लॉकडाऊन काळात एका इंजिनीअरने कमाल केली आहे. आग्र्यातील एका इंजिनीअरने मातीशिवाय केवळ पाण्यात भाजीपाल्याची लागवड केली आहे. मातीशिवाय वनस्पती वाढवण्याच्या तंत्राला हायड्रोपोनिक (Hydroponic) म्हणतात. ज्यामध्ये पाण्यातील हवामान नियंत्रित केला जातो. या तंत्राद्वारे लॉकडाऊनमध्ये आग्र्याच्या नामनेर येथील रहिवासी अरुण अग्रवाल यांनी पाण्यात भाजीपाला लागवड करण्यास सुरवात केली. पाईपमध्ये, पाण्याच्या सतत प्रवाहात टोमॅटो, भेंडी, कारलं, कोथिंबीर, गवार या भाज्यांची त्यांनी आपल्या बागेत लागवड केली आहे.
अरुण अग्रवाल हे व्यवसायाने इंजिनीअर आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे घरीच होतेय. त्यामुळे त्यांनी पाण्यात शेती करायला सुरुवात केली. त्यांच्या मेहनतीचं फळ आता समोर आलं असून रोपट्यांना आता भाज्याही आल्या आहेत. पाइपमध्ये, मातीशिवाय केलेली भाजीची लागवड पाहण्यासाठी दूरदूरहून अनेक लोक येत आहेत. हायड्रोपोनिक तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात इस्राईलमध्ये वापरलं जातं. शेतात पेरणी न करता केवळ पाणी आणि पोषक द्रव्ये देऊन पिके घेतली जातात. रोपटं वाढवण्याचं हे तंत्र पर्यावरणपूरक आहे. या झाडांना पाणी कमी लागतं, ज्यामुळे पाण्याची बचत होते.