जन्माला आल्यानंतर बाळासाठी आईचं दूध हा एकमेव सकस आहार असतो. पण जसं जसं बाळ मोठं होऊ लागतं तस तशी त्याची भूकही वाढते आणि आईच्या दूधाने त्याची भूक भागेनाशी होते. मग सुरू होते नव्यानेच आई झालेल्या पहीलटकरीनची बाळाच्या जेवणासाठी धावपळ. बाळं छोटूसं असल्याने त्याला काय खायला द्यावं यापासून ते त्याला कसं भरवावं इथपर्यंत या आईला अनेक करामती कराव्या लागतातं.
मग डॉक्टरांनी आणि घरातील वडीलधाऱ्यांनी दिलेला सल्ल्यानुसार सुरू होतं बाळाचं डाएट. पहीले सहा महिने बाळाला आईच्या दूधातून पौष्टीक घटक मिळत असल्याने त्याला वेगळ्या अन्नाची गरज नसते. पण जर आईला दूध कमी येत असेल तर बाळाचे पोट भरत नाही. मग अशावेळी पावडरचे दूधाचा पर्याय डॉक्टर सुचवतात. ही पावडर पाण्यातून बाळाला किती प्रमाणात द्यायची याचंही प्रमाण असते. अशा प्रकारे बाळ सहा महिन्याचे झाल्यावर त्याला वरचा आहार सुरू करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
सुरुवातीला लगेचच हा आहार सुरू करू नये. कारण बाळाची पचनसंस्था फारच नाजूक असते. यामुळे दुधाव्यतिरिक्त दुसरा कुठलाही द्रव किंवा सॉलीड पदार्थाची बाळाच्या शरीराला सवय व्हायला वेळ लागतो. यामुळे सुरुवातीला दिवसातून जर आई बाळाला तीनदा स्तनपान करत असेल तर तीने त्यातील एका वेळेस दूध न देता बाळाला द्रव पदार्थ द्यावे. अशा पद्धतीने दूध कमी करत द्रव पदार्थ जसे तूरीचे सूप, मिक्स भाज्यांचे सूप, असा आहार सुरू करावा. तर कधी फळांचा रस. कधी कडधान्यांचा रस बाळाला द्यावा. अशा पद्धतीने बाळाचे दूध कमी करून त्याला पदार्थ खाऊ घालण्यास सुरूवात करावी.
बाळाला दात आले की मग त्याला पातळ वरण भात,मूगडाळ तांदळाची खिमटी, तर कधी कडधान्यांची खिमटी, पातळ मूगाची खिचडी देण्यास सुरुवात करावी.