घरफिचर्स‘सरंजामी छावण्या’

‘सरंजामी छावण्या’

Subscribe

लोकशाही व्यवस्थेत ‘लोक’ हे सर्वोच्च असतात याचा विसर पडून लोकांच्या सेवेसाठी नेमलेले सनदी नोकर आणि लोकप्रतिनिधी जनतेला आज ‘मालक’ वाटू लागले. हा आंग्ल संस्कृतीचाच प्रभाव होय. यातून जनतेचा सेवक हा ‘साहेब’झाला आणि जनतेकडे ‘दास्यत्व’ आले. वर्तमानात हीच लोकशाहीची सर्वात विदारक व करुण स्थिती म्हणावी लागेल.

स्वातंत्र्याप्राप्ती नंतर प्रजासत्ताक भारतातील विविध संस्थाने खालसा केली गेली.कारण लोकशाहीत ना कोणी ‘राजे’ना कोणी ‘महाराजे’. लोकशाहीच्या वृद्धीसाठी मध्ययुगीन मानसिकतेत अडकलेल्या भारतीय समूहाला हा संदेश सहेतुकपणे दिला गेला. ‘आम्ही भारताचे लोक’ सर्व एका समपातळीवर आहोत. म्हणून ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ हे संत वचन घटनाकारांनी घटनेत आणले. स्वातंत्र्य,समता,बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारीत नव-समाजाचे स्वप्न कल्पिले.त्यानंतर लोकशाही व्यवस्था स्वीकारुन आता साडेसहा दशकं उलटली. परंतु चित्र फार बदलले नाही. राजेशाहीतील ‘परिभाषा’ तितकी बदलली. पूर्वी सरदार,वतनदार,जहागीरदार वगैरे मंडळी सरंजामशाहीचे ‘वाहक’ होती. लोकशाहीत लोकप्रतिनिधी या भूमिकेत शिरले. त्यांनी स्वतःपुरता एक एक ‘सुभा’ सुरक्षित केला.त्या ‘सुभ्या’वर कायमच आपली ‘जहागिरी’ कशी शाबूत राहील याचीच काळजी घेतली.

- Advertisement -

निवडणुकीत एकदा ‘जय’ झाला की मग आपोआप विविध ‘संस्था’आकारास येतात.‘संस्था’ हाती असल्यामुळे कार्यभार सुलभ होतो.कारण हक्काची माणसं ‘कार्यकर्ते’ झाले की बरीच कामं बिनभांडवली होतात. हा तसा राजकीय नफाच.कदाचित म्हणून तर सहकारी संस्थेच्या मालकांना राजेशाहीतील मानाची ‘सम्राट’ ही उपाधी जनतेने बहाल केली असावी.खरं तर स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पिढीने हे कार्य उदात्त हेतूने लोकहितासाठी झपाटलेपणातून व्रतस्थपणे अंगिकारले होते. नंतर मात्र त्यांच्या पुढे नव्या पिढीतील ‘जमात’ कधी लोकांच्या मानगुटीवर बसली ते लोकांनाही समजले नाही!

या देशात अनेक शतकं राज्य केलेल्या परकीय सत्ता आणि इंग्रजी सत्तेच्या दीडशे वर्षाच्या अंमलाने गुलामीची सवय लागलेल्या आम्हा भारतीयांना लोकशाहीतील मूलभूत तत्वांचा खरा बोध झाला की नाही? हा प्रश्न कायम पडतो.कारण लोकशाही व्यवस्थेत ‘लोक’ हे सर्वोच्च असतात याचा विसर पडून लोकांच्या सेवेसाठी नेमलेले सनदी नोकर आणि लोकप्रतिनिधी जनतेला आज ‘मालक’ वाटू लागले. हा आंग्ल संस्कृतीचाच प्रभाव होय. यातून जनतेचा सेवक हा ‘साहेब’झाला आणि जनतेकडे ‘दास्यत्व’ आले. वर्तमानात हीच लोकशाहीची सर्वात विदारक व करुण स्थिती म्हणावी लागेल. ‘साहेबी’ बाणा एकदा अंगात शिरला की आम्ही या सामान्य जनतेचे प्रतिनिधी आहोत किंवा याचे प्रश्न सोडविण्यासाठी पगारी खुर्चीत नियुक्त आहोत ही मूळ भावना लयास जाते. लोकसेवेला बगल देऊन ‘जनसेवक’ स्वतःला ‘मालक’ अथवा या व्यवस्थेतील ‘राजे’ समजायला लागतात व दारिद्य्रात अडकलेला मागास,वंचित,गरीब समूह व यांच्या संस्थांमधील नोकरी करणारा घटक यांना आपला ‘गुलाम’ वाटू लागतो. आणि जनतेलाही बिनदिक्कतपणे हेच आपले मालक वाटू लागतात. म्हणून लोकशाहीच्या अंमलबजावणी नंतर देशातील पूर्वीची संस्थांनं ‘खालसा’ केली असली तरी लोकशाहीने निर्माण केलेल्या या नव्या वतनदारांच्या ‘सरंजामी छावण्या’ सरंजामीशाहीचे ‘विष’ पोटात घेऊन लोकशाही मूल्यांना नामशेष करायचे कार्य आजही करीत असतील तर लोकशाही राष्ट्राच्या प्रगतीतील हा मोठा धोका आहे.

- Advertisement -

‘समाजात वाढत जाणारी आर्थिक विषमता हीच येणार्‍या काळात देशाला अराजकतेकडे घेऊन जाईल’ हे विधान आजच्या वर्तमानात असंख्य तथाकथित देशभक्तांना व या सरंजामी छावण्यात ‘गुलाम’ बनून पाणी भरु पाहणार्‍या माणसांना हे रुचत नाही.कारण आमचा समाज हजारो वर्षे ‘व्यक्तीपूजक’ संस्कृतीचा वाहक राहिला आहे.लोकशाही मूल्यांच्या संवर्धनापेक्षा व्यक्तीच्या पायावर निष्ठा वाहण्याची परंपरा तशी आमच्याकडे जुनीच आहे. म्हणून तर आजही एखाद्या मतदारसंघात आजोबा, पंजोबाचा ‘वारसा’ म्हणून त्या घराचा ‘भार’ पुढे अनेक पिढ्या जनता वाहताना दिसते.

दुसरे असे की ‘सत्ता,सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता’ हे समीकरण देशात चांगलेच रुढ झाले आहे.सत्तेच्या जोरावरच काही मूठभर लोकांनी आपली नवी वतनदारी निर्माण केली आहे.आणि आज हे सर्व जातीत सापडतात.पूर्वी सरंजामदार म्हटला की वरच्या वर्गातील लोकांकडे बोट दाखविले जाई आता ठोकताळा कालबाह्य झाला आहे.ज्याला सत्तेची किंवा अधिकारी पदाची ‘ऊब’ मिळाली, आर्थिक संपन्नता आली की तो नवा ‘वतनदार’ झालाच समजा. पूर्वी या वतनात साखर कारखाने, शिक्षण संस्था,दूध संघ,बँका ही त्यांची शक्ती केंद्रे होत. नव्वदच्या दशकात देशात भांडवलशाहीचे वारे जोरात वाहू लागले.जनतेच्या मालकीच्या सहकारी संस्था मोडीत निघू लागल्या. शेतकरी,सभासद वार्‍यावर सोडला. ‘सहकारातून समृद्धीकडे’ फक्त घोषवाक्य उरले.समृद्धी मृगजळ ठरली.

सभासद भिकेला लागला,सहकारी बँका बुडल्या,कष्टकरी,सामान्य माणसांचे हाल झाले. पण उलट वतनदारांची भरभराटच होत गेली.त्यांनी वार्‍याची दिशा पाहून रस्ता बदलला. महाराष्ट्राच्या अंगोपांगी नागरीकरणाचे वारे शिरले तसे त्यांनी शहराकडे मोर्चा वळवला. शहरालगत जमिनी,हॉटेल्स,वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची शोरुम्स थाटली.यांना बिनदिक्कत हे सर्व मिळत गेले.शहरालगत एखादा बेभाव घेतलेला अथवा बळकवलेला ‘भूखंड’ काढला की निवडणुकीत एका पंचवार्षिकचा ‘श्रीखंड’ सहज खाता येतो हे तंत्र अनेकांना अवगत झाले. शहरी संस्कृतीने अनेक नवभांडवलदार जन्माला घातले.यातून दिवसेंदिवस ‘राजे’श्रीमंत होत गेले आणि ‘रयत’ आत्महत्या करू लागली.

