घरफिचर्ससारांशपूजा असते आपल्यासाठी...

पूजा असते आपल्यासाठी…

Subscribe

देवाची पूजा कशी करावी याचे मार्गदर्शन बर्‍याच ग्रंथांमध्ये आहे. अगदी तशाच पद्धतीने पूजा झाली पाहिजे असं नाही. खरंतर कोणताच देव पूजा करा म्हणत नाही. पूजा ही देवासाठी नसतेच मुळी. ती असते आपल्यासाठी, आपलं मन प्रसन्न करण्यासाठी. आपण या कारणाने देवापुढे तासभर बसतो. कधी अथर्वशीर्ष, कधी रुद्रातील मंत्र म्हणतो. देवाला स्नान घालतो, छान लाल सुती रुमालाने देवाचं अंग पुसतो, अष्टगंधाचा टिळा लावतो, हळदीकुंकू लावतो, मग फुले वाहतो. त्यानंतर धूपदीप, नैवेद्य, आरती...

–सुनील शिरवाडकर

आमचे एक शेजारी होते. मला आठवतं ते रोज सकाळी १० वाजता पूजेला बसायचे. अगदी साग्रसंगीत पूजा चालायची त्यांची, दोन-अडीच तास. नंतर मग नैवेद्य वगैरे. त्यांची ही पूजा इतक्या वर्षांनंतरही म्हणजे जवळपास ४० वर्षांनंतरही मला आठवते याचं कारण म्हणजे टीव्ही. त्यांचं देवघर एक मोठ्ठा कोनाडा होता. इतका मोठा की त्या कोनाड्यात ते स्वत:सुद्धा बसत. तर त्या मोठ्ठ्या कोनाड्यात त्यांनी एक छोटासा टीव्ही बसवून घेतला होता. अगदी छोटा ब्लॅक अँड व्हाईट. एकीकडे पूजा, मंत्र, अभिषेक आणि दुसरीकडे टीव्ही बघणं. आरतीच्या वेळी मात्र तो टीव्ही बंद होई.

- Advertisement -

त्यांना याबद्दल बर्‍याच जणांनी टोकलं, टीकाही केली, पण त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. त्यांचं म्हणणं मी मनापासून पूजा करतो. माझ्या मनातला भाव महत्त्वाचा आणि माझा देव तो भाव जाणतो. त्यांची देवाला एकच प्रार्थना असायची…

‘तू पारोसा राहू नकोस…मला पारोसा ठेवू नकोस.’
याचाच अर्थ रोज स्नान करून तुझी पूजा करण्याइतपत मला फिट ठेव.

- Advertisement -

आणि खरंच आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ते पूजा करीत होते. स्नान करून पूजा करण्याएवढी त्यांची शारीरिक क्षमता अखेरपर्यंत टिकून होती. देवानं त्यांची प्रार्थना ऐकली होती. रोज पूजा करण्याचा नियम अनेकांचा असतोच. प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगळी, कालावधी वेगळा. कोणाची पूजा १५ मिनिटांत होते, तर कुणाला दोन तासही लागतात. कुणाला पूजा करताना मदतीसाठी बायको लागते. तिनं मागे बसून गंध उगाळून द्यायचं, फुलं हातात द्यायची, तीन पर्ण असलेली बेलाची पानं नीट निवडून द्यायची. काही जण पूजा झाली की तिथून लगेच उठून जातात, मग बायकोने बाकीचा पसारा आवरायचा.

एकाची पूजेची पद्धत काही औरच होती. तो ताम्हणात देव काढायचा आणि सरळ वॉश बेसिनखाली धरायचा अगदी भांडे विसळल्यासारखं. मग ते देव कोरडे करून हळदकुुंकू लावायचा, शिंपडल्यासारखं. फुलं वाहिली की झाली पूजा. अलीकडे काही जण खुर्चीत बसूनही पूजा करतात. गुडघ्यांच्या प्रॉब्लेममुळे मांडी घालून बसता येत नाही. मग खुर्चीत बसायचं आणि पुढे टी पॉय ठेवायचा, त्यावर ताम्हण.

मंदिरांमध्ये पूजा करण्याची पद्धत वेगळी असते. तिथे देवाच्या मूर्तीला रोज मंगलस्नान म्हणजे पूर्ण अभिषेक घातला जात नाही. केली जाते फक्त पाद्यपूजा. फक्त एकादशी आणि सणांच्या दिवशी पूर्ण मूर्तीला अभिषेक केला जातो. गुरुचरित्रात एका अध्यायात पूजेबद्दल विस्ताराने मार्गदर्शन केलं आहे. पूजेला बसण्यासाठी कोणतं आसन घ्यावं इथपासून त्यात सांगितलं आहे. पळी पंचपात्र कुठे ठेवावं, निर्माल्य कसं काढावं, शंखपूजा, कलश पूजा, निरांजनाची पूजा करावी. ही पूर्वतयारी झाल्यावर मग चारी दिशांचं पूजन करावं. पुरुष सुक्तामधील वेगवेगळ्या ऋचा म्हणत अभिषेक करावा. त्यातही कोणत्या क्रिया करताना ऋचा म्हणाव्या हेही सांगितलंय.

अभिषेक झाल्यानंतर फुलं कशी वाहावी, कोणत्या देवाला कोणती पुष्पे अर्पण करावी, कोणती वर्ज्य करावी हे सांगितलंय. काही फुलं ही दुसर्‍या दिवशीदेखील शिळी समजली जात नाहीत हेही सांगितलंय. निरांजन ओवाळताना कोणता मंत्र म्हणावा आदी सगळं विस्ताराने सांगितलंय.

इतकी शास्त्रशुद्ध पूजा आजच्या जमान्यात तशी कठीणच, पण जशी जमेल तशी पूजा आजही घरोघर होतेच. व्यंकटेश स्त्रोत्रात तर अगदी थोडक्यात पूजेचं सुंदर वर्णन केलंय.

करुनी पंचामृत स्नान..शुध्दोदक वरी घालून
तुज करु मंगलस्नान..पुरुषसुक्ते करुनिया
वस्त्रे आणि यज्ञोपवीत..तुज लागी करु प्रित्यर्थ
गंधाक्षता पुष्पे बहुत..तुजलागी समर्पूं

धुप दीप नैवेद्य..फल तांबुल दक्षिणा शुद्ध
वस्त्रे भषणे गोमेद..पद्मरागादी करुनी
ऐसा षोडशोपचारे भगवंत.. यथाविधी पुजिला हृदयात
मग प्रार्थना आरंभिली बहुत.. वर प्रसाद मागावया.

पूजेचं असं वेगवेगळं वर्णन, मार्गदर्शन बर्‍याच ग्रंथांमध्ये आहे. अगदी तशाच पद्धतीने पूजा झाली पाहिजे असं नाही. खरंतर कोणताच देव पूजा करा म्हणत नाही. पूजा ही देवासाठी नसतेच मुळी. ती असते आपल्यासाठी, आपलं मन प्रसन्न करण्यासाठी. आपण या कारणाने देवापुढे तासभर बसतो. कधी अथर्वशीर्ष, कधी रुद्रातील मंत्र म्हणतो. देवाला स्नान घालतो. छान लाल सुती रुमालाने देवाचं अंग पुसतो. अष्टगंधाचा टिळा लावतो. हळदीकुंकू लावतो. मग फुले वाहतो. त्यानंतर धूपदीप, नैवेद्य, आरती…

असं सगळं झाल्यावर मग देवघरातील देवाचं ते रूप, नजर हटत नाही त्यावरून. कानात अजूनही ‘घालीन लोटांगण…’ मधील शब्द निनादत असतात. अष्टगंध, अत्तर, उदबत्ती, रंगीबेरंगी सुवासिक फुले या सर्वांचा संमिश्र दरवळ, देवाच्या कपाळावरचा तो ओलसर ताजा गंध आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवाच्या चेहर्‍यावरचं मंद स्मित, ते प्रसन्न सुहास्य. जणू देव सांगत असतो की, आता निशंक मनाने कामाला जा, मी आहे तुझ्यासोबत आणि साक्षात देव आपल्यासोबत असणं यापेक्षा अधिक आपल्याला काय हवंय? मानसिक बळ म्हणजे हेच तर असतं. पूजा करायची ती यासाठीच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -