सध्या राज्यभरात सगळीकडे गणेशोत्सवाची तयारी उत्साहात सुरू आहे. 19 सप्टेंबर रोजी घरोघरी गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. तसेच 21 सप्टेंबर, आज रोजी गौराईचं आगमन झालं आहे. यादरम्यान, घरोघरी आलेल्या गौराईचा सुंदर साज श्रृंगार केला जातो. तिच्यासाठी गोडाधोडाचा नैवेद्य देखील केला जातो. राज्यभरात गौरी आवाहनच्या पहिल्या दिवशी गौराईला भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. तर गौरी पूजनाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखला जातो. परंतु कोकणामध्ये गौराईचं कौतुक थोड्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने केलं जातं. तिथे गौरीला नैवेद्य म्हणून चक्क मटण, चिकनचा नैवेद्य दाखवला जातो.
कोकणातील ही प्रथा अगदी अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं म्हटलं जात. मात्र, खरंतर पौराणिक कथेप्रमाणे यामागे एक कथा सांगितली जाते.
कोकणात गौराईला मासांहाराचा नैवेद्य का दाखवला जातो- पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, जेव्हा देवी पार्वतीचे लग्न महादेवांसोबत झाले होते, त्यावेळी माहेरी आईला भेटण्यासाठी जाणाऱ्या पार्वतीसोबत तिचे रक्षण करण्यासाठी महादेवांनी त्यांच्या भूतगणांना देखील पाठवले. माहेरी पोहोचल्यावर पार्वतीच्या कुटुंबियांनी तिचं खूप कौतुक केलं. तिच्यासाठी अनेक गोडधोड पदार्थ बनवले. मात्र, या सगळ्यात तिच्या माहेरच्या मंडळींनी महादेवांच्या भूतगणांची विचारपूस केली नाही. परंतु पार्वतीचे त्यांच्याकडे लक्ष होते. त्या भूतगणांना स्मशानात राहायची तसेच मांसाहार करायची सवय होती. त्यामुळे त्यांची अडचण पार्वतीच्या लक्षात आली आणि त्यावेळी तिने त्या भूतगणांसाठी मासांहाराची व्यवस्था करण्यास सांगितली. मासांहार वर्ज असताना देखील पार्वतीने भूतगणांसाठी मासांहाराची व्यवस्था केली. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात जेव्हा घरोघरी पार्वतीचे म्हणजेच गौरीचे आवाहन होते. त्यावेळी गौराईसाठी नव्हे तर तिच्या भूतगणांसाठी मांसाहाराचा नैवेद्या दाखवला जातो. मात्र अनेकांचा असा गैरसमज आहे की मांसाहाराचा नैवेद्य गौराईसाठी असतो. परंतु या कथेनुसार हा नैवेद्य तिच्यासोबत आलेल्या भूतगणांसाठी दाखवला जातो.