अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला असून, या कालावधीत तळलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. परंतु पॅकिंगचे तेल हे आरोग्यास घातक असल्याने पदार्थ तळताना आणि अन्न शिजविताना घाण्याचा तेलाचा समावेश करावा, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे. रिफाइंड म्हणजेच पॅकिंगच्या तेलामुळे चरबीचे प्रमाण वाढते, तसेच कोलेस्टरॉलचे प्रमाणही वाढते. त्यामुळे शरीरासाठी ते अपायकारक असल्याने घाणा तेल, तसेच आलटून-पालटून शेंगदाणे, सूर्यफूल, राई अशा तेलांचा आहारात समावेश योग्य ठरतो.
घाण्याचे तेल
शेंगदाणे, खोबरे, राई, बदमांच्या बियांपासून तेल काढले जाते. घाण्यावर पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने तेल काढले जाते. नैसर्गिक पद्धतीने शुद्धीकरण केले जाते. यामध्ये १०० टक्के नैसर्गिक आणि जैविक घटक असतात. तेलाला नैसर्गिक चव, रंग आणि सुगंध असतो, तसेच आहारात कमी प्रमाणात लागते. घाण्याचे तेल शरीराला अपायकारक नाही.
तळणासाठी कोणते तेल वापरावे? शेंगदाणा, कॅनोल वनस्पती, सोयाबीन आणि तूप यांचा समावेश तळणासाठी योग्य ठरतो कारण त्यामध्ये नेसर्गिक घटक असतात. तसेच पचनासाठी उत्तम असते. यांच्या वापरामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित रहाते आणि हृदयरोग टाळण्यासाठी देखील हे तेल उपयुक्त ठरत आहे,
तेलाचे प्रमाणात किती घ्याल…
मोठ्या व्यक्तीसाठी २० ग्रॅम, लहान मुलांसाठी २५ ग्रॅम, तर वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न असेल तर १५ ग्रॅम म्हणजेच तीन चमचे तेलाचा वापर करावा, जेणेकरून आहार संतुलित रहातो.
पॅकिंगचे तेल
पॅकिंगचे तेल फिल्टर केल्यामुळे त्यातील पोषणमूल्ये कमी होतात. तेलाचा रंग, चव आणि सुगंध इतर गुणधर्म सुधारण्यासाठी विविध रासायनिक प्रक्रियांचा वापर केला जातो. या तेलातील अन्न खाल्ल्यास शरीरात मेदाचे प्रमाण वाढते. त्यामुळे अनेक आजार बळावतात.
आहारात तेलाचा कमी समावेश करावा. तळलेले पदार्थ कमी खावेत. खायचेच असतील तर शॅलो फ्राय करून खावे. रिफाइंड तेलापेक्षा घाण्यावरील तेल आरोग्यासाठी चांगले असते. दररोज व्यायाम करावा.
– डॉ. राजीव तांबाळे
वार्ताहर :- रत्नाकर पाटील