एखादा प्रादेशिक सिनेमा त्याच्या भाषेत प्रदर्शित होतो आणि नंतर केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर चालतो, अशी काही मोजकी उदाहरणं आपण गेल्या काही काळात पाहिली आहेत. कन्नड इंडस्ट्रीच्या बाबतीत हे केजीफ सिनेमा सोबत घडलं होतं, माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर या सिनेमाला देशभरातून प्रतिसाद मिळाला होता आणि नंतर आलेल्या केजीएफच्या दुसर्या भागाने कमाईचे नवीन विक्रम प्रस्थापित केले होते. काही महिन्यांपूर्वी चार्ली ७७७ नावाचा आणखी एक कन्नडा सिनेमादेखील असाच काहीसा गाजला होता, हिंदी पट्ट्यात या सिनेमाने केलेली कमाई अनेकांच्या भुवया उंचावणारी होती.
गेल्या महिन्यात रिषभ शेट्टी नावाच्या दिग्दर्शकाचा ‘कांतारा’ नावाचा सिनेमा कर्नाटकमध्ये प्रदर्शित झाला, तिथं त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून निर्मात्यांनी तो सिनेमा विविध एखादा प्रादेशिक सिनेमा त्याच्या भाषेत प्रदर्शित होतो आणि नंतर केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर चालतो, अशी काही मोजकी उदाहरणं आपण गेल्या काही काळात पाहिली आहेत. कन्नड इंडस्ट्रीच्या बाबतीत हे केजीफ सिनेमा सोबत घडलं होतं, माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर या सिनेमाला देशभरातून प्रतिसाद मिळाला होता आणि नंतर आलेल्या केजीएफच्या दुसर्या भागाने कमाईचे नवीन विक्रम प्रस्थापित केले होते. काही महिन्यांपूर्वी चार्ली ७७७ नावाचा आणखी एक कन्नडा सिनेमादेखील असाच काहीसा गाजला होता, हिंदी पट्ट्यात या सिनेमाने केलेली कमाई अनेकांच्या भुवया उंचावणारी होती. गेल्या महिन्यात रिषभ शेट्टी नावाच्या दिग्दर्शकाचा कांतारा नावाचा सिनेमा कर्नाटकमध्ये प्रदर्शित झाला, तिथं त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून निर्मात्यांनी तो सिनेमा विविध भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आणि त्या सिनेमाला सर्वच भाषेत उत्तम प्रतिसाद मिळाला.
आयएमडीबी रेटिंगपासून ते कमाईचे विविध रेकॉर्ड्स प्रस्थापित करणार्या या सिनेमाला इतका उत्तम प्रतिसाद मिळाला तरी कसा? १६ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने २०० कोटींचा टप्पा कसा पार केला? कुठल्या अशा गोष्टी होत्या ज्या या सिनेमाला खास बनवतात? असे प्रश्न मलाही पडले आणि त्याच प्रश्नांचं उत्तर शोधताना काही मुद्दे मला सापडले आहेत. ‘कांतारा’ सिनेमा हा मास्टरपीस मुळीच नाही, याची कथा जगावेगळी आहे असंही नाही, यात जे मुद्दे दिग्दर्शकाने मांडण्याचा प्रयत्न केलाय, ते मुद्दे या आधी कुणी मांडले नव्हते, असंही नाही. कांतारा हा एक उत्तम मनोरंजक चित्रपट आहे, जो एका मसालापटात आवश्यक असणार्या सर्व बाबींची पूर्तता करतो. दक्षिण भारतात शतकांपासून चालत आलेल्या लोककथा आणि परंपरा यांचं योग्य चित्रण करत, तसेच त्याला यथायोग्य सादरीकरणाची जोड देतं, पडद्यावर साकारलेली एक उत्तम कलाकृती म्हणजे कांतारा आहे.
कांतारा सिनेमाला एक यशस्वी व्यावसायिक सिनेमा बनवते ती या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी आणि बॅकग्राउंड म्युजिक, सोबत यात उभं केलेलं विश्व जे वर पाहता एक छोटंसं गाव असलं, तरी त्यातील विविध पात्रं प्रत्येक मार्गाने आपलं मनोरंजन करण्यासाठी सक्षम बनतात. अडीच तासांचा परिपूर्ण सिनेमॅटिक एक्सपीरियन्स देण्यात यशस्वी ठरल्याने सिनेमा संपल्यावर आपण हा सिनेमा इतरांना पाहण्यासाठी सुचवतो. आता हा सिनेमॅटिक एक्सपीरियन्स देताना त्यात लोककथा आणि मसाला यांचं प्रमाण सारखं असल्याने हा सिनेमा खास बनतो, तो कसा ? तर सिनेमात अॅक्शन आहे, रोमान्स आहे, कॉमेडी आहे आणि ड्रामादेखील आहे. सिनेमाची कथा यावेळी अनेकदा कुठे ना कुठे पाहिलेली किंवा वाचलेली आठवते, गाव आणि जमिनीसाठी गावकर्यांचा संघर्ष त्यांच्या संघर्षात उडी घेणारा नायक, नायकाच्या विरुद्ध खलनायकाच्या रूपात उभा राहणारा वनअधिकारी आणि नायकासाठी जीव की प्राण असणारी नायिका, हे आपण आधीही पाहिलंय.
पण कांतारा वेगळा ठरतो तो याच्या सादरीकरणामुळे, इथं सगळ्यांचं प्रमाण योग्य दिसतं, म्हणजे मसाला पटात लोककथा आणि परंपरा यांची सांगड घालताना कुणाचाही अतिरेक केलेला नाही. त्यांची मांडणी अगदीच साधी केल्यानं आपण त्या कथेशी आणि पात्रांशी लगेच कनेक्ट होतो. आपल्या समोर पडद्यावर जे घडतंय ते खरं आहे, असं आपल्याला वाटतं आणि म्हणून आपण अडीच तास खुर्चीशी खिळून राहतो. सिनेमात अनेक द्विअर्थी संवाद आहेत आणि ते ज्या पात्राच्या तोंडी दिलेत ते पात्रदेखील तसंच काहीसं वाटतं. बाकी सिनेमात नायकाच्या नावापासून ते त्याच्या आसपास असणार्या प्रत्येक पात्राचा धार्मिक संदर्भ आहे. नायकाचं नाव शिवा, नायिका लीला आणि जिथं दोघे एकटं भेटतात, ते झाडावरच घर म्हणजे कैलास… इतकंच नाही तर नायकाचा मित्र म्हणजे बैलाची ताकद असणारा बुल्ला, हे सगळं पाहताना आपल्या समोर काही काल्पनिक घडतंय असं आपल्याला वाटत नाही.
राम्पा नावाचा ठरकी मित्र आणि आपल्या पोराला कायम शिव्या हासडणारी कमला अर्थात शिवाची आई, ही सगळी पात्रं आपल्याला जवळची वाटतात आणि यासाठी लेखकाचं कौतुक करायला हवं. सिनेमाची दुसरी खासियत म्हणजे याला असलेला लोककथांचा आधार, रिषभ शेट्टीच्या बालपणातील कथेचा संदर्भ या सिनेमाच्या कथेला आहे असं म्हणतात. कांतारामध्ये जो भूतकोला नावाचा प्रकार दाखवण्यात आलाय, तो आजही कोस्टल कर्नाटक आणि तुलुनाडूच्या काही भागात आढळतो. सिनेमात ज्या दोन देवतांची नावं वारंवार कानावर येतात, त्या पिंजूर्ली आणि गुलिगा देवाची देखील लोककथा या भागात प्रचलित आहे. वराहअवतार आणि पिंजूर्ली यांचा तसा थेट संबंध नाहीये, सिनेमात जो कोला नावाचा प्रकार दाखवलाय, त्यासारखाच आपल्याकडं देखील काही लोककलाप्रकार आहेत, जे अनेक काळापासून चालत आलेत. लोकांच्या अंगात खंडोबा येणं किंवा देवी येणं ते आल्यानंतर त्यांना प्रश्न विचारून आपल्या प्रश्नांची उत्तर घेणं, हा प्रकार संपूर्ण देशभरात असाच आहे. फक्त कांतारामध्ये याचं सादरीकरण ज्या प्रकारे केलंय, त्यामुळे ते अधिक भावतं. सोबतच कोला करताना ज्या प्रकारचा मेकअप केलाय आणि जे पार्श्वसंगीत दिलंय, त्यामुळे ते बघायला मजा येते आणि सिनेमा खास बनतो.
क्लायमॅक्स जबरदस्त असला तर अनेकवेळा आधी काय घडलं हे आपण सहज विसरून जातो, कथेत सुरुवातीला काय घडलं यापेक्षा त्या कथेचा शेवट कसा झाला हेच आपल्याला सिनेमा संपल्यावर लक्षात राहतं. कांताराची तिसरी आणि सर्वात महत्वाची खासियत आहे ती म्हणजे या सिनेमाचा क्लायमॅक्स, गेल्या काही वर्षात पाहिलेल्या सिनेमांपैकी सर्वोत्तम क्लायमॅक्स हा या सिनेमाचा आहे. रिषभ शेट्टीचा अभिनय, सिनेमॅटोग्राफी आणि थ्रिलिंग म्युझिक यामुळे एका वेगळ्या लेव्हलचा क्लायमॅक्स आपल्याला अनुभवायला मिळतो, या क्लायमॅक्समधील अॅक्शन सीन्स इतके दमदार आहेत की, आपण सिनेमा संपल्यावरदेखील ते विसरू शकत नाही. पण तरीही कांतारा हा एक मास्टरपीस सिनेमा बनत नाही, कारण म्हणजे याची कथा… होय , कारण जी कथा एका वेगळ्या विषयासह सुरू होते,तीच कथा नंतर पूर्णतः व्यावसायिक आणि प्रेडिक्टेबल बनते.
आता जर कथा तशी बनली नसती तर कदाचित इतका उत्तम प्रतिसाद या सिनेमाला मिळाला नसता. दुसरं म्हणजे सिनेमात ज्या प्रकारे नायकाचं पात्रं दाखवलं आहे, ते पात्र काहीसं ग्रे वाटतं… वन अधिकार्याची बाजू आपल्याला कधी कधी योग्य वाटते आणि नायकाचं कायदा तोडणं चुकीचं वाटतं. काही प्रसंगदेखील असे आहेत ज्यात लॉजिक सापडत नाहीत, उदाहरणादाखल सांगायचं झाल्यास, शिवा वनअधिकार्याला मारायला निघतो दुपारी आणि गावात पोहचायलाच त्याला रात्र लागते…. आता ही रात्र केवळ अॅक्शन सीन्स रात्री उत्तम येतील म्हणून आणण्यात आलीये, हे कळतं. इतकं सगळं असलं तरीही कांतारा हा एक उत्तम सिनेमॅटिक एक्सपीरियन्स देणारा सिनेमा आहे, जो एका सामान्य सिनेरसिकाची निराशा करत नाही. बाकी मास्टरपीस किंवा कधीच न पाहिलेला सिनेमा असं काही जर कुणी म्हणत असेल तर ती मात्र अतिशोयक्ती ठरेल.