सरकार कोणतेही असो आश्वासनांचा पाऊस पडतो; पण पदरी मात्र निराशाच येते. दरवर्षी यूजीसीकडून प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा (नेट) होते, त्यातूनदेखील विद्यार्थी उत्तीर्ण होतात. परंतु पाठीमागच्या पाच वर्षांपासून प्राध्यापक भरतीवरील बंदी उठली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस पास होणार्यांचे प्रमाण वाढत असले तरी नोकरी मात्र मिळत नाही. त्यातच तासिका तत्वावर काम करताना मिळणारा तुटपुंजा पगार घरभाडे आणि मेसचे भाडेसुद्धा भागवू शकत नाही. याच अनुषंगाने सध्या देशभर गाजत असलेला लघुचित्रपट पाहण्याचा योग आला. प्रा. शेख अस्लम युनूस दिग्दर्शित ‘तासिका’ नावाचा लघुचित्रपट तासिका तत्त्वावर काम करणार्या प्राध्यापकांवर बेतलेला आहे. महाराष्ट्रात आज हजारो युवक वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतात; पण ते तासिका तत्त्वावर…. त्यांच्या हालअपेष्टा या लघुचित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.
नुकताच संसदेमध्ये मोठ्या दिमाखात केंद्रीय वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अनेक बाबींवर विचार करून हा अर्थसंकल्प सादर करत आहोत असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषित केल्यानंतर त्यावरदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. वेगवेगळ्या क्षेत्रात युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. वगैरे कागदोपत्री घोषणा करून हा अर्थसंकल्प किती हिताचा आहे हे भासविण्यात आले. प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसत नाही. तो भाग अलाहिदा. कोरोना काळात बेरोजगारीमुळे आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. ही सर्व माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडून हा आत्महत्या संदर्भातील अहवाल मागविण्यात आला. या माहितीनुसार 2020 मध्ये सर्वाधिक म्हणजेच 3548 बेरोजगारांनी आत्महत्या केल्या. तर 2018 मध्ये 2641 जणांनी आत्महत्या केल्या आणि 2019 मध्ये 2851 जणांनी आत्महत्या केल्या. बेरोजगारीमुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे हेच या आकडेवारीवरून दिसते. कर्जबाजारीपणा आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण अत्यंत जास्त प्रमाणात वाढताना दिसत आहे हेदेखील या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम राबवत असून देशातील 692 जिल्ह्यांमध्ये मानसिक आरोग्य सुधारणा कार्यक्रम व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे, असे राय यांनी संसदेमध्ये सांगितले. हे सर्व कागदी घोडे नाचवत असताना प्रत्यक्षात मात्र युवकांना किंवा बेरोजगारांना याचा कोणताच फायदा होत नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे.
तरुणांचा देश असणार्या भारत देशामध्ये बेरोजगारीची वाढती समस्या अत्यंत विदारक आहे. प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी विद्यापीठातून डिग्री घेऊन बाहेर पडत आहेत. त्या त्या क्षेत्रातील नोकरी शोधत असताना होणारी ससेहोलपट न पाहणारी आहे. सरकार कोणतेही असो आश्वासनांचा पाऊस पडतो; पण पदरी मात्र निराशाच येते. दरवर्षी यूजीसीकडून प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा (नेट) होते, त्यातूनदेखील विद्यार्थी पास होतात. परंतु पाठीमागच्या पाच वर्षांपासून प्राध्यापक भरतीवरील बंदी उठली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस पास होणार्यांचे प्रमाण वाढत असले तरी नोकरी मात्र मिळत नाही. त्यातच तासिका तत्वावर काम करताना मिळणारा तुटपुंजा पगार घरभाडे आणि मेसचे भाडेसुद्धा भागवू शकत नाही. परिणामी याच प्राध्यापक पात्र उमेदवारांना गावाकडे जाऊन शेतामध्ये तसेच कंपनीमध्ये किंवा इतरत्र काम करावे लागते.
याच अनुषंगाने सध्या देशभर गाजत असलेला लघु चित्रपट पाहण्याचा योग आला. प्रा. शेख अस्लम युनूस दिग्दर्शित ‘तासिका’ नावाचा लघुचित्रपट तासिका तत्त्वावर काम करणार्या प्राध्यापकांवर बेतलेला आहे. महाराष्ट्रात आज हजारो युवक वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतात; पण ते तासिका तत्त्वावर…. त्यांच्या हालअपेष्टा या लघुचित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. प्राध्यापक म्हणून लोक आपल्याकडे पाहतात; पण CHB वरचे प्राध्यापक आहोत हे त्यांना माहिती नसते. हॉटेलवर काम करणार्या मुलांपेक्षाही कमी पगारात काम करणारे प्राध्यापक आहेत, हे ज्यावेळी लोकांना समजते त्यावेळी अपमानाचे जिने जगावे लागते. समाजात एकीकडे प्राध्यापक म्हणून प्रतिष्ठा तर मिळते; पण किमान वेतन कायद्यानुसारदेखील न मिळणारे वेतन कोणत्याच कामी पडत नाही. या लघुचित्रपटातले संवाददेखील तितकेच जिवंत आहेत. एक प्राध्यापक मेसवर डब्बा आणण्यासाठी जातात त्यावेळी मेसवाल्या काकू ज्यावेळी प्राध्यापकाकडे पैसे मागतात, त्यावेळी ‘पुढच्या पगाराच्या वेळी देऊ असे उत्तर तो देतो.’ लगेच त्या काकू म्हणतात, ‘अहो तुम्हाला प्राध्यापक तरी कसं म्हणावं.’ नेमकी ही समस्या मांडण्याचे काम दिग्दर्शकाने केलं आहे. तर दुसरा एक प्रसंग परिस्थितीची जाणीव करून देत असताना स्वप्नांमध्ये लग्न करणारा एक प्राध्यापक दाखवला आहे. प्रश्न इथेच संपत नाही तर एक एक पैलू उलगडत असताना दिग्दर्शकाने सर्व बाजू मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला दिसतो. एकीकडे कायमस्वरूपी असणार्या प्राध्यापकाचे जीवन आणि दुसरीकडे तासिका तत्त्वावर काम करणार्या प्राध्यापकांचे जीवन याच्यामधला फरकदेखील अधोरेखित करण्यात आला आहे.
घरी आल्यानंतर बायकोला शिवन कामामध्ये मदत करणारा प्राध्यापक या लघुपटामध्ये आपण ज्यावेळी पाहतो त्यावेळी विदारक परिस्थितीची जाणीव आपल्याला व्हायला लागते. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून असणारे राजकीय नेतेमंडळी त्यांच्या आंदोलनांमध्ये सक्रिय सहभागी होतात. पण पगारवाढीचा प्रश्न ज्यावेळी उपस्थित होतो त्यावेळी ‘विचार करू आणि हा मुद्दा मांडू’ असे आश्वासन दिले जाते. आज ना उद्या प्राध्यापक भरती होईल किंवा तासिका तत्त्वावरचा पगार वाढेल याच आशेवर जीवन जगणारा तासिका प्राध्यापक संघर्षमय जीवन जगतो त्यावेळी प्रत्येकाचं मन हेलावून जातं. एकीकडे इंग्रजी शाळेचे नाव न उच्चारू शकणारा सरपंच इंग्रजी शाळेची मागणी करतो. पण प्रत्यक्षात पिढ्या घडवणारा प्राध्यापक मात्र परिस्थितीपुढे हतबल होतो. एका वेळेनंतर विद्यार्थीसुद्धा प्राध्यापकांना बोलतात की, ‘सर व्यवसाय टाकायचा असेल तर बोला बाकी काही नको.’ ‘तासिका’ या लघु चित्रपटातील हे संवाद आणि वर उल्लेख केला ती परिस्थिती आपल्या आजूबाजूला पाहायला मिळते. हा लघुपट पाहत असताना असं वाटतं की आपलेही जीवन यापेक्षा काहीच वेगळं नाही. हीच परिस्थिती इतर क्षेत्रांमध्येदेखील पाहायला मिळते. विविध पुरस्कार प्राप्त करून घेणारा तासिका हा लघुपट प्रत्येकाने एकदा पाहावा असाच आहे.
मध्यंतरी युवकांनी वाढत्या बेरोजगारीची समस्या सरकारला लक्षात आणून देण्यासाठी डिग्री जाळून आंदोलन पुकारले होते. पण याची तात्पुरती दखलदेखील घेतली गेली नाही. निवडणूक लढवत असताना स्वतःच्या जाहीरनाम्यामधून राजकीय पक्ष बेरोजगारी दूर करू असे ओरडून सांगतात. पण निवडून आल्यानंतर वेगळ्याच गोष्टीकडे लक्ष वेधून घेतले जाते. आजही संसदेचे अधिवेशन सुरू आहे. विरोधी पक्षांनी प्रश्न विचारले तर त्यांच्यावरच उलट आरोप केले जातात. युवक एकत्र येऊन एखादे आंदोलन उभारतात सरकारला जागे करण्यासाठी. पण त्यांचे लक्ष दुसरीकडे वेधले जाते हे कर्नाटकच्या प्रकरणावरून आपल्याला दिसून येते. युवकांच्या समोर समस्यांचा डोंगर उभा असताना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ते अधिक गुंतागुंतीचे बनविण्याचे काम अलीकडच्या काळात होत आहे. आपण प्रत्येक जण कधी ना कधी तासिका या लघुपटातील प्राध्यापकांच्या भूमिकेत असतो, फक्त क्षेत्रं वेगळी असतात. समस्या मात्र कायम राहते ती म्हणजे बेरोजगारीची… यावर आज ना उद्या सरकार ठोस पावले उचलेल हाच आशावाद…