्हाला ते विकसित करावे लागेल. यासाठी चांगली निरीक्षण शक्ती आवश्यक आहे. ग्राहकांशी चांगला संवाद प्रस्थापित करणारा व्यावसायिक कधीही अपयशी ठरत नाही.

- Advertisement -

४. रागावर नियंत्रण
यशस्वी व्यवसायासाठी तुमचे स्वतःच्या रागावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. राग तुमच्या प्रगतीसाठी अतिशय घातक असतो. राग तुम्हाला कळसापासून पायाशी कधी आणतो ते तुम्हालाही कळत नाही आणि कळेपर्यंत वेळ निघूनही गेलेली असते. रागाच्या भरात नेहमीच व्यवसायाला धोका उत्पन्न होईल असे निर्णय घेतले जातात. कितीही राग आला तरी त्याचे पर्यवसान समोरच्याचे मन दुखावण्यात होणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. रागाच्या भरात कोणताही निर्णय न घेणे आवश्यक आहे. व्यवसायाच्या बाबतीत कोणताही निर्णय थंड डोक्याने घ्यावा लागतो. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असणे आवश्यक आहे.

५. आळस नसावा
हा नियम कधी कधी माझ्याकडूनही मोडला जातो आणि याची मलाही वेळोवेळी जबर किंमत चुकवावी लागली आहे. आळस आपला खूप मोठा शत्रू आहे. एकवेळ इतर बाबतीत निभावून नेणं शक्य आहे पण आळसाच्या बाबतीत कसलीही माफी नसते. आळस हा नेहमीच तुम्हाला काळाच्या मागे नेतो. व्यवसायात कोणत्याही कामासाठी आळस नसावा. कंटाळा आला म्हणून एखादे काम पुढे ढकलणे हे व्यवसायाला ओहोटी लावते.

६. नुकसानीची मानसिकता
व्यवसायात नुकसान होणार ही काळ्या दगडावरची रेघ असते. व्यवसायात पदार्पण करतानाच तुम्ही नुकसान होणार या टर्म्स कंडिशनला अप्रत्यक्षपणे सहमती दर्शवलेली असते. त्यामुळे नुकसान झाले म्हणून खचून जाऊ नये. नुकसानाला खंबीरपणे सामोरे जाण्याची तयारी हवी. नुकसान हा व्यवसायाचा भाग आहे. नुकसान नाही असा व्यवसाय नाही आणि असा व्यावसायिकही नाही. खरंतर ज्याला आपण नुकसान म्हणतो, मी त्याला गुंतवणूक समजतो. ही गुंतवणूक तुम्हाला अनुभवसिद्ध करण्यासाठी, भविष्यातील मोठ्या संकटांना खंबीरपणे तोंड देण्यासाठी, सक्षम करण्यासाठी आवश्यक असते.

७. आत्मविश्वास, सकारात्मकता
यशस्वी व्यवसायासाठी आत्मविश्वास, सकारात्मक विचार आवश्यक असतो. कोणत्याही बाबीत नकारात्मकता तुम्हाला स्पर्धेत पिछाडीवर नेते. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तो यशस्वी होईल की नाही हा विचार तुमच्या मनात येत असेल तर तुम्ही अजूनही व्यवसायासाठी तयार नाहीत हे लक्षात घ्या. काही काळ थांबा आणि ज्यावेळी तुमची ही मानसिकता संपेल त्याच वेळी व्यवसायात पाऊल ठेवा. प्रत्येक बाबतीत नकारात्मक विचार करणारे आपल्यासोबतच आपल्या सहकार्‍यांनाही नकारात्मक करीत असतात. त्यांची प्रगती होणे अशक्य असते. स्वतःवर विश्वास खूप आवश्यक आहे.

८. न्यूनगंड
न्यूनगंड हे व्यवसायातील अपयशाचे खूप मोठे कारण आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये स्वतःला कमी समजणे हे तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम कार्यापासून परावृत्त करते. न्यूनगंडापासून वेळीच लांब जाणे व्यवसायासाठी आवश्यक असते.

९. संयम
संयमासारखा हिरा शोधूनही सापडणार नाही. संयम बाळगण्यासाठीसुद्धा खूप संयम लागतो. संयम असेल तर तुम्ही कठिणातील कठीण प्रश्न मार्गी लावू शकता. परिस्थिती कशीही असली तरीही कोणत्याही परिस्थितीत संयम न गमावणारा यशस्वी होतोच. स्वतःवर संयम ठेवण्याची प्रक्रिया खूप कठीण आहे, पण प्रयत्नांती आपण त्यावर विजय मिळवू शकतो. मला स्वतःला यासाठी कित्येक वर्षे लागली आहेत. व्यवसायात पहिल्या सहा महिन्यांतच धीर सोडणारे आपल्याकडे कमी नाहीत. अशांसाठी तर संयम खूप आवश्यक आहे. कारण व्यवसायात पुढचा रस्ता सहा महिन्यांनी नाही, तर किमान दोन वर्षांनी स्पष्ट होतो. संयमी व्यक्तीची आणखी एक खासियत म्हणजे हे लोक इतरांपेक्षा नेहमीच वेगळे वाटतात. स्वतःवर ताबा ठेवण्यासाठी तुम्हाला मानसिकदृष्ठ्या खंबीर असणे आवश्यक असते. ही खंबीर वृत्ती अशा लोकांच्या चेहर्‍यावर प्रखर तेज निर्माण करते. यशस्वी लोकांच्या चेहर्‍यावर एक वेगळेच तेज असते. ते याच आत्मविश्वासातून, संयमी मानसिकतेतून आलेले असते.

१०. स्व प्रतिमा
तुमच्या वैयक्तिक प्रतिमेचा तुमच्या व्यवसायावर परिणाम होत असतो. त्यामुळे तुमची समाजातील प्रतिमा कधीही बिघडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. व्यवसाय आणि वैयक्तिक आयुष्य या वेगवेगळ्या बाबी आहेत हा बर्‍याच जणांचा गैरसमज आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाचे पहिले ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असता. तुमची समाजातील चांगली प्रतिमा तुमच्या व्यवसायालासुद्धा उत्कर्ष मिळवून देते. स्व प्रतिमेला काचेच्या वस्तूप्रमाणे जपा.

एक चांगला उद्योजक तसेच व्यावसायिक होण्यासाठी या किमान बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. स्वतःमध्ये आवश्यक ते परिवर्तन करून स्वतःला व्यवसाययोग्य बनवणे आवश्यक आहे. यात आपण कुणीही १०० टक्के परफेक्ट नाही, मीसुद्धा नाही. मीसुद्धा सतत माझ्यात परिवर्तन करायचा प्रयत्न करीत असतो आणि त्याचा चांगला परिणाम माझ्या कामावर नक्कीच दिसतो, पण या गोष्टी आपल्याला व्यावसायिक आयुष्यात सतत जाणवतात. यातील कमतरता आपल्याला कित्येक ठिकाणी माघार घ्यायला भाग पाडते. म्हणून या महत्त्वाच्या १० गोष्टींना आपण नियम समजूनच चालले पाहिजे आणि या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -