घरफिचर्ससारांशकोरोनाने शिक्षक घडले, विद्यार्थी बिघडले

कोरोनाने शिक्षक घडले, विद्यार्थी बिघडले

Subscribe

जिल्हा परिषद, महापालिका शाळांना विद्यार्थी मिळत नाहीत. श्रीमंत घरातील मुले चांगले शिक्षण घेतील. वाटेल त्या शाळेत शिकतील. पण गरिबांच्या मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकांना थोड्या टाचा उंच कराव्याच लागतील. ‘टाचा उंच केल्याशिवाय चांदण्या खुडण्याचं भाग्य लाभत नाही,’ याचे भान ठेवूनच शिक्षकांना आपली जबाबदारी पार पाडावी लागेल. कोरोनाच्या काळात अनेक शिक्षकांनी हे व्रत जोपासले. गावात, वाड्या-वस्त्यांवर जावून विद्यार्थ्यांना शिकवले. लॉकडाऊनच्या काळात आणि अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही अनेक शिक्षकांनी, शिक्षण संस्थांनी आपल्या पातळीवर योग्य ती काळजी घेऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कार्य महत्प्रयासाने साध्य केले. त्यांच्या या जिद्दीला सलामच आहे.

कोरोना या वैश्विक महामारीने सर्वच क्षेत्रे अडचणीत सापडलेली असताना यातून बाहेर पडण्यासाठी आजवर मार्गक्रमण न केलेल्या मार्गांनी अनवाणी पायांनी चालावे लागले. काही क्षेत्रातील व्यक्ती यात अडखळ्या, पडल्या तर काहींनी या अडचणींवर प्रभावीपणे मात केली. यातील एक घटक म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी. कोरोनाच्या काळात आलेल्या असंख्य अडचणींवर मात करण्यासाठी अनेक शिक्षक टेक्नोसॅव्ही झाले. आपण कल्पनाही केली नसेल की गणित, विज्ञान, इंग्रजी आणि चित्रकला यांसारखे विषय ऑनलाईन शिकवले जाऊ शकतील, ही किमयादेखील कोरोनाने साध्य करुन घेतली. शिक्षकांनी आत्मसात केली आणि ऑनलाईन शिक्षणाचे द्वार उघडे झाले. विद्यार्थी वर्गात बसण्यापेक्षा ऑनलाईन शिक्षण घेऊ लागले. ऑनलाईन शिक्षण प्रणाली प्रभावी ठरली नाही, हे निर्विवाद सत्य असले तरी त्यामागील कारणे ही मूलभूत सुविधांचा अभाव, असेच दिसून येते. शिक्षक दिनाच्या निमित्ताने कोरोना काळातील शिक्षण आणि शिक्षक या विषयावर प्रकाशझोत टाकण्याचा हा प्रयत्न.

शिक्षणाला वाघिणीचे दूध संबोधले जाते. परंतु, आपल्या देशात निवडणुका होऊ शकतात, धार्मिक सोहळे उत्साहात पार पडतात. राजकीय कार्यक्रमांवर अजूनही पाहिजे त्या प्रमाणात बंदी आलेली दिसत नाही. पण परीक्षा रद्द होतात. पुढे ढकलल्या जातात. शिक्षणाकडे अशा नकारात्मक पद्धतीने बघण्याची पद्धती रुढ झाली तर एकूणच शिक्षणाचा बोजवारा उडेल आणि त्याची गुणवत्ताही ढासळेल. गुणवत्ता नसलेले शिक्षण घेऊन बेरोजगारी वाढणार नाही तर दुसरे काय होईल.

- Advertisement -

मार्च 2020 मध्ये भारतात कोरोनाची साथ आली आणि सर्व स्तरांतील शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला. कोरोनाची तिसरी लाट येणार म्हटल्यावर आता नेमके काय होणार या भीतीने प्रत्येकाच्या मनात काहुर माजले आहे. अशा भयावह परिस्थितीत शाळा कशा सुरू करायच्या हा राज्यातील सरकारपुढे गंभीर पेच निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना अवघड वाटणारे इंग्रजी, गणित, विज्ञान यांसारखे विषय प्रत्यक्ष शिकवले गेले. याच विषयांच्या शिक्षकांना शाळा, महाविद्यालयात नियमित यावे लागले. उर्वरित शिक्षकांनी ‘वर्क फॉम होम’ किंवा ऑनलाईन शिकवले. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सवयच राहिली नाही तर, पालकही त्यांना शाळांमध्ये पाठवण्याचा आग्रह धरणार नाही. भविष्यात फक्त ऑनलाईन शिक्षणाचा ‘ट्रेंड’ सुरू झाला तर तंत्रस्नेही नसलेल्या शिक्षकांना नोकरीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सद्यस्थितीला शिक्षण संस्था चालवणे डोईजड झाले आहे. इंग्रजी माध्यम शाळा मनाप्रमाणे शुल्क आकारणी करुन विद्यार्थ्यांना शिकवतात. या तुलनेत विनाअनुदानित खासगी शिक्षण संस्थांना हा आर्थिक डोलारा आता पेलवत नसल्याचे उघडपणे दिसून येते. जिल्हा परिषद, महापालिका शाळांना विद्यार्थी मिळत नाहीत.

श्रीमंत घरातील मुले चांगले शिक्षण घेतील. वाटेल त्या शाळेत शिकतील. पण गरिबांच्या मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकांना थोड्या टाचा उंच कराव्याच लागतील. ‘टाचा उंच केल्याशिवाय चांदण्या खुडण्याचं भाग्य लाभत नाही,’ याचे भान ठेवूनच शिक्षकांना आपली जबाबदारी पार पाडावी लागेल. कोरोनाच्या काळात अनेक शिक्षकांनी हे व्रत जोपासले. गावात, वाड्या-वस्त्यांवर जावून विद्यार्थ्यांना शिकवले. लॉकडाऊनच्या काळात आणि अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही अनेक शिक्षकांनी, शिक्षण संस्थांनी आपल्या पातळीवर योग्य ती काळजी घेऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कार्य महत्प्रयासाने साध्य केले. त्यांच्या या जिद्दीला सलामच आहे. केवळ सुटी आहे म्हणून वेळ वाया घालवायची आणि शासनाने घेतलेल्या निर्णयांना विरोधच करत बसायचा, या अपप्रवृत्तीने विचार करणार्‍या शिक्षकांच्या नाकर्तेपणामुळे कार्यतत्पर शिक्षकांवर बोट उचलण्याची वेळ येते. ज्या शिक्षकांनी जीवाची पर्वा न करता विद्यार्थ्यांचे शिक्षण अहोरात्र सुरू ठेवले, त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन आहे.

- Advertisement -

केवळ पुरस्कारांसाठी काम करण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या आवडीचा शिक्षक म्हणून लौकिक मिळवणारे आजही प्रसिध्दीपासून दूर असतात. शाळा सुरू झाली किंवा नाही, याचा त्यांना फारसा फरक जाणवला नाही. ऑनलाईन म्हणा किंवा ऑफलाईन कोणत्या तरी माध्यमातून त्यांनी शिक्षणाची गंगा वाहती ठेवली. आता शाळा सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. सांगली जिल्ह्यात शाळा 100 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यात शाळा सुरू करण्याची मागणी आता होत आहे. दिवाळीनंतर शाळा सुरू झाली तर काय फरक पडेल, असे विचार करणारेही शिक्षक अन् पालक आहेत. परिस्थितीत हाताबाहेर होती तेव्हा सर्व गोष्टी सांभाळणे आणि योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता होती. परंतु, आता दीड वर्षांपासून विद्यार्थी शाळेत आलेले नाही तर त्यांना शाळेची सवयच उरणार नाही. हातावर पोट भरणार्‍या गरीब कुटुंबातील मुले आजही रोजंदारीवर काम करतात. त्यांना शाळा सुरू होणे म्हणजे आपल्या कामातील अडथळा वाटतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण फारसं रुचलेलं नाही. त्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी संख्या टिकवणे आणि वाढवणे ही देखील यातून एक समस्या निर्माण होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत.

गेल्या वर्षी सर्व परीक्षा उशिरा झाल्याने, व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मुलांचे एक सत्र वाया गेले. जे चालू आहे ते ऑनलाइन. जरा विचार करा, प्रयोगशाळेविना अभियंते, डॉक्टर, तंत्रज्ञ कसे घडणार? याही वर्षी तेच चित्र आहे. अभ्यासक्रम उशिरा सुरू होण्याचे चक्र थांबले पाहिजे. शाळा व महाविद्यालये बंद आहेत; पण कुणीही थोडेदेखील शुल्क कमी केलेले नाही. ऑनलाइन शिक्षणासाठी मध्यमवर्गीय पालकांना मुलांना स्मार्ट फोन विकत घेऊन यावे लागले आणि इंटरनेटसाठी अजून पैसे खर्च. आधीच नोकरी-धंदा गमावलेल्या पालकांच्या खिशाला ही झणझणीत फोडणी आहे. हे सगळे उपव्द्याप करून मुलांचा अभ्यास म्हणावा तसा तर झाला नाहीच आणि परीक्षाही नाहीत. ऑनलाइन परीक्षा घरातून घेतल्यामुळे, त्यामध्ये विश्वासार्हता किती आहे, हे मिळालेल्या गुणांवरून आतापर्यंत कळले असेलच. वीस-बावीस दिवस चालणार्‍या परीक्षा, तज्ज्ञांची मते घेऊन कमी कालावधीत होऊ शकल्या असत्या. ‘इच्छा तिथे मार्ग’ याप्रमाणे, केंद्र व राज्य सरकारने आणि दोन्ही बोर्डांनी एकत्र प्रयत्न केले, असते तर परीक्षा घेणे कठीण नव्हते. लसीकरणाचे नियोजन करून, तिसर्‍या लाटेसाठी तरी शिक्षणासहित सर्व बाबतीत सज्ज व्हावे, म्हणजे दुसर्‍या लाटेसारखी तारांबळ उडणार नाही. भविष्यातील धोकेही टळतील आणि शिक्षणाचा चाललेला खेळ थांबेल.

शाळांपेक्षा कमी सुविधा असलेले खासगी कोचिंग क्लासेस अनेक महिन्यांपासून परवानगी मिळण्याची वाट बघत आहेत. त्यांना योग्यवेळी परवानगी मिळेलही. पण सरकारने शाळांना प्राधान्य दिले असून टप्प्याटप्प्याने त्या सुरू झाल्या तर शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, या भावनेतूनच निर्णय घ्यायला हवा. हा निर्णय योग्य की अयोग्य याचे मापदंड पूर्णत: शिक्षकांच्याच हाती असणार आहेत. मात्र, आपल्या शिक्षक संघटनांनी प्रथमत: शाळा सुरू करण्याच्या निर्णयास विरोध करतील. प्रायोगिक तत्त्वावर एक वर्ग किंवा तुकडी सुरू करुन त्याचा अभ्यास करण्याची हीच वेळ आहे. एखाद्या शाळेतील विद्यार्थी दुर्दैवाने कोरोनाबाधित झालाच तर त्याविषयी योग्य ती काळजी घेण्याची तयारी आता शाळांनी ठेवली पाहिजे. एकिकडे मुलांना कोरोना होत नसल्याचेही काही लोक छातीठोकपणे सांगतात. तर दुसर्‍या बाजूला विद्यार्थ्यांची काळजी वाहणारेही आहेत. त्यामुळे या दोघांच्या समन्वयातून योग्य तोडगा काढून शिक्षण अविरतपणे सुरू ठेवण्याची ‘हीच ती वेळ’ म्हणावी लागेल. वर्ष वाया गेले तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर त्याचा निश्चितच परिणाम होईल. अनेक विद्यार्थी शाळेबाहेर राहण्याचीही शक्यता मुख्याध्यापकांनी व्यक्त केली.

रोजंदारीवर, घरकाम करणारे, भाजीपाला व्यवसाय किंवा हॉटेलमध्ये काम करणार्‍या लोकांना लॉकडाऊनच्या काळात खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यातून सावरण्याचे प्रयत्न अजूनही थांबलेले नाहीत. घरातील प्रत्येक व्यक्तिला काहीतरी कामधंदा करणे अपरिहार्य ठरले. जगण्याची भ्रांत असणार्‍या व्यक्तिंना शिक्षणाचे अप्रुप राहिलं का, हादेखील प्रश्न आहे. दुरस्थ शिक्षण पध्दतीचा प्रसार करणार्‍या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे प्रवेशही यंदा एक लाखाने कमी झाले आहेत. ही फक्त एका विद्यापीठाची व्यथा नाही. तर त्यापेक्षाही वाईट अवस्था ही अभियांत्रिकी महाविद्यालयांची आहे. नोकरीची शाश्वती वाटत नसल्याने पदविका आणि पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेशच घेत नसल्याने ही महाविद्यालये आता शेवटच्या घटका मोजत आहेत. या तुलनेत सर्वोत्तम महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून हुशार विद्यार्थ्यांमध्ये आजही ‘रेस’ लागली आहे. आयआयटी, आयआयएम यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेशाचे दिवास्वप्न अनेक विद्यार्थ्यांना भुरळ घालते. या संस्था म्हणजे फक्त श्रीमंत विद्यार्थ्यांची मक्तेदारे नव्हे, ही ओळख निर्माण करण्याचे खरे सामर्थ्य हे फक्त चांगल्या शिक्षकांमध्येच आहे. त्यासाठी चार भिंतींच्या शाळेत ज्ञानाचे धडे देण्यापेक्षा परिघाच्या पलिकडे शिकवण्याचे धारिष्ठ्य या शिक्षकांना दाखवावे लागेल.

कोरोना महामारीच्या पर्वकाळानंतर शाळा, महाविद्यालये सुरू करताना खरी आव्हाने ही शिक्षकांसमोरच असतील. वेळेचे योग्य नियोजन, मर्यादित विद्यार्थी संख्या, सोशल डिस्टन्सिंग ठेवल्यास शाळाही व्यवस्थितरित्या चालू शकतील. त्यासाठी शिक्षकांची मानसिक तयारी फक्त असायला हवी. पालकांमध्ये शाळांचे महत्व टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांना पुढाकार घ्यावा लागेल. जे विद्यार्थी शाळेत येऊ इच्छिता त्यांना शिकवण्याची तयारी ठेवली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी हा घरीच बसलाय असेही नाही. तो बाहेरगावी जातो, फिरण्याचा आनंद घेतो. त्याअर्थी विद्यार्थी व पालक हे फक्त शिक्षणापासून दूर पळत असल्याचे दिसते. काही व्यक्तींच्या दबावाला बळी पडून शाळा बंद ठेवण्याची भूमिका योग्य नाही. शाळा ऐच्छिक केल्यास विद्यार्थी हे निश्चितपणे प्रत्यक्ष शाळेलाच प्राधान्य देतील. ऑनलाईन शाळांचे अप्रुप संपल्यामुळे वैतागलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. त्यांना फक्त ऑनलाईनची सक्ती करुन वर्षे ढकलण्याचा विचार हा एकदिवस शाळांच्या मुळावर घाव घातल्याशिवाय राहणार नाही. शिक्षक हेच यातून योग्य मार्ग निवडतील. शिक्षकांना आयुष्यातील पहिला गुरू म्हटले जाते. गुरुजनांनी दाखवलेल्या मार्गावरच शिक्षण विभागाचे महत्व आजवर टिकून आहे.

कोरोना असेल किंवा सर्वसाधारण परिस्थिती, शिक्षकांचे कार्य हे आयुष्यभर आदर्शवत असते. विद्यार्थ्यांचे आयुष्य उज्ज्वल करणारे शिक्षकच देशाची भावी पिढी घडवतात. परंतु, इतरांचे आयुष्य घडवणार्‍या शिक्षकांना स्वत:च्या समस्या सोडवण्यासाठी ‘चिरीमिरी’ द्यावी लागते, तेव्हा खूप दु:ख होते. डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक इतकेच नव्हे तर राजकीय पुढारीही शिक्षकांच्या हाताखालून गेलेले असतात. या सर्वांचे गुरू म्हणून शिक्षक हे नेहमी आदर्शस्थानी राहिले पाहिजेत, अशा स्वरुपाचे कार्य शिक्षकांच्या हातून घडत रहावे, हीच माफक अपेक्षा!

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -