दिवाळी सण आहे आनंदाचा, रोषणाईचा आणि उत्साहाचा. अशी ही उत्साहाची दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असून तिचे स्वागत करण्यासाठी घरोघरी जोरदार तय्यारी सुरू आहे. प्रामुख्याने या दिवसात गणपती बरोबरच लक्ष्मीदेवीचीही मनोभावे पूजा अर्चना केली जाते. यामुळे गणेशाबरोबरच माता लक्ष्मीचे स्वागत स्वच्छ आनंदी वातावरणात करण्यासाठी घरोघरी या दिवसात साफ सफाई केली जाते. लक्ष्मी मातेला स्वच्छता प्रिय आहे. यामुळे ज्या वास्तूत स्वच्छता असते तिथे तिचा निवास असतो. अशी धारणा आहे. यामुळेचं दिवाळं सणाआधी घरात साफसफाई केली जाते.
पण विशेष करून नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ही साफसफाई एखाद्या आव्हानासारखीच असते. कारण बरेचजण दिवाळी टू दिवाळी अशीच घऱाची सफाई करतात. यामुळे वर्षभराचा पसारा एकदम काढावा लागतो. तो केव्हा आवरायचा . पुन्हा घर लावायचं हे तसं डोकेदुखीचं काम. त्यातच हाताशी मदतीला जर कोणी नसेल तर मग कंबरंड मोडलंच समजा. पण हा फाफट पसारा जर तुम्ही प्लान करून आवरलात तर ऐन दिवाळीत कंबरदुखीने बेजार होण्याची वेळ येणार नाही. त्यासाठी या काही टिप्स.
- घर साफ करताना डोळ्यांवर गॉगल, तोंडावर मास्क लावावा. जेणेकरून धूळ नाका तोडांत जाणार नाही. हातात ग्लॉव्हज घालावेत.
- नेहमी सफाईची सुरुवात ही सिलिंगवर लटकलेली जळमटं काढण्यापासून करावी.
- नंतर पंखे, दरवाजे , खिडक्या,भिंती, ग्रील स्वच्छ करावेत. कारण याच जागांवर अधिक धूळ चिकटत असते.
- त्यानंतर घरात नको असलेल्या अडगळीत पडलेल्या वस्तू फेकाव्यात. यात चपला, तुटकी फुटकी भांडी, रद्दी, फाटलेले, रंग उडालेले कपडे, मोडके फर्निचर, क्रॉकरी, धूळ खात पडलेली नको असलेली पुस्तक, खेळणी, एक्सपायरी डेट संपलेली औषध, गोळ्या, कॉस्मेटीक्स, बंद पडलेल्या इलेक्ट्रीक वस्तू अशा गरज नसलेल्या वस्तूंचा समावेश करावा.
- बऱ्याचवेळा कामा येईल या विचाराने आपण अनावश्यक वस्तू, सामान, कपडे विकत घेतो. मात्र अशावेळी जुनं न फेकता तेही सांभाळून ठेवतो. यामुळे पसारा वाढत जातो. नंतर परिस्थिती अशी होती की कपाट उघडले की कपड्यांचा डोंगरच अंगावर कोसळतो.
- तर कधी फडताळतलं एक भांड शोधण्यासाठी दहा भांडी उलथी पालथी करावी लागतात. जी आपण वर्षभर वापरलेली सुद्धा नसतात. म्हणजेच ती गरज नसताना जमवलेली भांडी असतात. यात पैसाही गरज नसताना खर्च होतो आणि जागा नसल्याने भांडीही इकडे तिकडे ठेवावी लागतात. त्यामुळे अशा अनावश्यक गोष्टी तातडीने बाहेर काढाव्यात.
- अशा प्रकारे हॉल, किचन, बेडरुम एकामागोमाग एक साफ करून घ्यावं. त्यातील अनावश्यक वस्तू फेकल्यानंतर आपल्याच घरातला फरक पाहावा.
- जर बाल्कनीतील झाडे सुकलेली असतील तर ती फेकून द्यावी. त्याठिकाणी नवीन रोपटे लावावे.
- किचन सिंक आणि बाथरुम सगळ्यात शेवटी क्लिन करावे.
- यापद्धतीने घर साफ केल्यास १ ते २ दिवसात घराची साफसफाई सहज करता येते.
हेही वाचा :