घरफिचर्ससारांशबलात्कार आणि जातीचा काळोख

बलात्कार आणि जातीचा काळोख

Subscribe

निर्भया प्रकरणानंतर हाथरस बलात्कार घटनेने पुन्हा एकदा देश हादरला आहे. मात्र या प्रकरणाच्या मुळाशी जाताना भारतात आजही जातीयवाद किती खोलवर पसरला आहे, याची साक्ष पटते. ब्राम्हण आणि ठाकूर शेजार्‍यांनी पीडित कुटुंबाची विचारपूसही केली नाही. पीडितेचा भाऊ म्हणतो : कुणी साथ देणे तर दूरच राहिले, इथे आम्हाला कुणी बोललेदेखील नाही. आरोपीच्या वडिलांनी 20 वर्षांपूर्वी पीडितेच्या आत्याची छेड काढली होती, त्यानंतर आजोबांनी विरोध केला तर बोट कापले होते. दलित म्हणतात, ते लोक महिलांना त्रास देतात. बलात्कारातील आरोपीच्या कुटुंबाचा अहंकार पाहा, म्हणाले, आम्हाला त्यांच्याबरोबर बसायला-बोलायलाही आवडत नाही, आमची मुले त्यांच्या मुलीला स्पर्श करतील का? हाथरस गावातील हा रिपोर्ताज...

दिल्लीपासून साधारणपणे 160 कि.मी. अंतरावर हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेचे गाव बुलगारी आहे. चार चाकीने खेड्यात जाणे शक्य नव्हते, म्हणून मी तेथीलच दुचाकीवरील एका युवकाकडून लिफ्ट घेतली. त्याने बोलण्यास सुरूवात असे म्हणत केली की, ‘इथले लोक मरणे पसंत करतील, पण दुसर्‍या समाजासोबत उठणे-बसणे नाही.’ तो ठाकुर होता. मात्र, सामूहिक बलात्काराच्या घटनेबद्दल त्याने तीव्र खेद व्यक्त केला. तो पुढे म्हणाला, त्या दलित मुलीसोबत काहीतरी भयंकर वाईट झाले आहे. दिल्लीतही मी सफदरजंग रुग्णालयात पीडित मुलीच्या कुटूंबियांशी बोलत होते, तेव्हा तिचा भाऊ आणि वडील वारंवार जातीचा उल्लेख करत होते. मग माझ्या मनात हा प्रश्न येत होता की आपल्याकडे अजूनही इतका जातीयवाद आहे का? गावात पोहोचल्यावर या प्रश्नाचे उत्तरही सापडले. अटक केलेल्या आरोपींच्या कुटुंबीयातील लोकांना भेटले तर ते रुबाबात म्हणाले की, आम्हाला त्यांच्याबरोबर बसून बोलायलाही आवडत नाही, आमची मुले त्यांच्या मुलीला स्पर्श करतील का?

या ठाकूर आणि ब्राह्मण लोकसंख्येच्या गावात दलितांची मोजकीच घरे आहेत आणि त्यांचे जग वेगळे आहे. जातीयवादाची मुळे इथे खोलवर रुजलेली आहेत. लोक बोलता बोलताच जातीचा उल्लेख करतात. असे असूनही तथाकथित उच्चवर्णीय लोकांचे असे म्हणणे होते की, हे दलित कुटुंब अतिशय सज्जन आहे, ते कोणासोबत संबंध ठेवत नाही आणि द्वेष करत नाहीत. गावातील एक ठाकूर महिला सांगते, या कुटुंबातील लोक वयस्कर ठाकुरांकडे पाहून त्यांच्या सायकलवरुन खाली उतरतात आणि चालतात जेणेकरुन कोणत्याही ठाकूरला असे वाटू नये की ही माणसे आपल्या समोरुन चालत आहेत, आणि आपली बरोबरी करत आहेत.

- Advertisement -

येथे जातीयवाद इतका खोल रुजला आहे की, ब्राह्मण आणि ठाकूर शेजार्‍यांनी पीडित कुटुंबाची विचारपूसही केली नाही, त्यांच्या घरी जाणे, शोक व्यक्त करणे तर दूरची गोष्ट आहे. या घटनेनंतर मी पीडितेच्या भावाला विचारले की, गावातील लोक तुम्हाला साथ देत आहेत का, तर तो म्हणाला, ‘कुणी विचारपूसही केली नाही, साथ देण्याची तर दूरची गोष्ट आहे. येथे आमच्याशी कोण बोलते?’

पीडितेच्या वहिनीची अवस्था वाईट आहे. त्या पुन्हा पुन्हा ओरडून म्हणतात की, ‘आमच्या मुलीचा अखेरच्या वेळीही चेहरा पाहू दिला नाही. आतापर्यंत आम्हाला असे वाटत होते की, न्याय मिळेल, परंतु पोलिसांनी रात्री जे काही केले त्यानंतर सरकार व पोलिसांवरचा विश्वास कमी झाला. तसेच त्या म्हणतात की, ‘एखादी व्यक्ती इतकी अमानुष कशी असू शकते की एखाद्याला आपल्या मुलीचा चेहरासुद्धा पाहू दिला जात नाही. ती माझ्याबरोबर चोवीस तास असायची, तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर फिरत आहे.’ ‘मी तिच्याशी रुग्णालयातच बोलले होते, ती फक्त म्हणत होती की, मला घरी परत घेऊन जा, मी घरीच बरी होईल, मला हे अजिबात चांगले वाटत नाहीये, तिला जगायचे होते. आम्हाला तर कळत नाहीये की, दिल्लीच्या रुग्णालयात काय झाले की, तिचा मृत्यू झाला. आम्हाला आशा होती की, ती बरी होऊन घरी परतेल. दीदीला चांगले उपचार मिळाले नाहीत.’

- Advertisement -

मी त्यांना विचारले की, कधी तुम्ही मुख्य आरोपी संदीपविषयी काही तक्रार केली होती किंवा कधी त्याच्यासोबत बोलणे झाले होते का? तर त्या म्हणाल्या की, ‘तिचे कधीच संदीपसोबत कोणत्याच प्रकारचे बोलणे झाले नाही. सुरुवातीला पोलीस विचारत होते की, त्याचा नंबर आमच्या मोबाईलमध्ये आहे. पण ज्याच्याशी आम्हाला काही बोलायचे नाही, ज्याच्याशी आमचे काही घेणेदेणे नाही, त्याचा नंबर आमच्या मोबाईलमध्ये कसा असेल? आम्ही असे लोक दिसतो का की, बाहेरच्या लोकांशी संपर्क ठेवू? तो तर आमच्या जातीचाही नव्हता. दुसर्‍या जातीतील लोकांना आम्ही ओळखतही नाही. आमच्या घरातील बायका फक्त आपल्या कामापुरते बघतात. बाहेर कोण येतंय, कोण जातंय, त्यावर आम्ही लक्ष देत नाही. आमच्या घरात एकच फोन आहे, तोदेखील पापा किंवा भावाजवळ असायचा.’

त्या म्हणतात, ‘दीदी कधी-कधी चिंतेत दिसायच्या, पण त्यांना काय चिंता होती याविषयी त्या कधी बोलल्या नाहीत. त्या सकाळी चार वाजता उठून संध्याकाळपर्यंत घरातील कामामध्येच गुंतलेल्या होत्या. त्या थोड्या शांत-शांत राहायच्या पण कधीच याविषयी बोलल्या नाहीत. आम्हाला तर हेच वाटत होते की, पूर्ण दिवस काम करत असल्याने थकव्यामुळे त्यांचा चेहरा असा होत असेल. काही तरी असू शकते जे त्यांनी आम्हाला सांगितले नसेल.’

मीडियाचे कॅमेरे कसेतरी टाळून पीडितेची आई स्वयंपाकघरातील विखुरलेली भांडी जमा करण्याचा प्रयत्न करते. त्यांचे डोळे अश्रुंनी लाल झाले आहेत. घसा बसला आहे. त्या अनेक दिवसांपासून झोपू शकलेल्या नाहीत. त्या म्हणाल्या, जोपर्यंत मुलगी होती, तोपर्यंत स्वयंपाकघरात पाऊल ठेवत नव्हते, ती कशालाच हात लावू देत नव्हती. असे म्हणताना त्यांचा कंठ दाटून येतो आणि अश्रू बोलू लागतात. ज्या मुलीचा आपल्या घराबाहेरच्या जगाशी कोणताही संबंध नव्हता, तिच्या अशा वेदनादायी मृत्यूने कुटुंब संपूर्ण कोसळले आहे.

पीडितेचे कुटुंब आणि दलितांना भीती आहे की, एकदा मीडियाचे कॅमेरे येथून गेले तर त्यांना त्रास होईल. येथे दलितांजवळ जमीन नाही आणि या लोकांना तथाकथित उच्च जातीच्या लोकांच्या शेतातच काम करावे लागते. पशूंसाठी गवत कापण्यासाठीही त्यांच्याच शेतात जावे लागते.

मंगळवारी रात्री पोलीस जसे वागले, ज्या प्रकारे पीडितेच्या कुटूंबाला बळजबरीने घर बंद करुन मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यानंतर असुरक्षितता आणखी वाढली आहे. पीडितेच्या कुटूंबाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर पोलीस अधीक्षक विक्रांत वीर म्हणाले की, त्यांना सुरक्षा देण्यात आली आहे, पोलीस पुढेही तैनात राहतील. परंतु या विभाजित समाजात पोलीस किती काळ सुरक्षा पुरवू शकतील हा प्रश्नच आहे.

पीडित मुलीविषयी गावातील जेवढ्या लोकांशी बातचित केली ते सर्व एकच म्हणत होते की, ती खूप साधी मुलगी होती, घरातून खूप कमी वेळा बाहेर निघायची. कधी-कधी आपल्या आईसोबत गवत कापण्यासाठी जात होती. तेव्हाही कुणाशीच काहीच बोलायची नाही. शाळा-कॉलेजमध्ये ती कधी गेली नव्हती, म्हणून तिला बाहेरच्या जगाची जास्त माहिती नव्हती.

तिच्या निधनानंतर गावातील मुलींमध्ये, विशेषत: दलित कुटुंबातील मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांच्या चेहर्‍यावर भीती स्पष्ट दिसते. जेव्हा मी एका दलित मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती फारशी बोलली नाही. ती म्हणाली, ‘इतक्या चांगल्या दीदीसोबत एवढे वाईट झाले. आता शेतात जाण्याचे धाडस कोण करणार? पण जावे तर लागेलच. नाही तर ढोरं भुकेने मरतील .’

पीडित आणि आरोपीच्या घरांमध्ये फारसे अंतर नाही. आरोपीच्या घरात फक्त महिला आणि लहान मुले दिसतात. आपल्या घरातल्या मुलांचा बचाव करत असताना, ती वारंवार म्हणते की, या छोट्या जातीच्या लोकांशी तिच्या कुटुंबाचा काही संबंध नव्हता. जुन्या वादात आमच्या मुलांना फसवण्यात आले आहे. आपल्या मुलांचा बचाव करताना, ती महिला पीडितेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताना मागे पुढे पाहत नाही.

ज्या जुन्या वादाविषयी त्या बोलत होत्या त्याचा संबंधही छेडछाडीच्या घटनाशीच होता. पीडितेच्या आत्यासोबत आरोपीच्या वडिलांनी वीस वर्षांपूर्वी छेडछाड केली होती. तेव्हा पीडितेच्या आजोबांनी विरोध केला होता, तेव्हा त्यांची बोटे कापण्यात आली होती. गावातील लोक त्या घटनेचा उल्लेख करत म्हणतात की, आरोपींचे कुटुंब असेच आहे, हे लोक पहिल्यापासूनच महिलांना त्रास देतात. हे दादागिरी करतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरुन मारामारी करतात. यामुळे कुणीही त्यांच्याविरुद्ध बोलत नाही, पोलीस स्टेशनमध्ये जात नाहीत.

आरोपी रामूची आई म्हणते की, ‘ठाकूरांकडून नुकसानभरपाई मिळवण्यासाठी हे खालच्या जातीचे लोक आम्हाला खोट्या खटल्यांमध्ये अडकवतात. आम्हाला देवाच्या न्यायालयावर विश्वास आहे, आमचा कृष्ण देव न्याय करेल. माझा मुलगा त्या दिवशी ड्युटीवर होता. ज्याला शंका आहे त्यांनी कंपनीचे रजिस्टर पाहून यावे, परंतु आमचे कोण ऐकेल. प्रत्येकजण तर त्या कुटुंबासमवेत आहे. मंत्री-संत्री सर्व तिथेच जात आहेत. त्यामुळे सगळे आम्हालाच दोष देत आहेत.

या घटनेवर काहीजणांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे की, एफआयआर 3 वेळा बदलला गेला आणि पीडितेनेही निवेदन बदलले. या प्रश्नावर एसपी म्हणतात, ‘पीडितेने वक्तव्य केल्याप्रमाणे आम्ही केस दाखल केली. निवेदने व्हिडिओ रेकॉर्ड केली आहेत. महिला पोलिसांनी रुग्णालयात तिचे निवेदन नोंदवले आहे. तिने तिच्यासोबत सामूहिक बलात्कार झाल्याबद्दल सांगितले आहे. त्याच आधारे अटक करण्यात आली आहे.’

पीडित मुलगी यापूर्वी बलात्काराबद्दल का बोलली नाही, या प्रश्नावर तिची आई म्हणाली, तीन दिवसांनी जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिने सर्व काही सांगितले. पूर्ण जबाब दिला. तिला न्याय हवा होता. काल रात्री एसआयटीची टीमही या घटनेवरुन निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर गावात पोहोचली आहे. ती एका आठवड्यात अहवाल सादर करणार आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टही लक्ष ठेवून आहे. कलम 144 लागू करत पोलिसांनी हाथरसच्या हद्दी सील केल्या आहेत. माध्यमांना आता गावात जाऊ दिले जात नाही.

-पूनम कौशल

-(दिव्य मराठी वेबसाइटच्या सौजन्याने)

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -