काळाच्या ओघात हातातून सर्वकाही निसटून जात आहे. कधी-कधी असं वाटतं की, आपण संपणार्या काळाच्या उंबरठ्यावर आहोत की काय..? झोपताना उशाशी स्वप्न घेऊन पाहणारे आणि पूर्ण करणारे युवक. त्या स्वप्नांचा पाठलाग करताना हवालदिल झालेलं मन, अस्वस्थ करणारी आजची परिस्थिती. आणि या सगळ्यात आलेलं अपयश. आजच्या युवकांना एका वेगळ्या वाटेवर घेउन जात आहे. गेल्या दशकात किंवा एक ते दीड वर्षापूर्वी अनेकांनी खूप मोठी-मोठी स्वप्न पाहिली होती. महासत्ता भारतात आपणही वेगळी वाट निवडून स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतो. हा आशावाद प्रत्येकांच्या नजरेत दिसत होता. पण काळाची पावले ओळखता यावीत येवढे ज्योतिषशास्त्र कुणाकडेच नसते. अंदाज बांधता येतात. पण बांधलेले अंदाज चुकू शकतात. त्यांचा धांडोळा घेता येत नाही.
आपल्याला आलेल्या अपयशाचं खापर इतरांवर फोडू शकत नाही. आता समोर काय करावे..? याचे पर्याय आणि उत्तरं मिळत नाहीत. सर्व काही संपलं आहे. असंच वाटायला लागतं. कारण आपणच नाही तर आपल्यासारखे अनेकजण या विवंचनेत आहेत. काहींना मार्ग सापडतो पण वेळ गेलेली असते. अशातच जगण्याच्या सर्वच व्याख्या बदलतात. प्रेरणा म्हणून वाचलेली पुस्तके, पाहिलेले चित्रपट आणि आपल्या समोरील जिवंत उदाहरणं तेवढ्यापुरते ठीक वाटतात. पण ते आपल्याला आरसा दाखवू शकत नाहीत. अशा वेळी नेमके काय करावे याचे अनेक प्रश्न आपल्यासमोर रोज उभे राहतात. यातून नेमका मार्ग सापडेल का.? हे सध्यातरी आजूबाजूच्या परिस्थितीवरून लक्षात येत नाही; काही तरुण आहेत जे मार्ग शोधत आहेत. पण प्रत्येक वेळी काहीना काही अडचण असते. आजची सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजे कोरोना आणि लॉकडाऊन.
सगळेच मार्ग बंद होतात आणि आपण हतबल होतो. हाच अनुभव जवळपास सर्वांचाच आहे. ईथे दोन मित्रांचे प्रसंग सांगू इच्छितो. औरंगाबादचा एक मित्र आहे शिवाजी नावाचा. आयुष्यात कधीच हार न मानणारा. पण आज अवस्था वेगळी. मागच्या आठवड्यात चहाच्या टपरीवर चहा घेताना तो भेटला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. त्यानंतर त्याने मला विचारलं की लस घेतली का..? मी नाही असं उत्तर दिलं. त्यावर मी त्याला विचारलं तू घेतली का..? त्यावर तो म्हणाला ‘कोणी दिली तरी नाही घेणार’ आता. मी विचारलं पण का..? त्यावर तो बोलला, अरे आता जगूनही काय करू.., जे काही प्लॅन्स ठरवले होते ते सर्व धुळीला मिळाले. इंटरनेट कॅफे आणि झेरॉक्स शॉप उघडणार होतो. गेल्या वर्षी त्यासाठी बँकेकडून लोन पास करून घेतले. पण त्याच्या दहाच दिवसांनी कोरोना आणि नंतर वर्षभरापासून सुरू असलेले लॉकडाऊन, या सगळ्यात बँकेचे हप्ते, आत्ताच काही दिवसांपूर्वी माझी मोटर सायकल विकून काही हप्ते भरले. सध्या खूप टेन्शन आहे….यार आत्महत्या करावी वाटते कधी कधी.. पण आई-वडिलांकडे पाहून ते पण करता येत नाही. त्याच्या डोळ्यात आलेलं पाणी खूप काही सांगून गेलं.
दुसरा एक मित्र जो आज याच अवस्थेतून जातोय. स्वतः भेटायला आला आणि त्याचं दुःख तो सांगत होता. स्पर्धा परीक्षेची तयारी करता-करता एका स्पर्धा परीक्षेच्या क्लासवर राज्यशास्त्र आणि मराठी हे दोन विषय तो शिकवत होता. दोन तास लेक्चर घेऊन उरलेला वेळ स्वतःच्या अभ्यासासाठी. नंतर आणखी एका मित्राला घेऊन काही दिवसांनी स्वतःचा स्पर्धा परीक्षा क्लास सुरू केला. भांडवलाची जमवाजमव करून काही प्रवेश देखील मिळाले. पण त्यानंतर काही दिवसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या टाळेबंदीने सर्व हिरावून घेतले. आज ना उद्या परिस्थिती सुधारेल याच आशेवर जगतोय. सर्वच बंद असल्यामुळे उत्पन्नाचे कोणतेच साधन नाही. मित्रांना मदत मागितली त्यांनी मदत केली, पण त्यांनासुद्धा माझ्या सारख्याच मर्यादा आहेत. एमपीएससीची परीक्षा वारंवार समोर ढकलली जातेय. घरी शेती नाही. उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन उपलब्ध नाही. वय वाढत आहे. आई वडील आजही मोलमजुरी करतात. तेवढ्यात घरचा खर्चसुद्धा मागत नाही. त्यात माझ्यावर झालेलं कर्ज आणि बेरोजगारी, काय करावं काहीच सुचत नाही. एवढे बोलून त्याचंसुद्धा शेवटचं वाक्य तेच होत…. ‘यार जगायची इच्छा होत नाही तूच सांग काय करावे..?’
या दोघांची हतबलता पाहून मला खूप वाईट वाटलं. यांना समाज म्हणून आपण मदत करू. पण एवढ्या तुटपुंज्या मदतीने काहीच होणार नाही. माझ्या संपर्कातले हे दोघेच नाही तर आजूबाजूला असे खूप युवक आहेत. त्या सर्वांची अवस्था जवळपास हीच आहे. ग्रामीण भागात या सर्व गोष्टींना कंटाळून तीन-चार युवकांनी लॉकडाऊनच्या काळात स्वतःच जीवन संपवलं. कारणं सारखीच, पण त्यांना मार्ग मिळाला नाही. कदाचित तो त्यांचा मार्ग असेल. पण प्रत्येक वेळी स्वतःला संपवणं हा त्यावरचा उपाय असूच शकत नाही. हे दोन्ही मित्र समाजातील तमाम बेरोजगार आणि माझ्यासारख्या तरुणांचे प्रतिनिधित्व करतात. लॉकडाऊनपूर्वी कुणी तासिका तत्वावर शिकवत होते. कुणी तात्पुरती नोकरी करून खर्च भागवत होते. तसंच काहीजण खासगी कंपनीत नोकरी करत होते. तर कुणी फुल टाइम अभ्यास करत होते. हे सर्व यात आनंद शोधत असत. येणारं वर्ष आपलच आहे. हा आशावाद त्यांच्या डोळ्यात होता. आज ना उद्या नोकरी मिळेल. आपणही अधिकारी होऊ. अशी स्वप्न उराशी बाळगून क्षितिजाकडे पाहणारा हाच युवावर्ग आज उदासीन झाला आहे.
या आणि अशा युवकांच्या समस्या अनेक आहेत. याला जबाबदार कोण..? शासन, परिस्थिती, की स्वतः..? याचं उत्तर शोधण्यासाठी आता आपल्याकडे पुरेसा वेळ नाही. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच पावले उचलायला हवीत. उद्याची सशक्त पिढी वेगळा मार्ग स्वीकारत आहे. त्यांना थांबवणं आणि रोजगार उपलब्ध करुन देणं, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यांच्या हाताला काम द्यावं लागणार आहे. अन्यथा पहिले पाढे पंचावन्न याप्रमाणे आहे तीच परिस्थिती राहील. सोशल मीडियावर याच आशयाच्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. एखादा छोटासा विषाणू अनेकांच्या जगण्यातला अडथळा व्हावा. सर्वच नेस्तनाबूत करावं. आणि यशाचा मार्ग बंद करावा हे एक कारण असू नये. यासाठी वेळीच उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ दिशानिर्देश देऊन सांगत आहेत की प्रत्येक वेळी टाळेबंदी हा उपाय होऊ शकत नाही. काळाची पावले उचलून त्यावर मार्ग शोधावा लागणार आहे. मानसिक ताणतणावात जगणारी आजची तरुणाई भविष्याचा वेध घेण्यासाठी पॉझिटिव्ह असावी. अन्यथा उद्याचा सूर्य तसाच डोक्यावरून निघून जाईल, आणि भाकरीचा चंद्र पोटाला गाठ मारून, फक्त पहावा लागेल…!