महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून पंढरीपूरच्या पांडुरंगाला ओळखले जाते. यात पंढरपूरची पायी वारी म्हणजे वारकऱ्याांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. या पाया वारीला हजारो वर्षांची परंपरा आहे. देशासह जगभरातील पर्यटक या पायी वारीचा आनंद घेत धन्य होतात. मात्र गेल्या वर्षभरापासून राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पायी वारीला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यंदाही पांडुरंगाच्या आषाढी एकादशी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्यातील १० मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाही अनेक वारकऱ्यांनी सरकारच्या निर्णयावरून रोष व्यक्त केला. परंतु आषाढी एकादशीप्रमाणे यंदा राज्याच्या लाडक्या दैवताचा सोहळा म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव सोहळ्यावरही कोरोनाचे संकट दिसून येत आहे.
गणेशोत्सव सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र राज्य सरकारने अद्यापही गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात कुठलीही नियामावली जाहीर केली नाही. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही गोंधळ निर्माण झाला आहे. गणेशमूर्तींची उंची किती असावा यांसह अनेक प्रश्न सध्या सार्वजिनिक गणेश मंडळांना पडले आहेत, ज्यामुळे यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सव सोहळ्याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
पावसाला सुरुवात होताच मुंबईतील अनेक गल्ली बोळ्यात, रस्त्यांच्याकडेजवळील बांधलेल्या मंडपात गणेश मूर्तीकारांची मूर्ती बनवण्याची लगबग पाहायला मिळते. मुंबईतील अनेक मोठ्या गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांची मूर्ती बुक करण्यासाठी रिग लागते. परंतु मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोना संकटामुळे हे चित्र पाहायला मिळत नाही. पण दुसरीकडे लहान मूर्ती बनवण्याचे काम सुरु आहे.
मात्र यंदाही कोरोनाचे संकट कायम असून तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. यात राज्य सरकारने अद्याप काही घोषणा केली नसली तरी गणेशमूर्तींच्या उंचीबाबत तडजोड करणार नाही अशी भूमिका काही मंडळांनी घेतली आहे. यासंदर्भात अनेक मंडळांनी आता सरकार दरबारी धाव घेतली आहे. मात्र अद्याप याबाबत कोणताही स्पष्टता देण्यात आलेली नाही.
यात गेल्या वर्षी उत्सव रद्द करणाऱ्या प्रमुख मंडळांनी यंदा कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सवात खंड न पडू देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र गणेशमूर्तींची उंची, पीओपीच्या वापराबद्दल असलेला संभ्रम, मंडपाच्या परवानग्या, सजावट, आगमन आणि विसर्जनाबाबतचे धोरण अशा अनेक मुद्द्यांबाबत कोणतीच स्पष्टता येत नसल्यामुळे हजारो मंडळांमध्ये सध्या संभ्रमामाचे वातावरण आहे.यात मुंबईतील काही मंडळांनी गणेशमूर्तींच्या उंचीबाबत तडजोड न करता, कोरोनाचे सर्व नियम पाळू सण साजरा करु अशी भूमिका घेतल्याने राज्य सरकार यावर काय निर्णय घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.