-सुजाता बाबर
ग्रहणांबद्दल मानवाला आधीपासूनच आकर्षण होते. एखाद्या दिवशी अचानक सूर्य झाकला जातो किंवा चंद्र नेहमीपेक्षा अधिक लाल दिसतो अशा घटनांचे कुतूहल वाटले. शिवाय भीतीदेखील वाटली. अर्थातच जिज्ञासा आणि भीती या दोन्ही भावनांच्या पोटी संशोधक वृत्ती जागी झाली आणि ग्रहणांचा अभ्यास सुरू झाला. आज मात्र अत्यंत प्रगत आणि आधुनिक विज्ञानाच्या मदतीने ग्रहणांची भाकिते करणे अगदी सोपे झाले आहे.
ग्रहण एक खगोलीय घटना आहे. एखादी खगोलीय वस्तू किंवा अंतराळ यान तात्पुरते दिसेनासे होते किंवा धूसर होते. हे दोन प्रकारे घडते. एकतर एखादी खगोलीय वस्तू किंवा अंतराळयान दुसर्या खगोलीय वस्तूच्या सावलीत येते तेव्हा आणि एखादी खगोलीय वस्तू आणि निरीक्षकाच्या दरम्यान दुसरी खगोलीय वस्तू येते किंवा मधून जाते तेव्हा. तीन खगोलीय वस्तूंचे हे संरेखन syzygy म्हणून ओळखले जाते. याव्यतिरिक्त लोकप्रिय शब्द आहे तो म्हणजे ग्रहण.
आपण ग्रहण हा शब्द बहुतांश सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांच्या बाबतीत जास्त वापरतो, परंतु दोन तारे, सूर्य आणि ग्रह, ग्रह आणि त्यांचे उपग्रह अशा वस्तूंमध्येदेखील ग्रहण होते. या घटना निरीक्षक सापेक्ष आहेत हे महत्त्वाचे! सूर्यमालेमध्ये सूर्य, पृथ्वी, चंद्र व इतर ग्रह यांच्या विशिष्ट स्थानांमुळे आपल्याला अवकाशात अनेक प्रकारच्या खगोलीय घटना दिसतात, जसे ग्रहण, पिधान आणि अधिक्रमण.
दर अमावास्येला ग्रहण का दिसत नाही?
सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या विशिष्ट स्थानामुळे आपल्याला अमावस्या, पौर्णिमा, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण अनुभवास येतात. ग्रहण हा केवळ सावल्यांचा खेळ आहे. ग्रहण म्हणजे ग्रासणे, खाणे किंवा झाकणे. जेव्हा चंद्रबिंब सूर्यबिंबाला झाकते तेव्हा आपण सूर्यग्रहण झाले असे म्हणतो. म्हणजेच चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये असायला हवा. ही वेळ केव्हा येते तर अमावास्येला.
मग प्रत्येक अमावास्येला ग्रहण होते का? नाही! सूर्य, चंद्र आणि पृथ्वी केवळ एका रेषेत असून चालत नाही तर त्यांचे प्रतलदेखील समान हवे. चंद्राची भ्रमणकक्षा व पृथ्वीची भ्रमणकक्षा यांच्या प्रतलांमधील कोन साधारण सव्वा पाच अंशाचा (५०९ इतका) आहे. त्यामुळे चंद्र, सूर्य आणि पृथ्वी जरी एका रेषेत असले तरी प्रत्येक वेळेस एका प्रतलात येऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येक अमावस्येला चंद्रबिंब सूर्याला झाकू शकत नाही. ते जेव्हा एका रेषेत आणि एका प्रतलात येतात त्याच दिवशी सूर्यग्रहण दिसते.
सूर्यग्रहणांचे प्रकार
सूर्यग्रहणांचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. सूर्याचे पूर्ण बिंब जेव्हा झाकले जाते तेव्हा त्याला खग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. जर सूर्याचा काही भागच झाकला गेला म्हणजे १ ते ९९ टक्के भाग झाकला गेला तर त्याला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यातील अंतर व आकार यामध्ये एक विलक्षण आश्चर्य दडलेले आहे. पृथ्वीपासून चंद्र जितक्या अंतरावर आहे त्याच्या ४०० पट अंतरावर सूर्य आहे आणि चंद्राच्या आकारापेक्षा सूर्याचा आकारदेखील ४०० पट आहे.
यामुळे पृथ्वीवरून आपल्याला सूर्यबिंब आणि चंद्रबिंब साधारण सारख्याच आकाराचे दिसतात आणि म्हणूनच ते एकमेकांना पूर्णपणे झाकू शकतात. अशा स्थितीतदेखील नेहमी खग्रास स्थिती असते असे नाही. याचे कारण म्हणजे चंद्र हा पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असतो आणि त्यामुळे तो कधी पृथ्वीच्या जवळ असतो तर कधी लांब असतो. त्यामुळे चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर नेहमी बदलत असते. तो कधी पृथ्वीच्या सर्वात जवळ म्हणजे उपभू स्थानी असतो (३,६३,३०० ते ३,५६,४०० किमी अंतरावर) तर कधी तो सर्वात दूर म्हणजे अपभू स्थानी (४,०६,१०४ ते ४,०६,७०० किमी अंतरावर) असतो. जेव्हा चंद्र उपभू स्थानी असतो तेव्हा चंद्रबिंब हे सर्वात मोठे दिसते.
