घरफिचर्सतो झंझावात अजूनही आसपास आहे

तो झंझावात अजूनही आसपास आहे

Subscribe

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन. बाळासाहेब नावाचे वादळ राज्याच्या राजकारणात घोंघावले. महाराष्ट्र म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे बाळासाहेब असे समीकरण निर्माण झाले. त्यांनी प्रचलित राजकारणाच्या प्रथा आणि नियमांना तिलांजली देत आपले गारुड निर्माण केले. त्याचबरोबर स्वत:मधील निरागसपणा जपला. त्यामुळेच सर्वसामान्यांपासून ते दिग्गज राजकारण्यांमध्ये ते लोकप्रिय होऊ शकले. शिवसेनेचे तत्कालिन मुख्यपत्र मार्मिकमध्ये बाळासाहेबांसोबत काम केलेले ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी त्यांच्या जागवलेल्या या आठवणी...

१९८७ सालातली गोष्ट आहे. शिवसेनेने तेव्हा नव्याने महाराष्ट्रात घोडदौड सुरू केली होती. म्हणजे दोन दशके मुंबई ठाण्यापुरती असलेली शिवसेना खरोखरच महाराष्ट्रव्यापी पक्ष होण्यासाठी हातपाय हलवू लागली होती. पुण्यात किरकोळ निवडणुका लढवणार्‍या सेनेने पलिकडे औरंगाबाद या मराठवाड्याची राजधानी मानल्या जाणार्‍या शहरात पाय घट्ट रोवला होता. प्रथमच झालेल्या तिथल्या नव्या महापालिकेत शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता. तेव्हा ‘सामना’ सुरू झालेला नव्हता आणि ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सेनेचे मुखपत्र होते. त्याचा कार्यकारी संपादक म्हणून मी काम बघत होतो. औरंगाबादच्या पालिका निवडणुकीची यंत्रणा प्रामुख्याने मुंबईतील स्थानिय लोकाधिकार समितीने सांभाळली होती. त्याचा म्होरक्या दिलीप म्हात्रे त्या यशानंतर ‘मार्मिक कार्यालयात आला आणि निवडणुकीचे किस्से सांगत होता. तिथे शिवसेनेला बहुमतासाठी दोन जागा कमी पडल्या होत्या. पण अपक्षांच्या मदतीने ती त्रुटी भरून काढणे सहजशक्य होते.

पण निदान एक वर्ष तरी सेनेचा महापौर होऊ नये, असे तोच दिलीप म्हात्रे मला कळवळून सांगत होता. मी थक्क झालो. जो दिलीप स्टेट बँकेत अधिकारी म्हणून काम करताना सर्व पगारी रजा सेनेच्या अशा कामासाठी खर्च करीत होता, त्याला मिळालेल्या यशाचे कौतुक कमी आणि भविष्याची चिंता अधिक होती. इतक्या लवकर सेनेला सत्ता मिळाली, तर हे नवे तरुण अननुभवी नगरसेवक बिघडतील, याची त्याला फिकीर होती. स्वत: सत्तेपासून अलिप्त राहणारा दिलीप एकटाच असा शिवसैनिक नाही. खुद्द त्याला प्रेरित करणारा शिवसेनाप्रमुखही तसाच अजब माणूस होता. जग त्याला बाळासाहेब ठाकरे म्हणून ओळखते.

- Advertisement -

त्याच दरम्यान म्हणजे १९८७-८८ या कालखंडात कुठल्यातरी विषयावरून संपादक बाळ ठाकरे व माझी एका राजकीय विषयावरून चर्चा झाली होती. त्यांनी काहीतरी वादग्रस्त विधान केल्यामुळे सर्वत्र कल्लोळ माजला होता. त्यांनी अशी विधाने केल्याने शिवसेनेची मते घटतात किंवा मतदाराच्या मनावर विपरीत परिणाम संभवतो, असा मुद्दा मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत होतो. मी राजकारणाचा अभ्यासक असल्याने कुठलाही पक्ष कशामुळे मते मिळवतो वा गमावतो, ह्याच निकषावर विचार करतो आणि विश्लेषण करीत असतो. निवडणुकीत मते मिळवण्याच्या वा गमावण्याच्या निकषावरच बहुतेक राजकीय पक्ष व नेते जाहिर भूमिका घेत असतात. माझ्याही बोलण्याचा आशय तोच होता. माझा सगळा युक्तिवाद शांतपणे शिवसेनाप्रमुखही असलेल्या संपादक बाळासाहेबांनी ऐकून घेतला. मग मोजक्या शब्दांत त्यांनी आपल्या वादग्रस्त विधानाचा खुलासा केला. ‘मते जातील, कमी होतील, हे खरेच आहे. पण ती माझी मते जात नाहीत. कारण मी उमेदवारच नाही. हे मनोहरपंत, सुधीरभाऊ, महाडिक, नवलकर उभे राहतात, त्यांची मते जातील. मी निवडणूक लढवत नाही. कारण शिवसेनाप्रमुख पदासाठी कधी निवडणूक होत नाही. मतांचे सोड, मी बोललो त्यात चूक काय ते सांग. बरोबर असेल तेच मी बोलतो. मग मते मिळोत की जावोत.

या उत्तराने मला अवाक् केले. निवडणूक लढवणार्‍या कुठल्याही पक्षाचा म्होरक्या असे बोलू शकत नाही. किंबहुना एक एक मत मिळवण्याच्या समिकरणावरच कुठल्याही पक्षाच्या भूमिका ठरत असतात किंवा बदलत असतात. बाळासाहेब त्याला अपवाद होते आणि तितकाच कसल्याही अपेक्षेशिवाय पक्षासाठी अखंड मेहनत करणारा दिलीप म्हात्रेसारखा त्यांनी गोळा केलेला शिवसैनिकही राजकारणातला अपवाद होता. असा नेता आणि त्याने जमवलेले असे सवंगडी कार्यकर्ते समजून घेता आले, तर शिवसेना समजू शकते. तिच्याविषयी उहापोह करता येऊ शकतो. प्रचलित व प्रस्थापित राजकीय पक्ष व नेते कार्यकर्त्यांच्या निकषावर शिवसेनेचे राजकीय विश्लेषण होऊ शकत नाही. पन्नास वर्षांपूर्वी आपल्या राहत्या घरात बाळ ठाकरे नावाच्या व्यंगचित्रकाराने मराठी अस्मिता जपणार्‍या तरुणांचा एक सामाजिक गट स्थापन केला. तेव्हा त्याला राजकारणात काही करून दाखवण्याची महत्त्वाकांक्षा नव्हती, की समोर कुठला राजकीय आराखडा सज्ज नव्हता.

- Advertisement -

परिस्थितीने त्या इच्छेला जसे वळण दिले, तशी शिवसेना घडत गेली आणि काळाच्या उदरातून उलगडत आलेल्या प्रत्येक वादळाला अंगावर घेण्याचे कौशल्य दाखवत एक नेता महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात दाखल झाला. त्याला आपण आज बाळासाहेब ठाकरे म्हणून ओळखतो. तो कुठल्याही निकषावर राजकीय नेता ठरत नाही, तरी राजकारण करत होता आणि स्पर्धात्मक राजकारणात राहूनही त्यातल्या स्पर्धेपासून संपूर्ण अलिप्त होता. म्हणूनच जे त्याच्याही तुलनेत मोठे दिग्गज मराठी नेते विसाव्या शतकाने बघितले, त्यांच्या पासंगालाही उतरू शकणार नसतानाही त्याच बाळासाहेबांनी महाराष्ट्रावर आपली कायमची छाप सोडली. आचार्य अत्रे, मधू लिमये, एसेम जोशी, कॉम्रेड डांगे, यशवंतराव चव्हाण यांच्या तुलनेत बाळासाहेबांना राजकीय नेताही म्हणता येत नाही, इतके ते अननुभवी होते.

उपरोक्त नेत्यांनी महाराष्ट्र हे भाषिक राज्य मिळवण्यापासून तिथे राजकारण खेळण्याची पराकाष्टा केली. त्यांचा राजकीय अभ्यास संघटना कौशल्य आणि चतुराई यात बाळासाहेब खूप मागे आहेत. पण सार्वजनिक जीवनात जनमानसावर जादू करण्याची किमया इतरांच्या तुलनेत त्यांना अधिक जमली. आपल्या इशार्‍यावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खेळवण्याइतकी मजल बाळासाहेबांनी मारली, तरी कधीही कुठली निवडणूक लढवण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. कदाचित महात्मा गांधी सोडले तर सत्तापदापासून पुर्णपणे अलिप्त राहुन सत्तेलाही झुकवण्याची क्षमता राखलेला गांधींनंतरचा हा दुसरा भारतीय अपवाद म्हणता येईल. राज्यात वा देशात कुठल्याही पक्षाचे सरकार असो किंवा पूर्णपणे विरोधातला नेता सत्तेवर बसलेला असो, त्यालाही झुकवण्याची किमया या माणसाला कशामुळे साधली, हे कुणालाही न सुटलेले कोडे आहे. त्याचे उत्तर तितकेच सोपे आहे. ते उत्तर दिलीप म्हात्रेसारख्या हजारो शिवसैनिकांच्या अदृश्य इच्छाशक्तीमध्ये सामावलेले आहे. कुठल्याही पक्ष संघटनेत काम न केलेला हा माणूस, प्रतिभावंत व्यंगचित्रकार होता आणि त्याला परिस्थितीने राजकारणात ओढून आणले. ती जबाबदारी पार पाडताना त्याने आपल्यातला कलाकार कलंदर मरू दिला नाही. म्हणूनच कर्तव्यापलिकडे त्यांनी राजकारणाच्या आखाड्यात स्वत:ला बंदिस्त करून घेतले नाही. प्रत्येक सत्ताधारी पक्षाला वा सरकारला त्याचाच कायम धाक वाटत आला. सामान्य माणसाच्या मनातल्या भावना जाहिरपणे बोलण्याची हिंमत, ही बाळासाहेबांच्या राजकारणाची खरी शक्ती होती. कारण तितक्याच बेधडकपणे त्यांच्याच शब्दासाठी रस्त्यावर येणारा झुंजार तरूण त्यांनी आपल्या पाठीशी उभा केलेला होता. म्हणून तर पाठीशी पन्नास आमदार असताना या माणसाचा जो धाक होता, तोच पाठीशी पन्नास नगरसेवक वा दोन आमदार नसतानाही होता.

वादळ किंवा झंजावात कुठले संकेत देऊन येत नाही, की वाटेत आडव्या येणार्‍यांना दयामाया दाखवत नाही. जेव्हा ते वादळ थंडावते, तेव्हा सभोवतालचा परिसर आमुलाग्र बदलून गेलेला असतो. शिवसेनेचा उदय आणि बाळासाहेबांचा सार्वजनिक जीवनातील प्रवेश ही एकच घटना आहे. पण त्यानंतर क्रमाक्रमाने महाराष्ट्र व देशाचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यात कधी सहभागी होऊन, तर कधी त्यापासून अलिप्त राहून बाळासाहेबांनी घेतलेल्या भूमिकांनी राजकारणाचे स्वरूप किती बदलले आहे? १९६० पासून १९९० हा पहिल्या तीस वर्षांचा कालखंड आज कोणाच्या स्मरणातही उरलेला नाही. १९९० नंतरच्या राजकारणात जुन्या पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा आता बघायलाही शिल्लक उरलेला नाही. त्याचे श्रेय कोणाला देता येईल? दिर्घकाळ महाराष्ट्रातून काँग्रेसला पराभूत करायला राबलेल्या डांगे, अत्रे जोशींना असाध्य असलेले ते शिवधनुष्य १९९५ सालात बाळासाहेबांनी पेलून दाखवले. पुढल्या काळात त्यालाच रोखण्यासाठी जुने पारंपारिक सेक्युलर पक्ष काँग्रेससह एकवटत गेले, त्यात त्यांचाच पालापाचोळा होऊन गेला. उरल्यासुरल्या काँग्रेसला मतांच्या विभाजनानंतरही सत्ता मिळवणे आज अवघड होऊन बसले आहे. ही स्थिती त्या वादळाने आणली ज्याला अवघे जग बाळासाहेब म्हणून ओळखते. त्याची शक्ती कोणी कधी जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. ती शक्ती पदाची अपेक्षाही न करणार्‍या आणि कुठल्याही क्षणी रस्त्यावर उतरून आपले सर्वस्व पणाला लावणार्‍या लाखो निनावी शिवसैनिकात सामावलेली आहे.

बाळासाहेब आज हयात नाहीत; पण त्यांनी दिलेला वसा घेऊन जगणारे व शिवसेनेला पुढे घेऊन जाणारे तेच शिवसैनिक हयात आहेत. म्हणूनच त्यानंतरच्या प्रत्येक पिढीत तसे शिवसैनिक जन्माला येत गेले. त्यांनी आपल्या जगण्यात बाळासाहेबांचा अंश जपून ठेवलेला असेल, तोवर शिवसेना कायम राहील. तोच झंजावात व त्याची किमया कायम असेल. कारण बाळासाहेब अद्वितीय होते, तितकेच असे कार्यकर्ते व शिवसैनिक अद्वितीय असतात. त्यांनी आपल्या कृतीतून व वागण्यातून तेवत ठेवलेला बाळासाहेब अमर्त्य असतो. जो कुठल्या पदात, निवडणुकीच्या यशात किंवा सत्तेत नसतो. जसे शिवसेनाप्रमुख हे अढळपद त्यांनी स्वत:साठी निर्माण केले, तितकेच त्यांनी शिवसैनिक हेही अढळपद निर्माण करून ठेवलेले आहे. तशा प्रत्येक शिवसैनिकात नवा झंजावात निर्माण करण्याचे बीज ठेवून या झंजावाताने इहलोकीचा निरोप घेतला. बीज अंतर्धान पावते व वृक्षाच्या रुपाने अजरामर होते, तसा तो झंजावात अजून आसपास असल्याचे म्हणूनच अनेकांना जाणवत रहाते.

भाऊ तोरसेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -