२०१७ सालच्या सुरूवातीला व्हॉट्सअॅपने स्टेटस हे आपले नवे फिचर लाँच केले आणि हाहा म्हणता नेटकर्यांच्या जीवनाचा एक भाग होऊन गेले.सुरूवातीच्या काळात अल्प प्रतिसाद लाभलेल्या या फिचरला हळूहळू उदंड प्रतिसाद मिळाला.या व्हॉट्सअॅर फिचरने स्नॅपचॅट स्टोरीजना तगडे आव्हान उभे केले आणि सोशल मीडियाच्या बाजारात पाय देखील रोवले. सुरूवातीला काही कारणांपुरते वापरले जाणार्या ’स्टेटस’ या फिचरने आता भावनांची जागा घेतली आहे. सुख, दु:ख, मैत्री, आदर, राग, चळवळ, बंड, प्रेम एखादी चित्रफित किंवा छायचित्राद्वारे व्यक्त करण्याचे व्यासपीठ आता व्हॉट्सअॅप स्टेटस बनले आहे. आपला व्यवसाय आपल्या संपर्कातील व्यक्तींपर्यंत पोहचवण्यासाठी देखील या फिचरचा खुबीने वापर करताना लोक दिसतात.
परंतु,काही गोष्टींचा फायदा असतो तसाच तोटाही असतो. जेव्हापासून मानवी जीवन तांत्रिक युगाशी जोडले गेले आहे,तसतसे ते एककेंद्री होत गेले आहे. एका कॉलेजच्या मुलांची पिकनिक एका निसर्गरम्य ठिकाणी गेली होती.पिकनिकच्या नंतर प्राध्यापकांनी मुलांना बघितलेल्या ठिकाणाबद्दल काही लिहायला सांगितलं. मुलांना काहीच लिहायला जमलं नाही. नंतर समजलेल्या माहितीनुसार मुलं त्या ठिकाणी सेल्फी काढण्यात आणि त्याठिकाणचे फोटो काढण्यात आणि ते व्हॉट्सअप स्टेटस ठेवण्यात गर्क होते.एखाद्या घटनेबद्दल,क्षणाबद्दल व्यक्त होण्याची घाई आपल्याला त्या घटनेच्या त्या क्षणांच्या खोलापर्यंत जाण्यास रोखते आहे.आपल्या भावना स्टेटसद्वारे इतरांपर्यंत पोहचवताना आपण आपले खासगी जीवन गमावून तर बसलो नाही आहोत ना? याची कधी कधी भिती वाटते.एखादा सोहळा,सु:खाचा प्रसंग स्टेटसद्वारे इतरांशी शेअर करणे योग्य आहे.
परंतु,आपण आपली सीमा कधी ओलांडतो हेच आपल्याला कळत नाही.त्यामुळे मानवी भावना देखील स्वस्त झाल्या आहेत, असे वाटते. कोण मृत्यूमुखी पडल्यानंतर त्याला फक्त भावपूर्ण श्रद्धांजली देऊन गप्प बसणारी एक पिढी आता तयार होत आहे.स्वत:च्या खासगी गोष्टी पण शेअर करताना काही जण तर कहर करतात. नवरा बायकोमधील वाद स्टेटसच्या माध्यमातून व्यक्त करणारे पण काहीजण या समाजात पाहायला मिळतआहेत.तसेच गर्लफ्रेंडशी झालेलं भांडण देखील काहीजण स्टेटसच्या रुपाने मांडतात. एक विनोदी बाब आहे, पण एका मुलाने तर तोंडाला आलेला फोड जिभेचा अल्सर म्हणून त्याला वर्तुळ करून स्टेटस म्हणून ठेवला होता.
आपल्या मनातील भावना एखाद्या समोर व्यक्त करणं ही चुकीची बाब असू शकत नाही,परंतु,त्या आपण आपलं खासगी जीवन गमावून तर बसत नाही आहोत ना याची काळजी घेतली पाहिजे.आधुनिक तंत्रज्ञानाने माणसाच्या आयुष्याचा दर्जा किंवा स्टेटस हा निश्चितच उंचावला आहे.पण याच तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करताना कशा प्रकारे व्यक्त व्हायचं आहे, हे आपणंच ठरवलं पाहिजे. एखादी खासगी बाब किती सोशल करायची हे आता आपल्या हातातील मोबाईलवरच आहे.