घरफिचर्सवैद्यकीय सेवा देणार्‍या पहिल्या महिला डॉक्टर

वैद्यकीय सेवा देणार्‍या पहिल्या महिला डॉक्टर

Subscribe

भारताला वैद्यकीय सेवा देणार्‍या पहिल्या महिला डॉक्टर म्हणजे रखमाबाई सावे. आज त्यांची जयंती. २२ नोव्हेंबर १८६४ रोजी रखमाबाईंचा जन्म झाला. हरिश्चंद्र यादवजी या त्याकाळच्या ‘रायबहादूर’ आणि ’जस्टिस ऑफ पीस’ अशी नेमणूक असलेल्या गृहस्थांच्या रखमाबाई या नात.

भारताला वैद्यकीय सेवा देणार्‍या पहिल्या महिला डॉक्टर म्हणजे रखमाबाई सावे. आज त्यांची जयंती. २२ नोव्हेंबर १८६४ रोजी रखमाबाईंचा जन्म झाला. हरिश्चंद्र यादवजी या त्याकाळच्या ‘रायबहादूर’ आणि ’जस्टिस ऑफ पीस’ अशी नेमणूक असलेल्या गृहस्थांच्या रखमाबाई या नात. हरिश्चंद्र यादव हे आधुनिक विचारांचे गृहस्थ होते. रखमाबाईंची आई, जयंतीबाई ही वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी विधवा झाल्यानंतर त्यांनी तिचा दुसरा विवाह करून दिला. रखमाबाई ही जयंतीबाई यांची पहिल्या विवाहापासूनची मुलगी. जयंतीबाईंचे दुसरे पती डॉ.सखाराम अर्जुन (राऊत) हे नावाजलेले वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते. तसेच ते शल्यचिकित्साही शिकवत.
रखमाबाईंच्या जडणघडणीत त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा मोठा वाटा तर आहेच, परंतु त्याचा योग्य वापर करून आपलं व्यक्तिमत्व घडवणं, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. हरिश्चंद्र यादव आणि डॉ.सखाराम अर्जुन याा दोघांची समाजातील प्रतिष्ठितांत तसेच इंग्रज लोकांत ऊठबस होती. आपली मतं स्पष्टपणे मांडल्यामुळे आणि कणखरपणामुळे रखमाबाईंनाही या दोन्ही वर्तुळांत विशेष वागणूक मिळत असे. इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेल्यानंतर तिथेही रखमाबाईंना विचारवंत व अभ्यासू लोक भेटले. ऍलिस (बर्ट्रांड रसेलची पहिली पत्नी), हेन्रिएट्टा मुल्लर, पंडिता रमाबाई, इव्हा मॅक्लेरन अशी बरीच मंडळी त्यांच्या व्यक्तीसंग्रहात होती. त्या काळात परदेशातसुद्धा स्त्रियांचे वैद्यकीय शिक्षण तितकं सोपं नव्हतं. असं असताना रखमाबाईंनी भूलतंत्र, सुईणपण, दंतशास्त्र यांचा व स्त्रीरोगचिकित्सेचा विशेष अभ्यास केला. त्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन खास शिक्षण घेतलं. बाळंतपणाचं शास्त्र व बाळंतपणातल्या शस्त्रक्रिया या विषयांत ‘लंडन स्कूल ऑफ मेडिसिन’ इथल्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलं. त्याचसोबत शरीराला मालिश करण्याचं तंत्र आणि त्याचा अनुभवही त्यांनी घेतला. वैद्यकीय शिक्षणात स्त्री-पुरुष आपपरभाव न करणार्‍या या कॉलेजात ‘मुलींना पदवीदान करणे’, हे मात्र विद्यापीठाच्या कायद्यात बसत नसे. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे रखमाबाईंनी ही शेवटची परीक्षा ‘Onjoint board of the colleges of physicians and surgeons of Edinburgh and Glasgow’ या स्कॉटलंडच्या संस्थेत दिली आणि त्या उत्तम तर्‍हेने उत्तीर्ण झाल्या. ‘Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons’ ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचं नाव इंग्लंडच्या ’मेडिकल रजिस्टर’मध्ये सनदशीर दाखल झालं.
रखमाबाईंना शिक्षणात आर्थिक मदत करणार्‍या ‘डफरिन फंडा’तर्फे एकूण सात रुग्णालये उघडण्यात आली. पहिलं दिल्लीत निघालं. त्यानंतर मुंबईत ‘कामा हॉस्पिटल’, नंतर मग सुरत, बडोदा, मद्रास अशी पुढची रुग्णालयं चालू झाली. रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली. तिथे त्यांची नेमणूक ‘हाऊस सर्जन’ म्हणून झाली. इथे त्यांनी केवळ सहाच महिने काम केलं. कामा हॉस्पिटलमधल्या तात्पुरत्या नेमणुकीनंतर रखमाबाईंना सुरतच्या तेव्हाच्या ‘शेठ मोरारभाई व्रजभूषणदास माळवी हॉस्पिटल’मध्ये ‘मेडिकल ऑफिसर’ या पदावर नियुक्त करण्यात आलं. परदेशगमन, लग्नासंबंधीचा खटला अशा सगळ्या वादग्रस्त परिस्थितीत सुरतेची ही नोकरी त्यांच्या पथ्यावरच पडली.
त्यांचा वैद्यकीय कार्यकाल हा मुख्यत्वे वयाच्या साठाव्या वर्षांपर्यंत सुरत तर त्यानंतर राजकोट इथे गेला. दोन्ही ठिकाणी त्यांनी फक्त व्यवसाय हेच ध्येय न ठेवता सोबत समाजोपयोगी कामेही केली. सुरतेत तर पायाभरणीपासून सुरुवात होती. आधी तर बर्‍याचशा स्त्रिया कुठल्याच दवाखान्यात प्रसूतीसाठी जायला तयार नसायच्या. तेव्हा त्यांनी पुढाकार घेत दवाखान्यात प्रसूतीसाठी न येणार्‍या स्त्रियांचं समुपदेशन तर केलंच आणि त्यासाठी त्या शेवटपर्यंत अथक प्रयत्न करत राहिल्या. उपचारांसाठी आलेल्या स्त्रियांसोबतच्या मुलांसाठी बालक मंदिर स्थापन केलं. समाजाकडून अव्हेरलेल्या विधवा व त्यांच्या मुलांचं त्या आश्रयस्थान बनल्या. इतकंच नव्हे तर आसपासच्या स्त्रियांना लिहितावाचता यावं म्हणून त्या त्यांचे खास वर्गही घेत. स्त्रियांनी घराबाहेर पडून काही करावं म्हटलं तर सर्वसाधारणपणे घरांतल्यांकडून विरोध होतो, पण तोच विरोध त्या धार्मिक कार्यासाठी बाहेर पडत असतील तर तितकासा तीव्र राहत नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन रखमाबाईंनी प्रथमतः स्त्रियांना धार्मिक पुस्तक वाचनासाठी एकत्र केलं व नंतर त्यातून ‘वनिता आश्रम’ची स्थापना केली. इतर उपक्रमांसोबत विधवाआश्रम आणि अनाथाश्रम हे वनिताआश्रमचं मुख्य कार्य होतं. एकीकडे दिवसाचे अठरा तास काम, दर शनिवारी ‘आयरिश मिशन’च्या दवाखान्यात मोफत सेवा तर दुसरीकडे समाजिक कार्य, हे शिवधनुष्य त्यांनी सहज पेललं होतं.
एक डॉक्टर म्हणून त्यांचं काम महत्त्वाचं, पण त्यांनी इतर महत्त्वाची कामंही केली आहेत. सुरतेला असताना रमाबाई रानडेंनी अध्यक्षपद भूषवलेल्या १९०७ च्या सुरतेच्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या स्वागत समितीच्या चिटणीसपदी त्यांनी काम केलं, तर पुढे राजकोटला गेल्यावर ’रेडक्रॉस सोसायटी’ची शाखा उघडली. पहिल्या महायुद्धादरम्यानचं त्यांचं कार्य लक्षात घेऊन १९१८ साली त्यांना रेडक्रॉसतर्फे सन्मानपदक देण्यात आलं.
स्त्रियांसाठी खास विज्ञान-स्त्रीशिक्षकांच्या व्याख्यानमाला चालवल्या. इतकंच नव्हे, तर कामाठीपुरामधल्या स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानं घडवून आणली. स्वतःच्या आजोबांच्या मालकीचं गावदेवीचं मंदिर सर्वांसाठी खुलं केलं. अस्पृश्यांना, त्यांच्या स्त्रियांना हक्क आहेत ही त्यांची धारणा होती. ‘असमर्थांना आपण समर्थ बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु जे दुर्लक्षित आहेत त्यांच्या प्रश्नांचं काय’, ही भावना त्यांना छळत असे. अगदी ऐंशीच्या घरात वय असतानादेखील कुणा एकाकी मुलीला आसरा देणं, तिला लिहायला वाचायला शिकवणं, ‘मिडवाईफरी’ची परीक्षा द्यायला लावणं अशी कामं त्या करत राहिल्या. स्त्रियांना बँकांमध्ये खातं काढायला लावून बचतीचं महत्त्व कृतीतून तेव्हाही शिकवत राहिल्या.
जशा त्या कामामध्ये कणखर, स्वतःवरती अन्याय होऊ न देणार्‍या होत्या, तसंच इतरांवरही अन्याय होऊ नये, अशी त्यांची शिकवण होती. त्यांच्या एका शिष्येनं, रखमाबाईंनी भावाच्या सुनेला दिलेला सल्ला लिहून ठेवला आहे – ‘बायकोचे पोट हे नवर्‍याच्या पोटात’ हे तत्वत: मान्य कर, परंतु पाच-पंचवीस माणसांच्या घरात सर्वात शेवटी जेवायला बसणार्‍या बायकांचे जेवण आधी वेगळे काढून ठेवत जा. वरवर साध्या वाटणार्‍या या वाक्याचं काय मोल आहे, ते अशा परिस्थितीतून गेलेल्या स्त्रीलाच कळेल. वयानुसार डोळ्यांनी दिसणं अगदीच कमी झालं तेव्हा आजुबाजूच्या मुलांची ‘बालसभा’ घेत व त्यांच्या अंगी सभाधीटपणा यावा म्हणून गाणी-गोष्टी म्हणायला लावत. रखमाबाईंच्या कार्याचा आढावा घेतल्यास त्यांनी केवळ भारतीयांवर केवळ डॉक्टरी उपचार केले नाहीत तर समाजाचे स्वास्थ्य जपण्याचे कार्यसुद्धा पार पाडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -