–स्मिता धामणे
शंखाकृती पर्वत शृंखलांना पार करत आम्ही पुढे पुढे जात होतो. यदुराजांच्या राजधानीचे ठिकाण ‘नंदप्रयाग’ अलकनंदा आणि मंदाकिनी संगम. अलकनंदा आणि नंदावती संगम ‘कर्णप्रयाग’ तर अलकनंदा आणि कर्णावती संगम ‘विष्णूप्रयाग’ म्हणून ओळखला जातो. नंतर पांडुकेश्वर, हनुमानचट्टी असा प्रवास करत साडेनऊ वाजता विशाल बद्रीनाथला पोहचलो.
मोठ्या आणि छोट्या चारधामांपैकी एक धाम, पंचबद्रीतील विशाल बद्री, भगवान विष्णूच्या आठ स्वयंभू तसेच १०८ दिव्यस्थानांपैकी एक स्थान. असा महामहिमा असलेले हे तीर्थस्थळ उत्तराखंड राज्यातील चमोली जनपद येथील ‘अलकनंदेच्या’ प्रवाहापासून फक्त ५० मीटर अंतरावरील उंच जमिनीवर विशेष म्हणजे नदीच्याच दिशेने प्रवेशद्वार असलेले बौद्धविहारासारखी स्थापत्यकला असलेले हे मंदिर दूरवरून आपले लक्ष वेधून घेते. आठव्या शतकात जगद्गुरू आदी शंकराचार्य ह्यांनी सहा महिने राहून सनातन हिंदू धर्माच्या जनजागृतीसाठी ह्या मंदिराचे पुनरूज्जीवन केले. तीर्थक्षेत्र म्हणून स्थापना करून कनकपाल या गढवाल राज्यकर्त्यांकडे व्यवस्थापनासाठी दिले. कालांतराने बद्रीनाथ हे नाव प्रचलित झाले. इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराच्या कलशावर सोन्याची छत्री चढवली होती.
भगवान शंकरांनी ह्या देवभूमीत विष्णू म्हणजेच बद्रीनाथांसाठी जागा उपलब्ध करून दिली होती म्हणून प्रथम केदारनाथ मग बद्रीनाथाचे दर्शन घेण्याची प्रथा पांडवांपासून आजतागायत सुरू आहे. गरम पाण्याच्या कुंडात स्नान करून खूप लांबपर्यंत असणार्या दर्शन रांगेत आम्ही उभे राहिलो. मंदिराच्या मागच्या बाजूला असलेला ‘नीळकंठ’ पर्वत आणि त्याचा सारा गोतावळा दाट धुक्याचा पडदा बाजूला सारून अधूनमधून दर्शन देत होते. दोन -अडीच तास रांगेत उभे राहिल्यानंतर ‘सिंहद्वार’ प्रकारातील प्रवेशद्वारातून जात असताना दरवाजावरील तीन सोनेरी कलश आणि छताच्या मध्यभागावरील विशाल घंटा आपले लक्ष वेधून घेते. सभामंडप, दर्शनमंडप, गर्भगृहातील बद्रीनारायणाची साधारण एक मीटर उंची असलेल्या शालिग्राम मूर्तीच्या दर्शनाने सारा थकवा नाहीसा झाला. भगवान विष्णूसोबत नारद, उद्धव आणि नरनारायणाच्या मूर्ती आहेत. मंदिराभोवती नारायणाचे वाहन गरूड, लक्ष्मी आणि नवदुर्गा आहेत. देवाच्या चार प्रमुख निवासस्थानांपैकी एक पवित्र स्थान का आहे ह्याची अनुभूती प्रत्यक्ष दर्शनानेच आपणास होते.
पृथ्वीवर गंगा नदीच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी बद्रीनाथ मंदिरात माता मूर्तीचा मेळा हा महोत्सव बद्रीनाथाच्या आईची पूजा करून केला जातो. मुख्य मंदिरापासून ३ किलोमीटर अंतरावर नारायणाच्या मातेचे छोटेसे मंदिर आहे. भाद्रपदातील द्वादशीला मेळा भरतो तेव्हा स्वयं नारायण मातेच्या दर्शनाला येतात अशी आख्यायिका आहे. खरोखर आपला हिंदू सनातन धर्म कृतज्ञता आणि विनम्रता शिकवणारा अत्यंत महान असा धर्म आहे. जून महिन्यात बद्रीकेदार हा महोत्सव केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरात लाखो देशविदेशातील भक्तांच्या उपस्थितीत साजरा केला जातो.
पुरातन वैदिक काळापासून आपल्या हिंदू संस्कृतीत स्त्रियांचे ज्ञान आणि कर्तृत्व अचाट आणि अफाट असे आहे. भगवान विष्णू ध्यानस्थ बसले असताना अत्यंत हुशारीने माता लक्ष्मीने बद्री वृक्षाच्या रूपात भगवान विष्णूचे रक्षण केले. त्यांनी प्रसन्न होऊन त्या ठिकाणाला ‘बद्रिका आश्रम’ नाव दिले. मोठी बेरी म्हणून बद्री विशाल. बद्रीचा स्वामी म्हणून बद्रीनाथ म्हणतात. प्राचीन काळी प्रत्यक्ष सिद्ध गंधर्व येऊन बद्रीनाथाची पूजा करत असत. आता ‘रावल’ करतात. बाहेर येऊन नतमस्तक होताना जाणीव झाली…
देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी…
तेणे मुक्तीचारी… साधीयली…
बद्रीनाथाच्या दर्शनाची पवित्र स्पंदने आणि कृतार्थभाव सोबत घेऊन आम्ही अलकनंदेच्या समोरच्या किनारी असलेल्या माना आपल्या भारत-चीन सीमेवरील १०१३३.५ फूट उंची आणि लोकवस्ती असलेल्या शेवटच्या गावी जाण्यास निघालो. डोंगर उतरणीवरची शेते मन आकर्षित करत होते, तर रानफुलांचा गंध चित्तवृत्ती उल्हासित करत होता. घरांच्या आजूबाजूला भाज्यांची शेती केली जाते. पर्यटनाच्या दृष्टीने उत्तम विकास होत आहे. स्वच्छता, टापटीप, नदीच्या बाजूने संपूर्ण बॅरिकेड्स, स्वच्छ प्रसाधनगृह, भरपूर दुकाने खाण्यापिण्याची, होमस्टेज. पारंपरिक ‘भूतीया’ जमातीच्या वनवासी स्त्रियांची कष्टाळू वृत्ती शेतीकामे, वीणकाम करून घराबाहेर लावलेल्या विणलेल्या वस्तूंच्या दुकानांमधून तसेच प्रत्येक घराबाहेरील भिंतीवर असलेल्या सुंदर ‘पेन्टिंग्स’मधून परावर्तीत होत होती. येथून जात असतानाच उजव्या हाताला ‘माता सरस्वती’ची सुंदर, नाजूक, पांढरीशुभ्र संगमरवरी मूर्ती कातळ डोंगरात दिसली.
पूजा करून नतमस्तक होऊन पुढे येताच दोन्ही बाजूंनी उचलल्या गेलेल्या कातळ डोंगरांच्या मागून अतिशय धसमसत आणि गर्जना करत येणारी सरस्वती अतिशय वेगाने येऊन स्वत:ला अलकनंदेत झोकून देते. हा संगम केशव प्रयाग होय. सरस्वती ही अलकनंदेची प्रमुख उपनदी असून तिचा उगम ‘रुपण ’.. हर.. की.. दून नावाच्या हिमनगातून होतो. ज्ञान, बुद्धी, संगीत आणि सृजनाची देवता असलेली सरस्वती चक्क १५०० किलोमीटर लांब आणि ३ ते १५ किलोमीटर रुंद आहे. भूकंपामुळे कातळ वर उचलले गेल्याने तिचा प्रवाह जमिनीत लुप्त झालेला दिसतो.
आता मातेचे फार मोठे मंदिर बांधकाम सुरू आहे. हे सर्व बघताना तिचे गार तुषार आम्हाला ताजेतवाने करून जात होते. स्वर्गात जात असताना बलशाली भीमाने मोठमोठ्या कातळशिळा उचलून आपल्या भावंडांसाठी आणि द्रौपदीसाठी बांधलेला पूल भीमपूल म्हणून ओळखला जातो. अत्यंत थकल्याने द्रौपदी स्वर्गापर्यंत जाऊ शकली नाही. भीमपुलापासून फक्त ५० मीटर इतक्याच अंतरावर तिचे जय माँ त्रिपूर बाला सुंदरी या नावाने छोटेसे मंदिर बांधलेले आहे. पळतच जाऊन दर्शन घेऊन आले.
प्रथम दुकानातील चहा आम्ही सर्वांनी घेतला. व्यास गुंफा, व्यास पोथी नावाचा डोंगर खरोखर छताची रचना ग्रंथाच्या पानांप्रमाणे असलेल्या कातळासमान आहे. विशालकाय पुस्तकच डोंगरावर ठेवल्यासारखी कातळरचना बघताना अद्भुत वाटत होते. खरोखर माझा हिंदू सनातन धर्म महान असल्याची ग्वाही आम्हास मिळत होती. येथेच महर्षी वेदव्यासांनी वेद, पुराणे, गणेशासोबत महाकाव्य महाभारत यांच्या रचना रचल्यात. बाजूलाच छोटीशी गणेशगुंफाही आहे. येथूनच ५ किलोमीटर पुढे वसुंधरा कुंड आणि २५ किलोमीटर पुढे स्वर्गारोहिणी आहे. येथील निर्मोही वातावरण अपार आनंद देत होते. सारं सारं नजरेत, मनात, हृदयात साठवून आठवण म्हणून काही वस्तूंची खरेदी करून भरलेल्या अंतःकरणाने परतीचा मार्ग धरला.
गाडीत आसनस्थ झाल्यावर सहजच मनात आले काय म्हणावे ह्याला. प्रथम दिवशीच पर्वत रांगेतून सुसाट वेगाने मोकाट आलेला मोठा दगड गाडीच्या जाड गजाला लागून शांत होऊन खाली पडतो. ह्या दहा दिवसात कृष्ण घनांचे तांडव, मेघराजाचा मेदिनीसोबतचा धसमुसळेपणा, वार्याचा जटा आपटणारा आडदांडपणा, थेंबांसोबत बेभान नाचणारा, मेघांच्या, पखवाजाच्या गर्जनेसोबत शंख फुंकणार्या रुद्रावतारापासून आम्ही वंचित राहिलो. कोठेही वादळ, घाबरविणारा पाऊस, अतिकडक ऊन, रस्ता बंद, दर्शन थांबले असे कोठेही झाले नाही. याउलट वैभवशाली हिमशिखरे, जंगले, कृतार्थतेने वाहणार्या पवित्र नद्या, दुधाळ, नजर तृप्त करणारे धबधबे, थंड बदलणारे वातावरण, कष्टप्रद परिस्थितीतसुद्धा भगवंताने दिलेले लोभस, कृतार्थ करणारे दर्शन.
खरोखरंच ह्या आठवणी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अशाच ताज्या अन् इतक्याच सुगंधीत राहून आनंद देत राहतील. जणू सर्व निसर्गाची सुखावह पाखर ब्रह्मा, विष्णू, महेशाने आमच्यावर धरली. आम्हास सुखरूप घरी पोहचवले.