अगदी सामान्य कुटुंबातून येऊन लोकप्रतिनिधी,अधिकारी झालेल्या मंडळींनी काही वर्षात उभे केलेले ‘साम्राज्य’पाहिले तरी डोळे दिपून जातात.राजकारणात बाप खासदार, मुलगा आमदार,भाऊ कारखान्याचा चेअरमन,सून जिल्हा परिषदेत,मुलगी पंचायत समितीत,उरला सुरला कोण तर कृषी उत्पन्न बाजार समिती,खरेदी विक्री संघ आहेच.अशी उदाहरणे ठळकपणे अवतीभवती दिसतात.यापलिकडे साम्राज्य विस्तारात शिक्षण संस्था,कारखाने,पेट्रोल पंप,हॉटेल्स,जमिनी,बंगले,खाजगी कंपन्याच्या एजन्सी,महागड्या गाड्या वगैरे पाहिले की यांचा ‘विकास’ जनतेने नेमका कोणत्या मापकाने मोजावा हा प्रश्न पडतो?

सामान्य माणूस मात्र हतबलपणे हे सर्व पाहत असतो.त्याला वाटत असते हाच आपला ‘राजा’आहे.आणि हेच आमचे स्वराज्य.‘साहेब’ मला ओळखतात.नावं घेवून बोलतात,माझ्या खांद्यावर हात टाकतात.कधी तरी अधूनमधून फोन ही येतो, तोच दाखवतो गावभर,साहेबांचा फोन आला इतके मिनिटे बोलले अमुकतमुक,डिजिटल बॅनरवर साहेबांच्या मोठ्या फोटो शेजारी बारका फोटो उठून दिसतो चौकात. वाढदिवशी याचेही असते आम्हाला अप्रुप, खिसा रिकामा करून. निवडणुकीचा हंगाम लागला की आमच्याच घरी असते बैठक. लागते बोली,ठरतात भाव आणि गल्लीनुसार ‘खोक्यातली’ योजना वाटायचे कंत्राट मिळते आम्हालाच. लग्न असो माती चुकवत नाहीत साहेब गावाला.म्हणून आम्ही असतो सातव्या आसमानावर. सभागृहात कधीच स्वतःसाठी काहीच मागत नाहीत.आमच्यासाठी तर भांडत असतात सरकारशी, मग अजून तरी काय हवे असते आम्हाला वगैरे वगैरे..

इथली भाबडी माणसं यातच खूश म्हणून तर लोकशाहीच्या बुडाखाली ‘जाळ’ लागू लागला.दिवसाला एक बँक लुटून लुटारू पळू लागला.व जनतेचा पैसा परदेशी खेळू लागला.

भावांनो तुमचे ,
साहेब मागत नाहीत सभागृहात स्वतःसाठी कधीच काही हे जरी खरं असलं तरी भेटत जाते बिनबोभाट सर्व काही त्यांना उलट….रस्त्यांवरच्या बेरोजगारांचा हातात पदव्या घेऊन चाललेला आकांत,पालावरची,आदिवासी पाड्यावरची,गावकुसाच्या बाहेरची रिकामी पोटं,रोज मरणाला आपलं करणारा शेतकरी,त्यांच्या बायकोचे उघडे कपाळ अन् हंबरडा फोडणारी त्याची चिल्ली-पिल्ली,खंगलेले मायबाप,आणि उघडं बोडखं शिवार,गावातून शहरात रोज स्थलांतरीत होणार्‍या हजारो वस्त्या.दिवसा ढवळ्या लुटल्या जाणार्‍या योजना,शहरी झोपडपट्ट्यात गटारीच्या कडेला किड्या मुंग्यासारखी जगणारी माणसं यांच्यासाठी तरी काहीही मागत नाहीत तुमचे ‘साहेब’ हेही सत्यच ना..!!

-गणेश मोहिते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -