Homeफिचर्ससारांशStory of Dattu : दत्तू...

Story of Dattu : दत्तू…

Subscribe

दत्तू शाळेत जात होता, पण अभ्यासात जेमतेमच. दहा-बारा वर्षांचा असतानाच शाळा सुटली. एका किराणा दुकानात काम करायला लागला. झुंबरशेठचं हे किराणा दुकान स्टेशन रोडवरच होतं. सकाळी आठपासूनच उघडायचं..ते रात्री नऊपर्यंत. एवढा पूर्णवेळ दत्तू त्या दुकानात असायचा. सकाळी साफसफाई करण्यापासून त्याचं काम सुरू व्हायचं. गेली चाळीस वर्षे दत्तू त्या दुकानात काम करत होता. तसा आता तो दुकानाचा मालकच झाला होता. कारण झुंबरशेठला मुलंबाळं नव्हती. चार-पाच वर्षांपूर्वी झुंबरशेठ गेले आणि दत्तू दुकानाचा मालक झाला.

-सुनील शिरवाडकर

दत्तूला मी पहिल्यांदा पाहिलं ते कसारा लोकलमध्ये. ढगळ पँट..कधीकाळी ती चॉकलेटी रंगाची असावी..पण आता विटलेली..पांढरा मळका शर्ट..पायात चपला..उंच..शिडशिडीत अंगयष्टी..तांबुस गोरा रंग..दोन तीन दिवसाची दाढी वाढलेली..दरवाजाशीच उभा होता तो. पाठीवर सॅक..पायाशी दोन तीन पिशव्या.

संध्याकाळची वेळ होती, साहजिकच ट्रेन गच्च भरली होती. मी मुंबईहून येत होतो. आसनगाव स्टेशन जवळ आलं.. उतरणारे दरवाजापाशी गोळा झाले. त्या गर्दीत दत्तू होता.. अर्थात त्यावेळी मी त्याला ओळखत नव्हतो. दत्तूजवळ खूप सामान होतं. त्या गर्दीतून सामानासकट बाहेर पडणं म्हणजे तसं कठीणच. त्याच्या त्या सामानामुळे बाकीचे प्रवासी चिडचिड करत होते.. त्याला शिव्या घालत होते..पण दत्तूला त्याची सवय असावी. त्याचं त्या लोकांकडे लक्षच नव्हतं.

स्टेशन आलं. प्रवाशांच्या लोंढ्याबरोबर दत्तूही बाहेर प्लॅटफॉर्मवर फेकला गेला.. त्याच्या सामानासकट. पण एक पिशवी आतच राहिली..तो गाडीत घुसण्याचा प्रयत्न करत होता, पण लोकल सुटली. ती पिशवी आतच राहिली. नंतर कधीतरी असंच मुंबईहून येताना तो दिसला. त्या दिवशीच्या घटनेनं तो लक्षात राहिला होता आणि आज तर तो शेजारीच होता.

तशाच पिशव्या घेऊन. त्याला मी विचारलं.. त्या दिवशी लोकलमध्ये राहिलेल्या पिशव्या मिळाल्या का? तर नाही.. असं होतं म्हणे कधीकधी. ती गोष्ट त्याने हसण्यावारी नेली. मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. दत्तूचं छोटंसं किराणा दुकान होतं आसनगावात. दत्तू पाच वर्षांचा असतानाच त्याचे वडील गेले. आई आणि दत्तू उघड्यावर पडले. चार घरची धुणी भांडी करुन आई बिचारी संसाराचा गाडा ओढत राहिली.

दत्तू शाळेत जात होता, पण अभ्यासात जेमतेमच. दहा-बारा वर्षांचा असतानाच शाळा सुटली. एका किराणा दुकानात काम करायला लागला. झुंबरशेठचं हे किराणा दुकान स्टेशन रोडवरच होतं. सकाळी आठपासूनच उघडायचं..ते रात्री नऊपर्यंत. एवढा पूर्णवेळ दत्तू त्या दुकानात असायचा. सकाळी साफसफाई करण्यापासून त्याचं काम सुरू व्हायचं. गेली चाळीस वर्षे दत्तू त्या दुकानात काम करत होता.

तसा आता तो दुकानाचा मालकच झाला होता. कारण झुंबरशेठला मुलंबाळं नव्हती. चार पाच वर्षांपूर्वी झुंबरशेठ गेले आणि दत्तू दुकानाचा मालक झाला. त्या दिवशी ट्रेनमध्ये आमची ओळख झाली. मग ट्रेनमध्येच वरचेवर भेटी होत गेल्या. तो नेहमी त्याच्या दुकानात बोलवायचा, पण मी टाळायचो. आसनगावला उतरायचं.. त्याच्या दुकानात जायचं.. पुन्हा कसारा लोकल पकडायची..हे नकोसं होतं.

पण किती वेळा टाळणार ना! एकदा आसनगावला उतरलो आणि त्याच्या दुकानात गेलो. दुकान छोटंसं होतं, पण गिर्‍हाईकं चांगली होती. दत्तूला बोलायला फारसा वेळ मिळाला नाही. तेवढ्या वेळात माझ्या एक गोष्ट लक्षात आली. कितीतरी किरकोळ गिर्‍हाईकं उधारीवर माल नेत होती.

मांडून ठेवा दत्तूभाऊ, असं म्हणून सामान घेऊन जात होती. पण दत्तू ती उधारी कुठेच लिहून ठेवत नव्हता. मला आश्चर्य वाटलं. मधून जेव्हा त्याला उसंत मिळाली, तेव्हा मी त्याला विचारलंच.

दत्तू..तू उधारी कुठेच लिहून ठेवली नाही.. हे सगळं लक्षात बरं रहातं तुझ्या.
देतात हो आणून लोकं आणि जरी नाही आणून दिली उधारी.. बुडवले माझे पैसे.. मला काही वाटत नाही.
असं कसं?

काय होतं माझ्याजवळ एकेकाळी? दिले.. दिले.. नाही दिले.. नाही दिले. मी नाही विचार करत. जे राहील ते आपलं.
दुसर्‍याच्या उपयोगी पडणं हाच दत्तूचा स्वभाव होता. वास्तविक त्यालाही संसार होता.. बायको होती, एक मुलगा होता, पण दत्तू म्हणायचा..
पोटापुरतं मिळतंय ना! बस्स..
तेवढ्यात एकजण बारीक तोंड करून दत्तूच्या दुकानात आला.
दत्तूभाऊ..पोराच्या उलट्या थांबतच नाही ओ..
मीठ पाणी द्यायला सांगितलं ना तुला?
दिलंव.. सगळं केलं..
दत्तूने आतल्या खोलीत डोकावून बायकोला हाक मारली..
सुमे.. जरा वेळ बस.. आलोच मी..
आणि घाईघाईत तो त्या माणसासोबत निघून गेला. त्याची बायको दुकानात आली. मी तिला विचारलं..
आता हा दत्तू तिथं जाऊन काय करणार?
हे असंच असतं त्यांचं.. दुकानात बुड काही ठरत नाही.. आता ते त्या पोराला दवाखान्यात घेऊन जातील..सलाईन बिलाईन..औषधं.. सगळं मार्गी लावतील.. आणि मगच दुकान आठवल त्यांना.
दत्तूला यायला बराच वेळ लागणार.. म्हणून मग मी त्याच्या बायकोचा निरोप घेऊन निघालो.

दुकानातील माल आणण्यासाठी दत्तू वरचेवर मुंबईला जायचा. अनेकांची मुंबईत कामं असायची. ते लोक बेलाशक दत्तूला सांगायचे.. दत्तू, येताना हे आणि..ते आण.. आणि दत्तूही त्यांची ती कामं करायचा.

दत्तूचा माझा परिचय वाढला.. त्याला भेटलं की मला पु.लं.चा परोपकारी गंपू आठवायचा. गंपू जसा उठसूठ याला त्याला सल्ले द्यायचा..तसंच दत्तूचं. मुंबईला तो वरचेवर जायचा. त्यामुळे सहाजिकच एक जाणतेपण त्याच्याकडे आलं होतं. गावात कुणाकडे लग्न निघालं की दत्तूची धावपळ बघावी.

मंगल कार्यालयाच्या बुकिंगपासून दत्तूचं मार्गदर्शन सुरू व्हायचं. केटरर कोणता निवडावा..आदल्या दिवशी काय मेनू निवडायचा..लग्नाच्या दिवशी ताटात कोणते पदार्थ असावेत हे दत्तूच ठरवायचा.

साड्या घ्यायच्या ना..हं ते कल्याणचा रुप संगम आहे ना..तिथूनच घ्या.
शालूची खरेदी? ती मात्र दादरला करा.
असं सुचवणं चालू व्हायचं.

बरं हे सगळं निरपेक्ष वृत्तीने. दुकान सोडून तास तास दुसर्‍यासाठी भटकायचा..पण या सगळ्यात एक रुपयाची अपेक्षा त्यानं कधी ठेवली नाही. उलट आपल्या माणसाचे पैसे कसे वाचतील हीच त्याला चिंता.

आणि अशा या चिरतरुण दत्तूची पन्नाशी आली हे मला कधी कळलं..तर त्याच्या बायकोचा फोन आल्यावर. गावातल्या लोकांनी आपल्या दत्तूचा पन्नासावा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं होतं. दत्तूला याची अजिबात कल्पना दिली नव्हती. त्याच्या बायकोला आणि मुलाला विश्वासात घेऊन हा कार्यक्रम ठरवला होता. मला फोनवरून आमंत्रण आलं..जाणं आवश्यक होतं..

त्या दिवशी मी दत्तूची खरी श्रीमंती पाहिली. गावातले सगळ्या थरातले लोक घरचा कार्यक्रम असल्यासारखे जमले होते. स्टेजवर मोठं होर्डिंग..त्यावर दत्तूचा फोटो.. त्याखाली गावातील कोणत्या तरी कवीने अभिष्टचिंतनाच्या चार ओळी लिहिल्या होत्या. स्पीकरवर सनई चालू होती.. मध्यमागी असलेल्या गुबगुबीत सोफ्यावर दत्तू आणि त्याच्या बायकोला बसवलं होतं.

दोघांच्याही गळ्यात फुलांचे जाडजूड हार होते. दोघं बिचारे बुजून गेले होते. लोक येत होते.. शुभेच्छा देत होते..कोणी भेटवस्तू देत होते.. कोणी पाकिट देत होतं.. बुफेसाठी लागलेली रांग कमी होत नव्हती.. सगळीकडे आनंदीआनंद होता.
एक व्यक्ती गावासाठी काय करू शकते..

आणि गाव एखाद्या व्यक्तीसाठी काय करू शकतं..
याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचा हा कार्यक्रम.

-(लेखक साहित्यिक आहेत)