– विजय गोळेसर
श्रीलंका इंटरनॅशनल रामायण रिसर्च सेंटर आणि श्रीलंका पर्यटन मंत्रालय यांनी श्रीलंकेत रामायण काळाशी संबंधित ५० ठिकाणे शोधली आहेत. रामायणात उल्लेख असलेली ही ठिकाणे पुरातत्ववेत्ते आणि इतिहासतज्ज्ञ यांनीदेखील खरी असल्याचे सांगितले आहे.
श्रीलंकेत जेथे रावणाची सोन्याची लंका होती, अशोक वाटिका जेथे रावणाने सीतेला लपवून ठेवले होते, राम रावण यांचे युद्ध झाले ती भूमी, रावणाची जमिनीखाली ८०० फुटावर असलेली गुफा, रावणाची चार विमानतळं, रावणाचा अभेद्य ९०० खोल्यांचा महाल एवढंच नाही तर रावणाचे शव देखील सापडले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
ही सर्व ठिकाणं आता पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. यातील बहुतेक स्थानं श्रीलंकेच्या मध्यभागी असलेल्या नुवारा एलिया या शहराजवळच आहेत. ‘नुवारा एलिया’ हे श्रीलंकेतलं महत्त्वाचं शहर आहे. येथे पर्यटकांसाठी भोजन व निवासाच्या उत्तम सुविधा उपलब्ध असून बसेस आणि बसमार्गदेखील अत्यंत चांगले आहेत.
लंका हे पूर्वी कुबेराचे राज्य होते. रावणाने कुबेराला हटवून लंकेचे राज्य व कुबेराचे सर्व वैभव हस्तगत केले. कुबेराकडे पुष्पक नावाचे विमान होते तेही रावणाने हिसकावून घेतले. रामायणात उल्लेख असलेले हेच ते पुष्पक विमान! हे विमान इच्छेनुसार लहान मोठे करता येत असे तसेच ते मनाच्या वेगाने आकाशात उडत असे, असे म्हणतात.
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ यांनी बनविलेल्या प्लॅनेटेरियम सॉफ्टवेअरवरून रामायण कालातील अनेक घटनांची कालगणना करण्यात आली आहे. या सॉफ्टवेअरनुसार इ.स. पूर्व ५०७६ वर्षांपूर्वी रामाने रावणाचा वध केला असे सांगितले जाते.
रामसेतू ५ दिवसांत उभारला
रामायणात श्रीरामाने नल व नील यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो वानरांच्या मदतीने समुद्रावर ‘रामसेतू’ हा पूल बांधल्याचे लिहिले आहे. तीन दिवसांच्या शोधानंतर नल आणि नील यांना रामेश्वरमच्या पुढे समुद्रात अशी जागा सापडली जेथून लंकेत पोहचता येणे शक्य होते. येथून लंकेपर्यंत एक पूल निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या स्थानाला धनुष्यकोडी म्हणतात. नल आणि नील यांनी बनविलेला रामसेतू धनुष्याच्या आकाराचा होता म्हणून त्याला ‘धनुष्यकोडी’ असे म्हणतात
नल आणि नील यांनी ५ दिवसात ३० किमी लांब आणि ३ किमी रुंदीचा पूल तयार केलाअसे मानतात.
या पुलासाठी विशिष्ट प्रकारचा दगड वापरण्यात आला. वैज्ञानिक भाषेत त्याला, ‘प्यूमाइस स्टोन’ असे म्हणतात. पाण्यावर तरंगणारे हे दगड ज्वालामुखीतून जो लावारस बाहेर पडतो त्यापासून तयार होतात. प्यूमाईस दगडात अनेक छिद्र (स्पॉन्जी) असतात, त्यात हवा असते. त्यामुळे हे दगड पाण्यावर तरंगतात. या छिद्रात जसे पाणी भरते तसे ते पाण्यात बुडतात. यामुळेच काही काळानंतर रामसेतू पाण्यात बुडाला. धनुष्यकोडी येथे आजही समुद्रात रामसेतू अस्तित्वात असल्याचं विज्ञानाने सिद्ध केलं आहे
रावणाचे हवाई अड्डे!
श्रीलंकेतील नुवारा एरिया या पर्वतीय क्षेत्रांत महियांगनापासून १० किमी अंतरावर ‘वेरांगटोक’ नावाचे ठिकाण आहे. येथे रावणाचा हवाई अड्डा/विमानतळ होते. येथेच रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर पुष्पक विमान उतरवले होते. वेलाव्या आणि ऐला यांच्यातील १७ मैल लांब मार्गावर रावणाशी संबंधित अनेक वास्तूंचे अवशेष आजही पहायला मिळतात. श्रीलंकेतील रामायण रिसर्च कमिटीने अनेक वर्षांच्या संशोधनानंतर ही सगळी स्थानं शोधली आहेत आणि ही सर्व स्थानं रामायणकालीन असल्याचे सिद्ध केले आहे.
रावणाकडे चार विमानतळं होती, यातील उसानगोडा येथील हवाई अड्डा हनुमानाच्या लंका दहनामुळे तेव्हाच नष्ट झाला होता. रावणाचे हे चार हवाई अड्डे ‘उसानगोडा’, ‘गुरुलोपोथा’, ‘तोतूपोलाकंदा’ आणि ‘वारियापोला’ या ठिकाणी आढळले आहेत. रावण स्वत: उसानगोडा हवाई अड्ड्याचा उपयोग करीत असे. येथील रन वे लाल रंगात रंगविलेला होता. येथील आसपासचा भूभाग काळ्या आणि हिरव्या घासांनी आच्छादित होता. गेल्या ४ वर्षाच्या संशोधनातून हे चार हवाई अड्डे श्रीलंकेतील रामायण रिसर्च कमिटीला सापडले आहेत.
सीता एलिया
श्रीलंकेतील सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे सीता एलिया! याच ठिकाणी रावणाने माता सीतेला बंदी बनवून ठेवलं होतं. सीता मातेला सीता एलियातील एका वाटिकेत ठेवलं होतं. या वाटिकेला अशोक वाटिका म्हणतात. जगभरातील भाविकांना आणि पर्यटकांना या स्थानाविषयी विशेष आकर्षण आहे. वेरांगटोक येथून सीतेला जेथे नेण्यात आले त्या स्थानाचे नाव होते ‘गुरूलपोटा’. आता ‘सीता कोडवा’ नावाने ओळखले जाते. हे ठिकाण महियांगनापासून जवळ आहे. एलियापर्वत क्षेत्रातील एका गुफेत सीता मातेला ठेवण्यात आले होते तेच ठिकाण आता सीता एलिया नावाने ओळखले जाते.
येथे सीतेचे एक मंदिरदेखील आहे, हे मंदिर सीता अम्मन कोविले नावाने सुप्रसिद्ध आहे. सीता एलियात सीतेसोबत रावणाची भाची त्रिजटा हिला ठेवले होते. ती सीतेची काळजी घेत असे. तिला धीर देत असे.‘श्रीराम तुझी नक्की सुटका करतील याची खात्री त्रिजटा सीतेला द्यायची. सीता अम्मनकोविले हे ठिकाण नुवारा एलियाकडून ‘उदा’ घाटीकडे जाणार्या मार्गावर मुख्य रस्त्यापासून ५ मैल अंतरावर आहे.
या परिसरात आजही अशोकाची उंच उंच लाखो झाडे आहेत. पूर्वीपासूनच येथे अशोक वृक्षाची असंख्य झाडं असल्यामुळे या भागाला अशोक वाटिका म्हणत असावेत. सीता अम्मा मंदिराजवळून जी नदी वाहते तिचे नावही सीता आहे. या नदीचं स्वच्छ आणि शीतल जल पिणे लोक भाग्याचं समजतात. नदीच्या एका बाजूची माती पिवळ्या रंगाची तर दुसर्या काठावरची माती काळी आहे. हनुमानाने आपली जळणारी शेपटी येथे लावली होती असे सांगितले जाते.
इथल्या मोठमोठ्या खडकांवर हनुमानाच्या पावलांचे निशाण आहेत. कार्बन डेटिंगनुसार हनुमानाची ही पदचिन्ह सात हजार वर्षांपूर्वीची असल्याचं सांगितलं जातं.‘सीता अम्मन को विले’ मंदिरात राम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. या मूर्तीदेखील ५००० वर्षांपूर्वीच्या आहेत, असे म्हणतात. आज ज्या ठिकाणी सीतेचे मंदिर आहे तेथे ७००० वर्षापूर्वी एक विशाल वटवृक्ष होता. या वृक्षाखाली सीता माता बसायची असे म्हणतात.
रावण वॉटर फॉल, रावण गुफा…
श्रीलंकेत नुआरा एलिया पहाडांच्या आसपास रावण वाटरफॉल, रावण गुफा, अशोक वाटिका आणि आता खंडहर बनलेला विभीषण महाल ही प्राचीन स्थानं आहेत. पुरातात्विक संशोधनानुसार ही सर्व स्थाने रामायणकालीन असल्याचे कार्बन डेटिंगद्वारे सिद्ध झाले आहे.
अशोक वाटिकेतील सीता एलियाच्या परिसरातच ‘रावण एल्ला’ नावाचा धबधबा आहे. अंडाकृती खडकापासून सुमारे २५ मीटर म्हणजे ८२ फूट उंचावरून हा धबधबा अविरतपणे खाली कोसळतो आहे. अशा प्रकारचे असंख्य जलप्रपात किंवा धबधबे श्रीलंकेत आहेत. या धबधब्यापासून श्रीलंकेला लागणारी ८० टक्के वीज निर्मिती केली जाते.
रावण वॉटर फॉल नावाचा हा प्रचंड मोठा धबधबा घनदाट जंगलात आहे. येथे ‘सीता’ नावाचा एक पूलही आहे. याच परिसरात रावण एल्ला नावाची रावणाची गुफा आहे. समुद्र सपाटीपासून ही गुफा १४०० मीटर उंचीवर आहे. या गुफेत थंडगार शीतल पाणी आहे. श्रीलंकेतील बांद्रावेलपासून ११ किमी अंतरावर रावण एल्ला हे स्थान आहे.
द्रोणागिरीचा भाग संजीवनी पर्वत
रामायणातील अनेक घटना लंकेत घडल्याचे सिद्ध झाले आहे. रामायणाशी संबंधित जी स्थाने लंकेत आहेत त्यात ‘वानावतुना’ नावाचे एक ठिकाण आहे. हे स्थान उंच उंच डोंगर आणि घनदाट झाडांनी व्यापलेलं आहे. राम रावण युद्धात मेघनाद यांच्या एका बाणामुळे लक्ष्मण मुर्च्छित झाला. त्यावेळी राजवैद्याच्या सल्ल्याने हनुमान हिमालयातून संजीवनी वनस्पती आणायला गेले. त्यावेळी त्यांनी हिमालयातून अख्खा द्रोणागिरी नावाचा पर्वतच उचलून लंकेत आणला. त्यानंतर संजीवनी औषधामुळे लक्ष्मण शुद्धीवर आले.
हनुमानाने द्रोणागिरी पर्वत आणताना त्याचे काही तुकडे किंवा भाग वानावतूना पर्वतरांगांवर पडल्याचे विद्वान मान्य करतात. कारण येथे जी वनस्पती किंवा झाडं आहेत ती या भागात कुठेच आढळत नाहीत. फक्त, हिमालयात आढळणारी चुंबकीय शक्तीची ही झाडं वानावतूना पर्वतरांगावरच आढळतात. यामुळे हे स्थानदेखील रामायणकालीन असल्याचे मानले जाते.
संदर्भ: ‘रामायण की लंका’- डॉ. विद्याधर