कोणत्याही देशाला स्वतःच्या संस्कृतीचा अभिमान वाटत असतो. आमच्या संस्कृतीला वेगळे महत्त्व आहे. कारण ती एक प्राचीन संस्कृती आहे. याचा गवगवा आणि मोठेपणा सांगितला जातो.अर्थात जे चांगले आहे त्याचा अभिमान बाळगणे व त्याचा उदोउदो करण्यात काहीही गैर नाही. पण जुनाट रूढी, परंपरा, प्रथा, संकेत ज्या समाजात आहेत.आणि त्या सामाजिक बदलाला विरोध करत असतील तर ती संस्कृती आधुनिक जगात गैरलागू ठरते. किंबहुना आपण सगळेच कधीतरी या सर्व अतिरिक्त व हानिकारक नियमांना बळी पडलेलो असतो. त्याविषयी आवाज उठविण्याचे धाडस सहसा कोणी करत नाही. एखाद्याने तसे केलेच तर त्याला समाज बहिष्कृत करणारे धर्मरक्षक सुधारणा काळापासून अस्तित्वात आहेत. स्त्रीवादी भूमिका घेऊन ज्या जा समाज सुधारकांनी काम केले, त्या सर्वांनाच या रोषाला सामोरे जावे लागले.अनिष्ठ रूढीवादी सतीबंदीचा कायदा करण्यास भाग पाडणारे राजा राम मोहन रॉय असतील. किंवा स्त्रियांच्या विकासासाठी स्त्री शिक्षणाची चळवळ उभारणारे महात्मा फुले असतील. या आणि अशा अनेक समाजसुधारकांची चळवळ दडपून टाकण्याचे काम त्या काळातही अनेकांनी केले. आणि आजही काही लोक एखाद्या सुधारणेस अधून मधून विरोध करत असतात.
वरील गोष्टींचा उल्लेख करण्याचे कारण हे की, सध्या सोशल मीडियावर अफगाणिस्तानच्या गाजत असलेल्या व्हेअरइजमायनेम..?(#ैwhereismyname..? ) या चळवळीने घेतलेला वेग.. अर्थात या चळवळीला रूढीवादी लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध केला. पण सोशल मीडियाद्वारे अफगाणिस्तानमध्ये या चळवळीला तेवढ्याच प्रमाणात पाठिंबा तर मिळालाच पण ती चळवळ यशस्वीसुद्धा झाली. (यावर बीबीसीने सविस्तर स्टोरी केली आहे) दोन ते तीन वर्षांपूर्वी राबिया नावाची एक स्त्री हॉस्पिटलमधून घरी आली. आणि औषधांच्या चिठ्ठीवर तिचे नाव लिहिले म्हणून तिच्या नवर्याने तिला मारहाण केली. कारण अफगाणिस्थानमध्ये स्त्रियांचे नाव स्वतःच्या जन्मदाखल्यावर सुद्धा लिहिले जात नाही असा तिथला नियम आहे. पण रबियाने तसे केले. आणि त्याची तिला शिक्षा मिळाली. सार्वजनिकरित्या महिलेचे नाव वापरणे म्हणजे आपला अपमान आहे. बरेच अफगाणी पुरुष सार्वजनिकपणे त्यांच्या बहिणी, बायका किंवा आई यांची नावे सांगत नाहीत. स्त्रियांना घरातील ज्येष्ठ पुरुषाची आई, मुलगी किंवा बहीण असेच संबोधले जाते. या सर्वांचा परिणाम असा झाला की, काही महिलांनी एकत्र येऊन व्हेअरइजमायनेम..? या मोहिमेची सुरुवात केली.
जन्मदाखला लग्नपत्रिका किंवा इतर कोणत्याच कागदपत्रांवर नाव न वापरणे. म्हणजे आमचा मूलभूत अधिकार नाकारणे आहे,असे त्यांचे स्पष्ट म्हणणे होते. या चळवळीच्या सुरुवातीला आम्हाला प्रचंड त्रास झाला. पण सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला, असे या चळवळीच्या प्रमुख लैले उस्मानी आणि सोनिया अहमदी सांगतात. स्वतःची ओळख नाकारणार्या तालिबानी विचारांचा पगडा असणार्या देशात मागच्या आठवड्यात अफगाणिस्तानमध्ये असा कायदा करण्यात आला की, मुलांच्या जन्मदाखल्यावर आईचे नाव लिहिले जावे. सार्वजनिक ठिकाणी आवश्यकता असेल तिथे त्यांचे नाव लिहिण्याचा महिलांचा हा मूलभूत अधिकार आम्ही त्यांना प्रदान करत आहोत, असे या कायद्यात नमूद केले आहे. मानवी हक्क संघटना तर म्हणतात की, आमच्यासारख्या परंपरावादी देशात ही फार मोठी क्रांती आहे. #ैैैैwhereismyname..? या इंग्लिश टायटलने सोशल मीडियातून या चळवळीला प्रतिसाद मिळाला म्हणूनदेखील आम्हाला यश मिळाले आहे असे ते सांगतात. म्हणजेच इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सोशल मीडियाच्या माध्यमातून विशिष्ट असा बदल होऊ शकतो. हे अफगाणिस्तानमधील या चळवळीने दाखवून दिले आहे.
या संदर्भाने बोलायचे झाले तर सध्या भारतातही असा कायदा होण्याच्या प्रतीक्षेत आहे. वारसा हक्क म्हणून महिलांचे नाव लिहिले जाते. सोबतच मुलांच्या जन्मदाखल्यावर सुद्धा नाव लिहिले जावे यासाठी कायदा करण्यास काही हरकत नाही. यासाठी राजकीय पाठिंबासुद्धा महत्वाचा असतो. पण या सर्वांच्या पलीकडे जाऊन शिक्षित युवापिढी कायद्याची वाट न पाहता आपल्या मुलांच्या जन्मदाखल्यावर आईचे नाव लिहीत आहेत. गेल्या काही वर्षात फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर इत्यादी.. समाज माध्यमावर पाहायला मिळत आहे की तरुण वर्ग स्वतःच्या नावानंतर आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि नंतर आडनाव लावत आहेत. हा बदल युवावर्गात दिसत आहे. यापूर्वी एखादा लेखक किंवा लेखिका स्वतःच्या पुस्तकावर अशा प्रकारचे नाव लिहीत असत, पण आज जवळपास सर्वच सुशिक्षित लोक समाज माध्यमांवर हा प्रयोग करत आहेत. अनेकांना ही कृती छोटी जरी वाटत असली किंवा नवीन वाटत असली. तरी ही मोठ्या बदलाची नांदी आहे. भारतीय परंपरेत ज्या समूहात पुरुषप्रधान संस्कृती आहे, त्या समूहात हा बदल होणे अतिशय अभिमानास्पद आहे. यामुळे महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुधारू शकतो. अफगाणिस्थान सारख्या देशामध्ये जिथे फक्त धर्माचे नियम चालतात तिथे असा कायदा होणे म्हणजे गुन्हा आहे. पण या सगळ्यांना सोशल मीडियातून उत्तर मिळत आहे. याचाच परिणाम म्हणून तिथल्या सरकारला विचार करावा लागला.
या आणि अशा अनेक गोष्टींचे स्वागत सोशल मीडियावर होतेय. चांगल्याचा स्वीकार करणारी पिढी उदयाला येतेय.अशा प्रकारे जर सोशल मीडियाचा चांगला वापर झाला तर येणारा काळ हा एका वेगळ्या विचारांचा पाईक असेल. असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.
एकूणच काय तर अनिष्ट परंपरेला छेद देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याकडे जागतिक स्तरावर कल वाढतोय. यामध्ये नरबळी, स्त्रियांच्या अंगात येण्याचे प्रकार, देवदासी प्रथा, बाबा बुवाने केलेला छळ या विरोधात जनजागृती करण्याचे काम होत आहे. अंधश्रद्धेला बळी पडणारा समाज स्वतःचा विकास करूच शकत नाही. यासाठी त्याला त्यातून बाहेर काढावे लागेल. भूत-प्रेत वगैरे काही नसतं हे पुराव्यानिशी सिद्ध केलं जातय. लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोचता येत नाही. तिथे समाज माध्यमांचा आधार घेऊन त्यांच्यापर्यंत व्हिडीओ पोचूवून, संवाद साधून जनजागृती घडवून आणण्याचे काम अनेक संस्था करत आहेत. आपल्या वर्तुळाच्या बाहेरही काही माणसे अशी असतात जी रोजच्या जीवन जगण्याची वाट शोधतात. त्यांना आधार मिळवून देण्यासाठीसुद्धा युवावर्ग सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीने मदतीचे हॅशटॅग वापरत आहेत. प्रत्येक गोष्टींकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी या माध्यमातून मिळतेय. हासुद्धा मोठा बदल समाजात युवापिढी घडवून आणत आहे.
अनेकांच्या हातात हे माध्यम आहे, याचा चांगला वापर 30 टक्के लोकांनी जरी केला तरी ते समोरच्या 10 टक्के लोकांवर परिणाम करू शकतात. असे संशोधन जागतिक लेव्हलच्या काही सोशल ऍक्टिव्हिटीज संस्थांनी केले. म्हणजेच इथे हे लक्षात घ्यावे लागेल की सुरुवात महत्त्वाची असते. जी एका वेगळ्या प्रयोगातून साकारली जाऊ शकते. नव्या पिढीच्या हातातले सोशल मीडिया नावाचे दुधारी शस्त्र सामाजिक बदलाच्या दिशेने वापरले जावे हाच उद्देश इथे आहे.
-धम्मपाल जाधव