याविरुद्ध अपभू स्थानी असताना चंद्रबिंब लहान असते. चंद्र जेव्हा पृथ्वीपासून लांब असतो तेव्हा तो सूर्यबिंबाला पूर्ण झाकत नाही आणि त्यामुळे आपल्याला ग्रहण स्थितीमध्ये सूर्यबिंबाची बांगडीसारखी तेजस्वी कड दिसते. सूर्याच्या या कड्याला अग्निकंकण (Ring of Fire) म्हणून संबोधले जाते आणि या ग्रहणाला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.
खग्रास किंवा कंकणाकृती ग्रहण केवळ काही भागातूनच दिसू शकते. चंद्राच्या दोन प्रकारच्या सावल्या पाहायला मिळतात. एक म्हणजे गडद छाया किंवा प्रछाया आणि दुसरी उपछाया किंवा विरळ छाया. ग्रहणाच्या वेळेस चंद्राची गडद छाया पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते, त्या ठिकाणी आपण सूर्य पूर्ण झाकलेला म्हणजेच खग्रास सूर्यग्रहण पाहू शकतो, तर ज्या ठिकाणी उपछाया पडते त्या ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण पाहू शकतो. एकदा झालेले ग्रहण विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा होते. या चक्राचा अभ्यास एडमंड हॅले या शास्त्रज्ञाने मांडला व त्याला सेरॉस ग्रहणचक्र असे म्हटले.
डोळ्यांची काळजी
कधीही नुसत्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नका. सूर्यग्रहणामध्ये सूर्याचा प्रखर प्रकाश चंद्रबिंबामुळे झाकला जातो आणि त्यामुळे डोळ्यांना हा फरक प्रकर्षाने जाणवतो. सूर्यप्रकाश आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. आपले डोळे पृथ्वीवर पोहचणार्या सामान्य सूर्यप्रकाशाला सरावलेले असतात. सूर्यग्रहणाच्या वेळी प्रकाशाच्या तीव्रतेमध्ये अचानक होणार्या बदलांमुळे डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळे सूर्याकडे थेट पाहणे डोळ्यांना इजा निर्माण करते. याने अंधत्व येण्याची शक्यता असते. या काळामध्ये डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असते. सूर्यग्रहण पाहण्यासाठी विशिष्ट प्रकारचे गॉगल्स मिळतात. यामध्ये मायलर फिल्टर्स वापरलेले असतात.
खग्रास सूर्यग्रहणात चंद्रबिंब जेव्हा सूर्यबिंबाला संपूर्ण झाकू लागते तेव्हा सूर्याचा अखेरचा प्रकाशकिरण बाहेर पडतो तेव्हा सूर्याची देखणी हिर्याची अंगठी दिसते. चंद्रावर अनेक विवरे असल्याने खग्रास स्थितीमध्ये सूर्यप्रकाश या विवरांमधून बाहेर पडतो आणि तो मण्यांसारखा दिसतो. हे बेली नावाच्या शास्त्रज्ञाने शोधले म्हणून याला ‘बेलीचे मणी’ असे म्हणतात.
सूर्याचे प्रभामंडल आपल्याला फक्त खग्रास स्थितीत दिसते. तसेच सौर ज्वालादेखील दिसतात. खग्रास स्थितीत सूर्य असताना अगदी गडद अंधार पडतो. पक्षी गोंधळून चिवचिवाट करू लागतात. वनस्पतीदेखील आश्चर्याने कोमेजून जातात. दिवसा तारे आणि ग्रह दिसतात. या काळात प्रभामंडलाचा, सौर वारे, औष्णिक वारे तसेच कोरोनल मास इंजेक्शन यांचा संशोधक अभ्यास करतात.
हे ग्रहण मेक्सिको, डुरांगो, कोहुइला, टेक्सास, ओक्लाहोमा, आर्कान्सा, न्यू हॅम्पशायर, यूएस, ओंटारियो, क्यूबेक, न्यू ब्रन्सविक, प्रिन्स एडवर्ड आयलंड, नोव्हा स्कॉशिया, कॅनडा येथून दिसणार आहे. वेध दुपारी ३ वाजून ४२ मिनिटे आणि ७ सेकंदांनी लागतील. चंद्रबिंबाचा सूर्यबिंबाला पहिला स्पर्श दुपारी ४ वाजून ३८ मिनिटे आणि ४४ सेकंदांनी होईल.
सर्वोच्च खग्रास स्थिती ६ वाजून १८ मिनिटे आणि २९ सेकंदांनी दिसेल. चंद्रबिंबाचा सूर्यबिंबाला अंतिम स्पर्श ७ वाजून ५५ मिनिटे आणि २९ सेकंदांनी होईल. तसेच ८ वाजून ५२ मिनिटे आणि १४ सेकंदांनी वेध सुटतील. भारतामध्ये पुढील सूर्यग्रहण २० मार्च २०३४ रोजी जम्मू आणि काश्मीरमधून दिसणार आहे. हेदेखील दीर्घकाळाचे असून ४ मिनिटे आणि १ सेकंद दिसेल. तुम्ही कोठे जाणार आहात? अमेरिका की जम्मू आणि काश्मीर?