मुंबई : ‘गणपत्ती बाप्पा मोरया’च्या जयघोषात बुधवारी घरोघरी आणि विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मोठ्या उत्साहात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब काल रात्री लालबागच्या राजासह अन्य गणरायांचे दर्शन घेतले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जी, सौ. रश्मी वहिनी, तेजस ठाकरे जी यांनी आज लालबागच्या राजाचे तसेच गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाचे, चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन घेतले. pic.twitter.com/MbhRCWpz71
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) August 31, 2022
गेली दोन वर्षं कोरोना महामारीमुळे सर्व सणउत्सवांवर बंधने आली होती. अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या बाप्पाचा उत्सवही निर्बंधात साजरा करावा लागला होता. मात्र, यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्य सरकारने सर्वच सण-उत्सवावरील निर्बंध हटविले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे तसेच तेजस ठाकरे यांनी काल लालबागचा राजा, गणेश गल्लीतील मुंबईचा राजा, चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन घेतले.
भाजपावर टीका
कोरोनाचे संकट बऱ्यापैकी निवळले असले तरी दडपशाहीचे संकट कायमच आहे. गणराया, तू सुखकर्ता आणि विघ्नहर्ता आहेस. लोकशाही आणि घटनेने बहाल केलेले ‘मुक्त आणि निर्भय वातावरण’ निरंकुश सत्तालालसेच्या तावडीत सापडल्याने गुदमरले आहे. गणराया, देश ‘निर्भय’ कर, एवढीच प्रार्थना आज देशातील जनता तुला करीत आहे. तिचा स्वीकार कर, असे साकडे शिवसेनेने घातले आहे.
राज्यातील आणि देशातील सत्ताधाऱ्यांकडून हिंदू सण ‘मोकळे’ केल्याचे ढोल बडवले जात असले तरी प्रत्यक्षात देशातील वातावरण खरोखरच ‘मोकळे’ राहिले आहे काय? विरोधी पक्ष, नेते, सरकारचे टीकाकार यांची सत्ताधिकार आणि तपास यंत्रणांच्या माध्यमातून मुस्कटदाबी केली जात आहे. राज्या-राज्यांतील बिगर भाजप सरकारे शक्य होईल त्या मार्गाने बरखास्त केली जात आहेत. प्रादेशिक पक्षांचे तर नामोनिशाण संपवून टाकण्याची भाषा केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष करीत आहेत, अशी टीकाही शिवसेनेने केली आहे.
उत्कृष्ट देखाव्याला राज्य सरकारकडून बक्षीस
राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्य शासनाने स्पर्धेचे आयोजन केले आहे. [email protected] या ई-मेल वर 2 सप्टेंबरपर्यंत मंडळांना अर्ज करता येतील. महत्त्वाचे म्हणजे, राज्यस्तरावरील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्यास रुपये 5 लाख, द्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख 50 हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये एक लाख इतक्या रकमेची पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकांच्या गणेशोत्सव मंडळास 25 हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.