घरफिचर्ससमाजसेवक गोपबंधु दास

समाजसेवक गोपबंधु दास

Subscribe

गोपबंधु दास हे प्रख्यात ओडिया लेखक, वृत्तपत्रकार, कवी, देशभक्त व समाजसेवक. त्यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1877 रोजी ओरिसातील पुरी जिल्ह्यातील सुआंडो या गावी एका गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. मातापिता स्वर्णमयी देवी व दैत्यारी दास. गोपबंधूंच्या जन्मसमयीचं स्वर्णमयी देवींचे निधन झाले. त्यांचे पालनपोषण त्यांची आत्या कमला देवींनी केले. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावीच झाले. नंतर ते पुरी येथून १८९९ मध्ये मॅट्रिक झाले. १९०४ मध्ये ते कटक येथील रेव्हेन्शॉ महाविद्यालयातून पदवी घेऊन एम. ए. आणि कायद्याच्या अभ्यासासाठी कोलकात्यास गेले. परंतु एम. ए. न करता कोलकाता विद्यापीठातून त्यांनी कायद्याची बी. एल. पदवी घेतली (१९०६). नंतर त्यांनी स्वतःस, सामाजिक व राजकीय कार्यास वाहून घेतले.

त्यांनी १९०९ मध्ये पुरीजवळील सखीगोपाल येथे माध्यमिक इंग्रजी शाळेची स्थापना केली. स्वमतप्रचारार्थ त्यांनी सत्यवादी (मासिक) व समाज (साप्ताहिक) ही पत्रे सुरू केली. तत्कालीन उत्कृष्ट असा अध्यापक वर्ग शाळेवर होता. त्यांत स्वतः गोपबंधू, पंडित नीलकंठ दास, पंडित गोदावरीश मिश्र, पंडित कृपासिंधू मिश्र व आचार्य हरिहर दास या प्रसिद्ध विद्वान व साहित्यिक व्यक्तींचा समावेश होता. हे पाचजण ‘पंचसखा’ नावाने त्या कालखंडात प्रसिद्ध होते. यांच्या लेखनामुळे ओडिया साहित्यात नव्या सत्यवादी युगाचे प्रवर्तन झाले. हे विद्यालय त्या काळी शिक्षणाचे, राजकीय विचारांचे, साहित्याचे, समाजसेवेचे व राष्ट्रीय कार्याचे एक प्रसिद्ध केंद्र बनले होते. १९२१ मध्ये या पाचजणांनी जेव्हा असहकारिता चळवळीत उडी घेतली, तेव्हा हे विद्यालय राष्ट्रीय विद्यालय बनले.

- Advertisement -

गोपबंधू हे कडवे देशभक्त होते. विद्यार्थी असल्यापासूनच १९०३ मध्ये ‘उत्कल संमिलनी’ या राजकीय संस्थेशी ते संबंधित होते व त्यांनी विखुरलेल्या ओडिया भाषिक लोकांना संघटित करण्याचा व एका प्रशासनाखाली आणण्याचा प्रयत्न केला. कटक येथील रेव्हेन्शॉ महाविद्यालयात त्यांनी कायद्याची (बी. एल) व एम. ए. (इंग्रजी) च्या शिक्षणाची सोय केली. त्यांनी मीठ उत्पादनावरील कर रद्द करण्यासाठी मोठा लढा दिला. ओरिसातील संस्कृत शिक्षणासाठीही त्यांनी संघटना बांधली. ते विधिमंडळाचे सदस्य असताना त्यांनी पूरग्रस्तांसाठी व दुष्काळपीडितांसाठी भरीव सेवाकार्य केले. त्यांच्या समाजसेवेमुळे लाला लजपतराय यांनी त्यांना ‘सर्व्हंट्स ऑफ द पीपल सोसायटी’ चे सदस्यत्व बहाल केले.

काव्य, गद्यलेखन तसेच सत्यवादी व समाज पत्रांतील संपादकीय लेख यांतून त्यांनी लोकजागृती करून देशभक्तीचा पुरस्कार केला. तुरुंगात असताना त्यांनी पद्यात लिहिलेल्या आठवणी ‘काराकबिता व ‘बंदिरे आत्मकथा’ नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपले विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून पुराणांच्या धर्तीवर काही काव्यरचना केली. त्यांत ‘गो माहात्म्य’, ‘अबकाशचिंता’ (१९४२), ‘नचिकेत उपाख्यान’ (१९४२) यांचा समावेश आहे. अशा या महान समाजसेवकाचे १७ जून १९२८ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -