जग सध्या तिस-या महायुध्दाच्या दिशेने पावले टाकत आहे का? अशी शंका जगभरातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे. त्याचे कारण रशिया व युक्रेनमधील युध्द. खरेतर हे युध्द दोन देशात होत असले तरी त्याचा परिणाम जगावर होतो आहे. आता संकट कोणत्याही प्रकारचे आले तरी त्याचे परिणाम जगालाच भोगावे लागणार असतात. त्यामुळे शांततेचा प्रवास हा जगाला शांततेच्या दिशेने घेऊन जाणारा आणि युध्दाचा प्रवास युध्दाच्या दिशेने घेऊन जाणारा ठरणारा असतो. जगात शांतता नांदावी या करीता विविध प्रकारचे प्रयत्न होता आहेत. जागतिक स्तरावरील विविध संस्था देखील त्या करीता प्रयत्न करता आहेत. मात्र त्याचेवळी शांततेकरीता शिक्षण हा विचार स्वीकारला गेला आहे. जगात साक्षरतेचा आणि शिक्षणाचा आलेख उंचावत आहे आणि त्याचवेळी युध्दाची खुमखुमी वाढताना दिसते आहे.
एकीकडे विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांची संख्या वाढते आहे. त्याचवेळी शस्त्रास्त्रांची स्पर्धा देखील वाढत आहे. शस्त्रे विकणारी देश श्रीमंत होता आहेत आणि महासत्तेच्या दिशेने प्रवास करता आहेत, दुसरीकडे स्वतःच्या सुरेक्षेकरिता प्रत्येक राष्ट्र शस्त्रास्त्रे खरेदी करत आहेत. ग्राहक वाढविणे आणि त्यांना शस्त्र विकणे हा व्यवसाय सातत्याने सुरू ठेवण्यात अनेक श्रीमंत राष्ट्राचे भले होते आहे. मात्र शिक्षण संस्थांची संख्या जगभर वाढत असताना जगात शांतता निर्माण करण्यासाठी तितकेसे प्रयत्न होत नाही. आपल्यातील विस्तारांची आकांक्षा आणि महासत्तेचा स्वप्नच जगाला युध्दाच्या खाईत लोटत आहे. जागतिक नागरिकत्वाची भाषा होत असताना जगातील प्रत्येकाला उत्तम शिक्षण आणि मूलभूत गरजांची पूर्ती करण्यासाठी जगाने एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे.मात्र विस्तार आणि महासत्तेच्या दिशेचे प्रवास शांततेच्या दिशेऐवजी युध्दाच्या दिशेने चालताना दिसतो आहे.
जगभरातील तत्वज्ञ शिक्षणाचा हेतू समाज, राष्ट्र निर्मिती आणि जागतिक शातंता निर्माण करण्याचा असल्याचे सांगत आले आहे. खरेतर इतिहासात आपण कोणत्यातरी एका राष्ट्राचे नागरिक होतो आणि आहोतदेखील. आपल्या नागरिकत्वाला निश्चित सीमा होत्या. मात्र आता जागतिकीकरणानंतर राष्ट्राच्या सीमा गळून पडल्या आहे आणि जग हेच एक राष्ट्र झाले आहे. त्यामुळे जागतिक नागरिकत्वाची भूमिका स्वीकारली जाऊ लागली आहे.आपण जागतिक नागरिकत्वाकडे जात असताना आपल्याला जग अधिक सुंदर करण्याबरोबर शांतता नादंवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी जगातील प्रत्येक राष्ट्रप्रमुखाने आणि नागरिकाने शांततेची वाट चालण्याची जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे.
जगातील प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार आहे असे म्हणायचे आणि दुस-याचे जगणे हराम होईल यासाठी प्रयत्न करायचे याला काय म्हणायचे ? आपण शिक्षणही घेत आणि देत आहोत. शिक्षणांचा लाभ अधिक उन्नत होण्यासाठी करण्याची गरज असते. अवघ्या जगाला आनंद मिळावा. जागतिक समूहाला संपन्नता लाभावी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.त्यासाठी शिक्षणातून शहाणपणाच्या पेरणीची गरज सातत्याने व्यक्त होत आली आहे. शिक्षण घेतल्यानंतर आपण जगातील विकृती नष्ट करण्यासाठी,हिंस्त्रता संपुष्टात आणण्याकरीता व शहाणपणाची पाऊलवाट चालण्याचा प्रयत्न करण्याची गरज होती.
वर्तमानात तसे घडण्यासाठीचा प्रयत्न अधिक गंभीरपणे करण्याची गरज अधोरेखित होते आहे. आपण इतिहास शिकत आलो आहोत. इतिहासातील मानवी विकृती व हिंस्त्रतेने जगाचे काय झाले हे आपण जाणतो. मात्र त्या पानावरून आपण काहीच बोध घेणार नाही का ? असा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा हिरोशिमा, नागासकी वरती बाँम्ब हल्ले जगाने अनुभवले आहे. त्याच परिणाम अजून जग भोगते आहे. शिक्षणातून निर्माण होणार्या ज्ञानाच्या जोरावरती आपण जगाचे भले करण्याची वाट निवडायला हवी असते.मात्र ती निवडण्यात आपल्याला अपयश आले आहे.त्या ज्ञानाचा उपयोग समाजातील प्रश्न,समस्या निराकरणासाठी करण्याची अपेक्षा असताना जग मात्र विध्वंसाकडे जाते आहे. कोरोना संदर्भाने जगात अनेक चर्चा घडता आहेत. कोरोना मानव निर्मित विषाणू असण्याची चर्चा होते आहे. त्याचवेळी जगात महासत्तेची स्वप्न पाहाणार्या राष्ट्रांच्या प्रयोगशाळेत यासारखे काही विषाणू वैज्ञानिकांनी बनविले असल्याचे सांगितले जात आहे.
हे सारे चित्र म्हणजे आपण आपल्या पायावर कुर्हाड पाडण्यासारखे आहे. जेव्हा इतरांचे वाईट करू पाहतो तेव्हा त्यात आपले भले कधीच नसते.शेजारच्याच्या घरात आपल्याला अंधार करायचा असेल तर त्याच्या घरातील दिवा फोडून अंधार नष्ट होत नाही, त्या करीता आपल्याला आपल्याही घरातील दिवा बंद करावा लागतो हे लक्षात घ्यायला हवे. दुस-या सुख दिले तरच आपण सुखाचे वाटेकरी होऊ शकतो हे लक्षात घ्यायला हवे. शिक्षणाने व्यक्तींना अंतिम सत्याच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.जगात मूल्यांचा विचार केला जात असतो तेव्हा ती मूल्येच आपल्याला आनंदाच्या दिशेने घेऊन जाण्यास सक्षम बनवत असतात. मात्र आज तसे होताना दिसत नाही.आपल्यात निर्माण झालेली स्पर्धा जगाला नष्ट करेल पण त्यापलिकडे जग नष्ट करू पाहाणा-या महासत्तेला देखील नष्ट केल्याशिवाय राहणार नाही.
एकदा चार विदवान एकत्र आले होते.त्यांनी अनेक विद्या आत्मसाथ केल्या होत्या.ते जग समजून घ्यावे आणि ज्ञान प्राप्त करावे म्हणून जग प्रवासाला निघाले.जगंलात पोहचले. प्रत्येकाला कोण श्रेष्ठ असा अंहकाराचा विचार खुणावू लागला. जंगलात त्यांना एका वाघाचे मांडीचे हाड दिसले. मग त्या हाडाला वाघाचा आकार देण्यासाठी पहिला पुढे आला. आपल्या ज्ञानसामार्थ्यांच्या जोरावरती त्यांने त्या मांडीच्या हाडापासून वाघाचा सांगाडा बनविला.त्याचे सामर्थ्य पाहून दुस-याचा अंहकार आणखी उंचावला.त्याने आपल्या सामार्थ्याच्या जोरावरती त्या सांगाडयाला मांस भरले. आता वाघ अत्यंत धष्टपुष्ठ बनला होता.हे पाहिल्यावर तिस-या अहंकार फुलून आला .तो आपल्या ज्ञानसामार्थ्यांच्या जोरावरती त्या निर्जीव असलेल्या वाघाच्या प्रतिकृतीत प्राण भरण्यासाठी सरसावला होता.
चौथ्याने आपल्या शहाणपणाच्या जोरावरती सर्वांना विनंती केली की,आतापर्यंत जे झाले ते झाले , प्राण भरण्याच्या फंदात पडू नका. अन्यथा विनाश होईल. पण अंहकार काही शांत बसू देईना.आपले ज्ञानसामार्थ्य दाखविण्यासाठी त्यांने अखेर त्यात प्राण भरला.तोपर्यंत चौथा उंच असलेल्या झाडावरती जाऊन बसला होता. वाघ जिवंत झाला. तोही बर्याच दिवसापासून उपाशी होता.अखेर त्यांने त्याला ज्यांनी निर्माण केली. त्यांचेवरती हल्ला केला आणि नष्ट केले. नष्ट करून तो पुढे चालता झाला..आणि झाडावर चढलेला चौथा खाली आला.त्याने गावी जाऊन त्या तिघांचे क्रियाकर्म केले.आज अशीच अंहकाराची स्पर्धा जगात सुरू आहे. मग ती आर्थिक महासत्तेची असते तर कधी ती राजकीय महासत्तेची असते.आज जगाला पुढे घेऊन जाण्यासाठी शस्त्रास्त्रांची स्पर्धा करण्यापेक्षा गरज आहे माणूसकीने सर्वांना पुढे घेऊन जाण्याची.शिक्षणातून त्यासाठी विवेक पेरण्याची गरज आहे.शहाणपणाची संगत आपण पुढे घेऊन गेलो नाही तर युध्द करणारे संपतील. मात्र त्या बरोबर त्या भोवतालचे देखील संपतील हे लक्षात घ्यायला हवे.
शिक्षणातून माहितीचे महाजाल निर्माण करून आपण भौतिक प्रगतीचे उंचावर पोहचलो आहोत. नवनव संशोधनाने आपण जगाला मुठीत आणू शकलो आहोत. मात्र आपण भीतीमुक्त नागरिक, समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यात फारसे यश मिळू शकलेलो नाही. नागरिकांच्या मस्तकावरती भीती ठेऊन आपण पुढे जाऊ असे राजसत्तांना वाटत असले तरी त्या पुढे जाण्याला कोणताही अर्थ नाही. त्यामुळे शिक्षणातून अधिक उत्तमतेची आणि मूल्यांची पेरणी, त्याच बरोबर विवेक व शहाणपणाची पेरणी होईल यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. शिक्षण ही केवळ अक्षर साक्षरते पुरता विचार नाही.त्यातून आपण मानवी मूल्यांचा आणि शांततेचा विचार कशा प्रकारे प्रस्तृत करतो या संदर्भात विचार व्हायला हवा.शेवटी अक्षऱ साक्षरतेने नोकरी मिळेल,त्यातून पैसा मिळेल, पैशातून भौतिक सुविधा आणि त्यातून समाधान प्राप्त करता येईल. मात्र आंतरिक समाधान आणि शांततेसाठी मने घडवावी लागतील.तसे घडले तरच जगात शांतता नांदण्याची शक्यता आहे.अन्यथा आज दोन राष्ट्र एकमेकावर तुटून पडली आहेत हे चित्र जगात पाहावयास मिळाले तर नवल वाटायला नको.