बऱ्याचदा उन्हाळ्यात पाणी पिऊनसुद्धा तहान भागत नाही. वातावरणातील तापमान वाढल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. आपण याला डिहायड्रेशन म्हणतो. डिहायड्रेशन होऊ नये यासाठी जास्तीत जास्त पाणी आणि सरबतांचा आहारात समावेश ठेवायला हवा असं वारंवार सांगण्यात येतं. पण घाईगडबडीत असल्यामुळे आपण नेहमी सरबत पितो असं नाही. खरं तर सरबत कोण करत बसणार याच विचाराने आपण सरबत पित नाही. उन्हाळ्यात सरबत प्यायल्याने काय फायदे होतात ते आपण पाहू.
१. सरबतांमुळे शरीराला थंडावा मिळतो. तसेच डिहायड्रेशनमुळे शरीराची होणारी झीज भरुन काढण्यास मदत होते. त्यामुळे पाणी तर प्यावेच पण त्याचबरोबर सरबतदेखील आपल्या रोजच्या घाईगडबडीमध्ये पिण्याची गरज आहे.
२. पाणी प्यायलामुळे तात्पुरते बरे वाटते. मात्र तहान भागतेच असं नाही. मात्र सरबतामध्ये असलेल्या मीठ आणि साखरेमुळे उर्जा टिकून राहण्यास मदत होते. लिंबू, वाळा, कोकम, आवळा ही सरबते उन्हाळ्यात उपयुक्त ठरतात. ही सरबते घरच्या घरी तयार करणेही शक्य असते. उन्हातून आल्यावर सरबत घेतल्यामुळे तरतरी आणि उत्साह येतो.
३. उन्हामुळे वातावरणात कोरडेपणा येतो, त्याचप्रमाणे शरीरालाही कोरडेपणा येतो. त्यामुळे या काळात सरबत प्यायल्यामुळे टवटवीत वाटते आणि कामातील उत्साह वाढण्यास मदत होते. बऱ्याचदा सरबत प्यायलामुळे लगेच ताजेतवाने झाल्याचे आपल्याला जाणवत असेलच.
४. उन्हाळ्यामुळे अंगाची लाहीलाही होते, पण डोळ्यांची आणि हातापायांचीही जळजळ होते. हा त्रास होऊ नये यासाठी सरबते उपयुक्त ठरतात. सरबत प्यायलामुळे अंगातील जळजळ कमी होऊन थंडावा निर्माण होतो. शरीरातील ताकद कमी होते ती भरून काढण्यासाठीदेखील सरबत चांगलं असतं.
५. सरबतामध्ये आंबट, खारट आणि गोड अशा तिन्ही गोष्टींचा समावेश असतो. उन्हाळ्यात प्रत्येकाच्या शरीराला या तिन्ही गोष्टींची गरज असते. ती पाण्यामधून पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे सरबत हे शरीराला उपयुक्त ठरते.