लग्न हे आयुष्यभराचे नाते आहे. हे नाते टिकवून ठेवण्यासाठी, दोन लोक एका बंधनात एकत्र येतात आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य एकत्र घालवण्याचे एकमेकांना वचन देतात. हे नाते पती-पत्नी दोघांसाठीही खूप खास असते आणि त्यासाठी दोघांनाही अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि जुळवून घ्यावे लागते. परंतु महिलांसाठी ते अधिक कठीण असते. माहेरचे घर आणि पालक सोडून नवीन कुटुंब स्विकारण्यासोबतच, महिलांवर अनेकदा अनेक प्रकारचे दबाव येतात. चांगली सून आणि पत्नी होण्यासाठी महिलांना अनेकदा मानसिक दबावाचा सामना करावा लागतो आणि हळूहळू त्या गुड वाईफ सिंड्रोमच्या बळी होऊ लागतात. आज आपण जाणून घेऊयात की गुड वाईफ सिंड्रोम म्हणजे नक्की काय आणि महिलांच्या वैवाहिक जीवनात हे दु:खाचे कारण कसे बनू शकते याविषयी.
कशी होते सुरुवात ?
महिला हळूहळू या सिंड्रोमच्या बळी बनतात. याची सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींपासून होते. प्रेमाच्या नावाखाली केलेले बदल महिला स्विकारू लागतात आणि स्वतःला पटवून देतात की पत्नीने समजूतदार असले पाहिजे कारण प्रत्येक पतीला तेच हवे असते. ती स्वतःला पटवून देते की प्रेम म्हणजे त्याग आणि अनेक प्रकारे ती करते, परंतु हे त्याग फक्त एकतर्फी होत जातात. या विचारसरणीमुळे, पत्नीला तिच्या संयमाचा आणि एकाकीपणा सहन करण्याच्या क्षमतेचा अभिमान वाटतो. ती जास्त भावनिक, गरजू किंवा कोणत्याही प्रकारची मागणी न करणारी बनते. परंतु तिला हे कळत नाही की प्रत्यक्षात ती आतून कमकुवत होत चालली आहे आणि येथूनच ‘गुड वाईफ सिंड्रोम’ सुरू होतो.
महिला या सिंड्रोमला का बळी पडतात?
महिला कमकुवत असल्याने त्या या सिंड्रोमला बळी पडत नाहीत. तिचे तिच्या कुटुंबावरील प्रेम आणि विश्वास मजबूत असल्याने ती याला बळी पडते. तिला असे वाटू लागते की ती या असंतुलित नात्याचा भार एकटी सहन करू शकते. तिच्या मते, कुटुंबाला आनंदी ठेवणे हे तिचे काम आहे, म्हणून ती तिच्या गरजांकडे दुर्लक्ष करते आणि शांतपणे सर्व काही सहन करते व कुटुंबाच्या सुखातच स्वत:चे सुख समजते.
समाजाची इच्छा बनते सिंड्रोमचे कारण :
आपल्यापैकी बऱ्याच महिलांना अनेकदा सांगितले आणि शिकवले जाते की प्रेम सहनशील आणि दयाळू असते. परंतु, एक समाज म्हणून आपण महिलांना हे सांगायला विसरतो की प्रेम ही केवळ दिली जाऊ शकणारी भावना नाही तर ती बदल्यात मिळू देखील शकते. असं अजिबात नाही की स्त्री तिचे नाते तोडू शकत नाही, परंतु असे असूनही ती नात्यात राहते, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचे मतभेद झाल्यास स्वत:हून नमते घेते कारण तिच्या मनावर कायम अशाच विचारांचा पगडा असतो की नाते तोडण्यापेक्षा भांडण झालं तरी त्याच नात्यात राहणे केव्हाही चांगले.
गुड वाईफ सिंड्रोमपासून मुक्त कसे व्हावे ?
गुड वाईफ सिंड्रोमवर भांडण करणे किंवा बंडखोरी करणे हा इलाज असू शकत नाही. यासाठी प्राथमिक चिन्हे ओळखणे आवश्यक आहे. प्रेम टॉक्सिक तर होत नाही ना, नात्यात एकाचाच हुकूम चालत तर नाहीये ना याची पडताळणी करणे गरजेचे आहे. चांगली पत्नी असण्याचा अर्थ स्वत्व गमावणे असा होत नाही. तुमचा आनंद आणि तुमचे जीवन जगण्याचा अधिकार न सोडता देखील तुम्ही एक चांगली पत्नी होऊ शकता.
हेही वाचा : Yoga For Hair : या योगासनांनी केस होतील दाट आणि मजबूत
Edited By – Tanvi Gundaye