घरफिचर्ससारांशसंमती बळजबरी होते तेव्हा...

संमती बळजबरी होते तेव्हा…

Subscribe

भारतीय दंड विधान संहिता कायद्यात दोन सज्ञान व्यक्तींनी संमतीने एकमेकांशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यास तो कायद्याचे कलम 376 प्रमाणे गुन्हा ठरत नाही. ही बाब सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ असली, पुढे जोडप्यात वाद झाला तर वादाचे रूपांतर तक्रारदार अनेक वेळा ‘संमती’ ऐवजी ‘बळजबरी’ या शब्दाचा वापर करते. अशा ‘प्रेमा’च्या त्सुनामीत अनेक निरपराध तरुणांना नाहक जेलची हवा खावी लागते. लग्नाचे आश्वासन, फसवणूक, शारीरिक संबंध आणि त्यातून झालेले बलात्काराचे आरोप ह्या गोष्टींचा परिणाम अनेकांना सामाजिक जीवनातून उठतो. अनेक तरुणांना प्रेम करावं की नाही ? भविष्यात आपल्यावरही असे आरोप होणार नाहीत ना? ह्याचाही विचार अनेक वेळा मनात येतो.

प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं, हे फक्त बोलण्यापुरते असतं, प्रेम युद्धात अडकलेल्या शरणार्थीची काय हालअपेष्टा तुरुंगात होते त्यांनाच ठाऊक. कधी कधी नितळ भावनेतून केलेले प्रेम पुढे काही कारणामुळे पातळ होत जाते. प्रेम हा विषय काचेच्या भांड्यासारखा, स्वच्छ आणि पारदर्शी वाटत असला तरी, परंतु संबंधांना तडा गेल्यानंतर ते तितकेच गुंतागुंतीचे ठरते. कधी-कधी त्यात चांगल्या प्रेमाची परिणती बलात्कारात नकळत होऊन जाते. त्याच्या अनुषंगाने वादाचे रूपांतर खून, आत्महत्या, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये रूपांतर होते. बलात्कार हा शब्द ऐकताना किळसवाणा वाटतो, त्यामुळे पीडित स्त्रीच्या सामाजिक, मानसिक भावना, चारित्र्य, शरीर, मनावर न भरून येणारा आघात होतो. परंतु तोच गुन्हा खोटा असेल तर त्याचा तितकाच आघात पुरुषावर होऊन त्याचे सामाजिक जीवन उद्ध्वस्त होऊन भविष्य बरबाद होते. त्यामागील वास्तव जाणून घेणे गरजेचे आहे.

तरुण-तरुणीमधील प्रेमाचे रुपांतर घनिष्ठ मैत्रीतून, परस्पराच्या आकर्षणातून ते शरीर संबंधापर्यंत पोहोचते. त्यातून अनेक वेळा असुरक्षित शारीरिक संबंधातून गर्भधारणा होते. त्यानंतर पुरुषास लग्नासाठी गळ घातली जाते. तसेच पालकत्वाची जबाबदारी घेण्यास सांगितले जाते, तेव्हा त्यास नकार दिल्याने शेवटी त्याचे रूपांतर बलात्काराच्या गुन्ह्यात परावर्तीत होते. मोठ्या शहरांमध्ये एकत्र काम करणारे किंवा कायम संपर्कात येणारे तरुण-तरुणी प्रेमात पडल्यानंतर हल्ली ‘लव्ह इन रीलेशनशिप’ मध्ये जोडले जातात. पुढे त्याचे रूपांतर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये होते. जो मॉडर्न काळात लग्नाला पर्याय समजला जाऊ लागला आहे, त्यात वाद झाल्यास अनेक वेळा त्याची परिणती बलात्काराच्या गुन्ह्यापर्यंत पोहोचते. प्रथमता लग्नाची मागणी केली जाते, त्यास नकार दिल्यास लग्नाचे खोटे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप होऊन अनेकांना जेलची हवा खावी लागते. त्यामुळे शारीरिक संबंध ठेऊन लग्नास नकार दिल्यास आपण फसवणूक आणि बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी होऊ का, असा अनेकांना प्रश्न पडतो. त्यामुळे खरंतर या गोष्टी टाळण्यासाठी कायदाही बघणे गरजेचे आहे.

- Advertisement -

15 दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेला निकाल रद्द करत शारीरिक संबंध प्रस्थापित करून कुणी लग्न करण्यास नकार दिल्यास फसवणूक मानता येणार नाही, असा निकाल देऊन आरोपीची निर्दोष मुक्तता केली. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, फसवणूक केल्याचे शेकडो गुन्हे एकट्या महाराष्ट्रात वर्षाला दाखल होतात. भादंवि कलम 376 खाली बलात्काराचा व कलम 420 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा हा तडजोडीस पात्र नसलेला फिर्यादी स्वतः गैरसमजातून तक्रार दिल्याचे मान्य करतो. साक्षीदार फितूर होऊ नये म्हणून न्यायाधीशासमोर फिर्यादीचा घेतलेला जबाब ती दबावात दिल्याचे सांगते. 90 टक्के प्रकरणे कोर्टाबाहेर तडजोडी करून संपवली जातात. शेवटी फितूर साक्षीदाराच्या साक्षीवर भर न देता न्यायाधीशाना आरोपीस संशयाचा फायदा देऊन निर्दोष सोडल्याशिवाय पर्याय उरत नाही. खटल्याचा निकाल देताना हल्लीच्या काळात फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये मोबाईल संभाषण कॉल डिटेल्स, फिर्यादीची वर्तणूक व चारित्र्य, आरोपीची वर्तणूक यासुद्धा गोष्टी न्यायाधीश विचारात घेतात.

अनेकदा शारीरिक संबंधांत मुलीची मूक संमती असते, परंतु नातेवाईक कौटुंबिक वादामुळे तिच्यावर दबाव आणून बलात्काराची फिर्याद द्यायला भाग पाडून प्रियकराला गंभीर गुन्ह्यात अडकवले जाते. अनेक वेळा आर्थिक प्रयोजनासाठी, हनीट्रॅप करून तरुणांना देहविक्री करणार्‍यांच्या मदतीने अशा गुन्ह्यांत गुंतवले जाते. तसेच आंतरजातीय विवाहामध्ये प्रतिष्ठेचा मुद्दा पुढे करून संमती या शब्दाऐवजी बळजबरी या शब्दाचा वापर करून बलात्कार व फसवणूक याबद्दल गुन्हा दाखल केला जातो. पुढे केस चालल्यानंतर आरोपीला त्याच्या प्रेयसीने गैरसमजुतीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास संमती दिली हे सिद्ध करण्यासाठी निर्णायक पुरावा नसल्यामुळे तसेच आरोपीने लग्नाचे खोटे आमिष दाखवून शरीरसंबंध प्रस्थापित केले, लग्न करण्याचे खोटे वचन देऊन फसवणूक केली या बाबी शाबीत न केल्यामुळे आरोपीची न्यायाधीश निर्दोष मुक्तता करतात. अनेक प्रकरणात अविवाहित आरोपी केस चालू असताना फिर्यादीशी लग्न करण्यास तयार असल्याचे सांगतात, त्यामुळे लग्नाचे खोटे आमिष दाखवले ही गोष्ट शाबीत होत नाही. तसेच अनेक वर्षे पतीपत्नीप्रमाणे नातेसंबंध ठेवल्यानंतर फसवणूक शाबीत करणे शक्य होत नाही.

- Advertisement -

खरंतर एकंदर बलात्काराच्या केसमध्ये राष्ट्रीय क्राईम रिपोर्टच्या आधारे जवळच्या नातेवाईक व ओळखीच्या लोकांकडून अत्याचार होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यात प्रेमसंबंध, व्यावहारिक, व्यावसायिक संबध, लग्नाचे खोटे आमिष दाखवून ठेवलेले संबध, एकमेकांचे आकर्षण, प्रेमभंग, आंतरजातीय प्रेमविवाह, इतर वाद अशा अनेक वेगळ्या बाजूची किनार आहे. त्या बाजूची सुद्धा तपासणी करण्याची जबाबदारी न्यायाधीश, पोलीस यंत्रणा व वकिलावर असून प्रकरणातील सत्यशोधन करणे मोठे आव्हान होऊन बसते. खरे काय आणि खोटे काय? हे फक्त अत्याचार करणारा आणि पीडितेलाच माहिती असते. सुरुवातीला सर्व काही आलबेल वाटत असताना अनेक वेळा सामान्य माणसे प्रेम म्हणता म्हणता, त्यात भरकटत जाऊन नकळत मोठ्या गुन्ह्याची शिकार होऊन बसतात. कधीकधी स्वप्नात दिसणार्‍या ‘बेड्या’ प्रत्यक्ष हातात पडतात आणि माणूस एका मोठ्या षङ्यंत्राचा भाग बनून फसून जातो. त्यामुळे प्रेम करताना तितकेच डोळस आणि संवेदनशील मनाने केले पाहिजे. अन्यथा संमतीऐवजी बळजबरी हा शब्द वापरून तुरुंगामध्ये कैदी म्हणून रवानगी व्हायला नको इतकेच.

–अ‍ॅड – गोरक्ष कापकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -