घरफिचर्सआधुनिक मराठी गद्याचे जनक

आधुनिक मराठी गद्याचे जनक

Subscribe

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा आज स्मृतिदिन. विष्णुशास्त्री हे ‘आधुनिक मराठी गद्याचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार. त्यांच्या अगोदर आधुनिक मराठी गद्य जवळजवळ अर्ध्या शतकाहून अधिक काळ निर्माण होत होते. परंतु त्यांनी त्याला अधिक प्रभावी स्वरूप प्राप्त करून दिले. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म २० मे १८५० रोजी पुणे येथे झाले. मुंबई विद्यापीठाची बी. ए.ची परीक्षा पुण्याच्या ‘डेक्कन कॉलेजा’तून ते उत्तीर्ण झाले. (१८७२) त्यानंतर पुणे व रत्नागिरी येथील सरकारी माध्यमिक शाळांतून त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. (१८७२-७९). विष्णुशास्त्र्यांचे वडील कृष्णशास्त्री हे संस्कृततज्ञ. इंग्रजी साहित्याचे जाणकार, रसिक, विद्वान आणि चतुरस्त्र मराठी लेखक असल्यामुळे विष्णुशास्त्र्यांनाही लेखनवाचनाची गोडी लागली.

कृष्णशास्त्र्यांनी चालविलेल्या शालापत्रक ह्या मासिकातून विष्णुशास्त्र्यांच्या लेखनाचा आरंभ झाला (१८६८) व त्यानंतर काही वर्षांतच ते ह्या मासिकाचे संपादकही झाले. तथापि त्यांच्या संपादकीय कारकीर्दीत शालापत्रकातून सरकार व ख्रिस्ती मिशनरी ह्यांच्यावर त्यांनी केलेल्या खोचक टीकेचा गवगवा होऊन शालापत्रक बंद पडले (१८७५). सरकारी नोकरीत असतानाच त्यांनी निबंधमाला, हे सुप्रसिद्ध मासिक काढले (१८७४). तसेच ज. बा. मोडक आणि का. ना. साने ह्यांच्या सहकार्याने काव्येतिहाससंग्रह हे मासिक सुरू केले (१८७८). आपल्या देशातील लोकांनी रचिलेली काव्ये, लिहिलेले इतिहास, बखरी असे साहित्य प्रसिद्ध करून त्यामार्गे देशसेवा करणे, हा हे मासिक काढण्यामागील हेतू होता. तथापि ह्या मासिकावर विष्णुशास्त्र्यांनी संपादक म्हणून आपले नाव घातले नव्हते. इंग्रजी शिकताना मराठी सोडू नये, असे त्यांची म्हणणे होते.

- Advertisement -

निबंधमाला हे विष्णुशास्त्र्यांचे प्रमुख जीवितकार्य. निबंधमालेच्या सात वर्षांच्या कारकीर्दीत निघालेल्या सर्वच्या सर्व म्हणजे ८४ अंकांतील लेखन विष्णुशास्त्र्यांनी जवळजवळ एकटाकी केले. निबंधमालेत विविध विषयांवर लिहिलेल्या त्यांच्या निबंधानी मराठी निबंधाला सामर्थ्य दिले आणि त्याच्या विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेले सॅम्युएल जॉन्सनच्या रासेलस ह्या ग्रंथाचे भाषांतर विष्णुशास्त्र्यांनीच शालापत्रकातून क्रमशः पूर्ण केले. ह्याच मासिकातून कालिदास, भवभूती, बाण, सुबंधू आणि दंडी ह्या संस्कृत कवींवर त्यांनी जे समीक्षात्मक निबंध लिहिले, ते पुढे संस्कृत कविपंचक ह्या नावाने प्रसिद्ध झाले.

शालापत्रक, निबंधमाला, केसरी इ. नियतकालिकांतून विष्णुशास्त्र्यांनी जे लेखन केले ते भाषा-साहित्यविषयक, सामाजिक, राजकीय असे विविध प्रकारचे आहे. त्यांच्या भाषा-साहित्यविषयक लेखांत मराठी भाषेची तत्कालीन स्थिती, भाषापद्धती, परभाषेतील शब्दांची योजना, इंग्रजी भाषा, कविता, विद्वत्व आणि कवित्व, ग्रंथांवरील टीका वगैरे विषयांवरील लेखन अंतर्भूत आहे. लोकभ्रम, अनुकरण, गर्व ह्यांसारखे विषय त्यांच्या सामाजिक लेखनात आलेले आहेत. ‘आमच्या देशाची स्थिती’ आणि ‘मुद्रणस्वातंत्र्य हे दोन लेख त्यांच्या राजकीय लेखनापैकी विशेष उल्लेखनीय होत. स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा ह्यांविषयीचा अभिमान ही त्यांच्या लेखनामागील प्रेरणा होती. ह्या तिन्ही संदर्भांत सामान्यतः उदासीन असलेल्या आणि इंग्रजी राजवटीच्या आहारी जाऊन स्वतःचा देश, त्याने दिलेला सांस्कृतिक वारसा आणि परंपरा ह्यांना कमी लेखणार्‍या तत्कालीन सुशिक्षितांना चेतवणी देणे हा त्यांच्या लेखनामागील एक प्रमुख हेतू होता. १७ मार्च १८८२ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -