घरफिचर्सजागतिक रेडिओ दिन

जागतिक रेडिओ दिन

Subscribe

जागतिक रेडिओ दिन 13 फेब्रुवारी 2012 पासून साजरा केला जातो. यानिमित्त इटलीमध्ये पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात आला. याचे आयोजन इटालॅडियोज संस्था, अभियांत्रिकी आणि दूरसंचार विभागाच्या वतीने करण्यात आले होते. 2011 साली युनेस्कोच्या 36 व्या सत्रामध्ये ‘जागतिक रेडिओ दिन’ची घोषणा करण्यात आली.

रेडिओचा शोध १८८५ साली माकरेनी याने लावल्याचे मानले जाते. मात्र, त्या आधीपासूनच जगातल्या विविध भागांत विविध बिनतारी प्रक्षेपणाचे प्रयोग सुरू होते. रेडिओचा भारतातला इतिहास तसा जुना आहे. जगदीशचंद्र बोस यांनीही अशाच एका प्रयोगाचे प्रदर्शन कोलकात्यात १८८४ साली केले होते. पुढे या रेडिओ तंत्राचा वापर सैनिकी व इतर कामांसाठी व्हायला लागला. भारतात रेडिओची सुरुवात १९२३ साली रेडिओ क्लब इथे झाली.

- Advertisement -

भारतात ‘बीबीसी’च्या धर्तीवर इंग्रज सरकारने ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ची स्थापना केली. 1927 साली पहिल्यांदा याचे प्रसारण सुरू झाले; तर 1932 साली बातम्यांचे प्रसारण होऊ लागले. 8 जून 1936 रोजी ‘भारतीय स्टेट ब्रॉडकास्टिंग’ सेवा ‘ऑल इंडिया रेडिओ’ झाली. रेडिओचा वापर दुसर्‍या महायुद्धात बातम्या देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाला. कोणत्याही तातडीच्या परिस्थितीत नागरिकांपर्यंत पोहोचणारे हे एकमेव माध्यम आहे.

सुरुवातीच्या काळात केवळ काही नळ्या व वायरच्या माध्यमांतून हे रेडिओ सेट तयार केले जात असत. पुढे लाकडाच्या कॅबिनेटच्या आकाराचे रेडिओ सेट आले. बॅकेलाइट म्हणजे सुरुवातीच्या काळातल्या प्लास्टिकचा शोध लागल्यानंतर मग रेडिओ तयार करण्यात त्याचा वापर होऊ लागला. १९५० नंतर प्लास्टिकचा वापर करून वेगवेगळ्या रंगांचे रेडिओ संच तयार करायला सुरुवात झाली. १९५४ साली लहान रेडिओ संचाचा म्हणजे ट्रान्झिस्टरचा उदय झाला. हे ट्रान्झिस्टर फारच महाग असत. त्यानंतर मात्र अगदी वेगवेगळ्या पद्धतीचे लहान-मोठे रेडिओ तयार होत गेले. लहान आकाराचे रेडिओ मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे धावते वर्णन ऐकायला वापरले जाऊ लागले. त्यानंतर केवळ हेडफोनच्या आकाराचे रेडिओ आले.

- Advertisement -

चिनी बनावटीचे आयपॉडच्या आकाराचे रेडिओही आले. सध्या मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या रेडिओंमुळे एक नवीनच क्रांती झाली आहे. १९७७ साली भारतात एफएम रेडिओचे तंत्रज्ञान आले व आकाशवाणीची लोकप्रियता पुन्हा वाढू लागली. सध्या आकाशवाणीच्या अनेक रेडिओ स्टेशन्सबरोबरच खासगी रेडिओ वाहिन्याही आपल्या कार्यक्रमाचे प्रसारण करत आहेत. खासगी एफएम वाहिन्यांची सुरुवात १९७७ साली मद्रासपासून झाली. त्यानंतर गोवा राज्यात काही खासगी रेडिओ वाहिन्यांना परवाने मिळाले. सध्या भारतातल्या ७२ शहरांमध्ये खासगी एफएम वाहिन्या कार्यरत आहेत.

‘रेडिओ’ची अचूकता अजूनही टिकून आहे, त्यामुळे त्याचे महत्त्व कधीही कमी झाले नाही. यावर जरी अनेक माध्यमांचे अतिक्रमण होत असले तरीही याची विश्वासार्हता टिकून राहिली आहे. हल्ली अनेक जणांना दृक-श्राव्य माध्यमे बसून पाहाणे शक्य नाही. त्यामुळे त्यांचा कल नक्कीच रेडिओकडे असतो. आकाशवाणीबद्दल सांगायचे झाले तर कोणत्याही भागांत ऐकता येणारे हे एकमेव माध्यम आहे. माहितीसह मनोरंजनाच्या क्षेत्रात असणारे हे मोठे आणि बलशाली माध्यम आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -