-विजय गोळेसर
श्रीलंकेतील रामायण यात्रा दर्शन ३ भागात सादर करीत आहोत. सादर आहे लंकेतील रामायण भाग पहिला. रामायणामध्ये ज्याला लंका अथवा लंकापुरी म्हटलं आहे तो प्रदेश म्हणजे आजची श्रीलंका. श्रीलंका हा देश भारताच्या दक्षिणेला फक्त ३१ किमी अंतरावर आहे. इ. स. १९७२ पर्यंत श्रीलंकेचे नाव सिलोन होते. नंतर हे नाव बदलून ‘लंका’ करण्यात आले आणि १९७८ मध्ये याच्यापुढे सन्मान सूचक शब्द ‘श्री’ जोडण्यात आला.
तेव्हापासून या देशाचे नाव श्रीलंका असे झाले. लहानपणापासून रावणाच्या सोन्याच्या लंकेविषयी ऐकलं होतं. एकेकाळी रेडिओ सिलोनमुळे श्रीलंका संगीतप्रेमी कानसेनांचा जीव की प्राण झाली होती. ‘वाल्मिकी रामायण’ हा असा ग्रंथ आहे ज्यात सात हजार वर्षांपूर्वी श्रीलंकेचे सर्वप्रथम सविस्तर वर्णन लिहिले आहे. अशा प्रकारचा लिखित पुरावा जगातल्या इतर कोणत्याही देशाचा नाही.
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये श्रीराम आणि वानरसेना यांच्याद्वारे बनवलेला रामसेतू आजसुद्धा अस्तित्वात आहे. मंदिराच्या अभिलेखानुसार हा रामसेतू पूर्णपणे सागराच्या पाण्यावर स्थित आहे. श्रीलंकेमध्ये एकूण ९ राज्ये आणि २५ जिल्हे आहेत. हिंदी महासागरामध्ये श्रीलंकेचा आकार एखाद्या मोत्याच्या दाण्यासारखा दिसतो. यामुळे त्याला हिंदी महासागराचा मोती असेही म्हणतात.
अनुराधापूर हे श्रीलंकेचे प्राचीन शहर आहे. जवळ जवळ १४०० वर्षे अनुराधापूर लंकेची राजधानी होती. श्रीलंकेचे क्षेत्रफळ ६५,६१० चौ. किमी आहे आणि लोकसंख्या आहे दोन कोटी २२ लाख. आपल्या मुंबईची लोकसंख्या दोन कोटी १३ लाख आहे. कोलंबो हे श्रीलंकेतील सर्वात मोठे शहर आहे. श्रीलंकेतील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ कोलंबोत आहे. श्री जयवर्धनपूर कोहे, कोलंबो ही श्रीलंकेची राजधानी आहे.
श्रीलंकेची राजधानी कोलंबो समुद्र किनार्यावर आहे. हे सर्वात मोठे सागरी बंदर आहे. येथून १८० किमी अंतरावर नुवारा एलिया नावाचे ठिकाण आहे, जेथे रामायण काळातील महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. रावणाने सीतेला पंचवटीतून पळवून नेल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण यांनी तिला सर्वत्र खूप शोधले. सीतेचा शोध घेत श्रीराम किष्किंधा नगरीपर्यंत आले.
तिथे हनुमान व सुग्रीव यांच्या मदतीने त्यांनी वानरसेना एकत्र केली आणि लंकेवर स्वारी करून रावणाच्या कैदेतून सीतेची सुटका करण्याच्या इराद्याने ते सर्व रामेश्वरमपर्यंत आले. हा सगळा कथा भाग आणि श्रीराम वनवासात जेथे जेथे गेले त्या सर्व स्थानांचा परिचय आपण आजवर करून घेतला.
रामेश्वरमजवळ १५-२० किमी अंतरावर धनुष्यकोडी नावाच्या ठिकाणी समुद्र थोडा उथळ असल्याने नल व नील यांच्या मार्गदर्शनाखाली वानरसेनेने रामसेतूची निर्मिती केली आणि मग भगवान शंकराची पूजा व आराधना करून श्रीराम व लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वानरसेना रामसेतूवरून थेट रावणाच्या लंकेत जाऊन पोहचली.
रामायणात वाल्मिक ऋषींनी जे लिहिलंय त्या घटना व स्थानांचे अनेक पुरावे आजही श्रीलंकेत पाहायला मिळतात. आजही श्रीलंकेत श्रीराम, सीता, हनुमान, लक्ष्मण तसेच मंदोदरी यांच्यासंबंधी तीर्थ, गुफा आणि मंदिरं पाहायला मिळतात. हिंदू धर्माचा अभ्यास करणार्या अनेक संस्था आणि विद्वानांनी लंकेत जाऊन या सर्व स्थानांची शहानिशा केली आहे.
अनेक अभ्यासू आणि इतिहासतज्ज्ञांनी श्रीलंकेतील पर्वत, दर्या आणि जंगल पिंजून श्रीलंकेतील नऊ प्रांतांत रामायणासंबंधी अनेक स्थाने शोधून काढली आहेत. त्यातील अनेक श्रीलंकेच्या मध्य प्रांतात आहेत. यात सर्वात महत्त्वाचे आणि मोठे शहर आहे नुवारा एलिया. या नगराच्या आसपास अशोक वाटिका रावण गुफा, रावण जलप्रपात, हनुमानाची पावलं, रावणपुत्र मेघनादचे तपश्चर्या स्थान आणि राम-रावण युद्धाशी संबंधित अनेक स्थाने आहेत.
नुवारा एलिया नव्हे अशोक वाटिका : नुवारा एलिया कोलंबोकडून १८१ किमी, तर कॅन्डी येथून ७६ किमी अंतरावर आहे. नुवारा एलिया हे इंग्रजांच्या वेळेपासून श्रीलंकेतील लोकप्रिय हिल स्टेशन आहे. नुवारा एलिया हे तेच ठिकाण आहे, ज्याचा रामायणात अशोक वाटिका या नावाने उल्लेख आढळतो. येथेच रावणाने सीतेला लपवून ठेवले होते.
समुद्र सपाटीपासून ६२०० फूट उंचीवर हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथे दक्षिण भारतीय पद्धतीचे ‘सीता अम्मन मंदिर’ किंवा सिंहली भाषेत सांगायचे तर ‘सीता एलिया मंदिर’ आहे. या मंदिरातील मूर्ती ५००० वर्षे पूर्वीच्या असाव्यात, असे म्हणतात. या मंदिरात तमिळ भाषेतील राम, सीता आणि हनुमान यांची भजनं रात्रंदिवस ऐकायला मिळतात.
नुवारा एलिया नावाचा एक पहाड आहे, ज्याला आजही अशोक वाटिका असे म्हणतात. येथे अशोकाचे उंच उंच वृक्ष आहेत. येथील सर्व जंगलच अशोकाच्या अजस्त्र घनदाट वृक्षांनी बहरलेले आहे. या पहाडासमोर सतत वाहनांनी गजबजलेला पक्का पहाडी रस्ता, त्याला लागून असलेले सीतेचे मंदिर आणि या मंदिरामागे हजारो वर्षांपासून अविरतपणे वाहणारा झरा पहाडांत अदृश्य होतो. अशोक वाटिकेत सीता ११ महिने राहिली होती.
त्यावेळी ती याच झर्याच्या पाण्यात स्नान करीत असे. त्यामुळे या भागाला सीताकुंड म्हणतात. या जलकुंडाजवळच्या पहाडावर दोन पावलांच्या खुणा दिसतात. या हनुमानजींच्या पाऊलखुणा आहेत असे म्हणतात. लाल आणि पिवळ्या रंगाने ही पावलं रंगवली आहेत. बाजूला एका दगडी चबुतर्यावर सीतेची मूर्ती कोरलेली आहे. अशोक वाटिकेत अशोकाच्या वृक्षाखाली बसलेली सीता आणि तिच्यासमोर हात जोडून हनुमान उभा अशी ही प्रतिमा आहे. मंदिर आणि पहाड यांच्यात एक लोखंडी पूल आहे आणि या पुलाखालून अविरत पाण्याचा झरा वाहतो.
भारतीय पर्यटक पुलावरून जाताना सीता व हनुमान यांच्या मूर्तीपर्यंत पोहचतात. झर्याचं पाणी भावभक्तिने तोंडात घेतात, मस्तकावर शिंपडतात. काही क्षण अनिमिष नेत्रांनी हनुमानाच्या पावलांकडे बघतात आणि मग अशोक वाटिकेकडे नजर वळवतात, जेथे आता फक्त घनदाट जंगल आहे. सगळ्या गोष्टी काळ नष्ट करतो. उरतात फक्त आठवणी. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी खूप माकडे इकडे तिकडे बागडताना, उड्या मारताना दिसतात, मात्र ही माकडे माणसांना त्रास देत नाहीत बरं का.
इथल्या माकडांचे वैशिष्ठ्य म्हणजे इथल्या सगळ्या माकडांच्या शेपटी आपल्याकडच्या माकडाच्या शेपटीपेक्षा लांब असतात असे म्हणतात आणि सर्व माकडांच्या शेपटी काळ्या रंगाच्या दिसतात. त्यामुळे ही माकडं हनुमानाची वंशज वाटतात. जगात इतरत्र कुठेही अशा प्रकारची काळ्या शेपटीची माकडे आढळत नाहीत, असे म्हणतात. रावणाने हनुमानाच्या शेपटीला आग लावण्याचा हुकूम दिला तेव्हा हनुमानाने आपली शेपटी लांब केली आणि शेपटीला आग लावल्यावर त्याच शेपटीने रावणाची लंका जाळून टाकली. नंतर हनुमानाने ही शेपटी समुद्रात बुडवून विझवली, असे म्हणतात.
इथले लोक म्हणतात की रावणाने वाईट काम केले. त्याने सीतेला पळवून आणले. आम्ही मात्र बिभिषणाला मानतो. त्याची पूजा करतो. अशोक वनात त्रिजटा नावाची राक्षसीण होती. ती सीतेशी खूप प्रेमाने वागायची. तिनेच सीतेला धीर दिला. श्रीरामाच्या विरहाने व्याकुळ झालेल्या सीतेला तिने सांगितले की, मला स्वप्नात एक वानर दिसलंय. त्याने सगळी लंका जाळली आणि सर्व राक्षस सेनेचा नाश केला.
सपने बानर लंका जारी। जातुधान सेना सब मारि॥
येथील पहाडावर काळी आणि सफेद माती दिसते. लंका जाळल्याची ही निशाणी आहे. काही निशाण्या युगानुयुगे सावध करतात, असे म्हणतात. श्रीलंकेतील सुप्रसिद्ध सीता मंदिरापासून काही किमीवर देवनारपोल नावाचे एक ठिकाण आहे. या ठिकाणी सीतेने आग्निपरीक्षा दिली होती, असे म्हणतात. शांत पहाडावर असलेले हे स्थान संरक्षित करण्यात आलं आहे. येथे प्राचीन काळातील काळ्या पत्थरांपासून एक विशाल अग्निकुंड तयार केलेलं आहे.
गोल विहिरीसारखी ही रचना आहे. अग्निकुंडाच्या भिंती उंच आहेत. यानंतर एका उंच पहाडावर विशाल हनुमान मंदिर पाहायला मिळते. सीतेच्या शोधार्थ हनुमान जेव्हा प्रथमच आले त्यावेळी ते सर्वप्रथम याच पहाडावर उतरले, असे म्हणतात. येथूनच त्यांनी सीतेच्या शोधाची योजना बनवली होती. या पहाडावर हनुमानाच्या पावलांच्या विशालकाय खुणा उमटलेल्या आहेत. त्यावेळी समुद्र पार करताना हनुमानाने विराट रूप धारण केले होते, असे म्हणतात.