श्रावण महिन्यात शास्त्रानुसार सोमवारी तीन प्रकारचे व्रत करतात.. सोमवार, सोळा सोमवार आणि सौम्य प्रदोष. सोमवार व्रताची विधी सर्व व्रतांप्रमाणेच असते. या व्रताची सुरूवात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून केली जाते. श्रावण महिना भगवान शंकराला प्रिय असण्यामागचे कारण म्हणजे या महिन्यात देवी पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते. श्रावणी सोमवारी देशभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची रीघ लागलेली असते. महादेव शिवशंकरावर या दिवशी जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्याचप्रमाणे प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचे महत्त्वही वेगळे आहे. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मुग आणि चौथ्या सोमवारी जव शिवामूठ म्हणून वाहण्याची पद्धत आहे. श्रावण महिन्यात पाचवा सोमवार आल्यास शिवामूठ म्हणून सातू वाहण्याची परंपरा आहे.
मंगळागौर
श्रावण महिना हिंदू धर्मात खूप शुभ समजला जातो. या महिन्यात अनेक उपवास, व्रत- वैकल्य केली जातात. या महिन्यात अनेक सण समारंभ साजरे केले जातात. अगदी घरगुती सणांचाही हा महिना मानला जातो नवीन लग्न झालेल्या मुलींची मंगळागौर ही याच महिन्यातील मंगळवारी साजरी केली जाते. श्रावणात मंगळागौर पुजनाला अतिमहत्त्व आहे. या दिवशी लग्न झालेल्या महिला मंगळागौरीची पूजा करतात. जसा श्रावण महिना भगवान शंकराला प्रिय असतो. त्याचप्रमाणे शंकरासोबत देवी पार्वतीचीही पूजा केली जाते. देवी पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी सोळा सोमवारचे कडक व्रत केले होते. त्याचप्रमाणे नवविवाहित महिला आपल्या पतीसाठी तसेच संतानासाठी ही पूजा करतात.
यासाठी अशाच नवविवाहित महिलांना बोलावून सकाळी एकत्रित पूजा केली जाते व त्यानंतर रात्री जागरण केले जाते. जागरणाच्या वेळी, विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे. खेळांमध्ये परंपरागत चालत आलेली गाणीही म्हणतात. वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा, असे साधारणतः 110 प्रकारचे खेळ यात खेळले जातात
जिवतीची पूजा
जरे जीवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनी। रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोस्तुते।। असा श्लोक जिवतीची पूजा करताना म्हटला जातो. श्रावणातल्या चारही शुक्रवारी जिवतीची पूजा करतात. ही पूजा संततीरक्षणार्थ मानली जाते. जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी, असे सांगितले जाते. जिवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस लावला जातो आणि वाराप्रमाणे त्याची पूजा केली जाते. या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले आहे. या तिन्हींची माळ करून ती जिवतीला घालावी. यासह 21 मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र घालावे. गंध, अक्षता वाहाव्यात. धूप, दीप अर्पण करावे. साखरेचा, चणे-फुटाण्यांचा आणि पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर आरती करावी. जिवतीची पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे. मुले परगावी असल्यास चारही दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होईल. त्या दिवशी देवीची ओटी भरावी.
नागपंचमी
श्रावण महिना सुरु झाला की, श्रावणात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. यंदा 21 ऑगस्ट रोजी नागपंचमी आहे. भगवान शंकराला श्रावण मासातील आराध्य दैवत मानले जाते. त्यामुळे या भगवान शंकराच्या गळ्याभोवती विराजमान असलेल्या नागालाही तितकेच विशेष महत्त दिले जाते. म्हणूनच नागपंचमीला नागाची पूजा विशेष मानली जाते. श्रावण महिना हा पावसाचा म्हणजेच वर्षा ऋतू असतो. ज्यामुळे भूगर्भातील नाग बाहेर भूतलावर येतात. त्यामुळे भूतलावरच्या लोकांना त्यांचा त्रास होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमी ची पूजा केली जाते. श्रावणात नवविवाहित मुली आपल्या माहेरी जाण्याची प्रथा आहे. या दिवशी नवविवाहित तसेच विवाहित स्त्रिया साजश्रृंगार आणि रत्नजडित अलंकार परिधान करतात व मनोभावे नागाची पूजा करतात. नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया आपल्या भावासाठी नागपंचमीचा उपवास करतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाहीत. अनंत म्हणजेच शेष, वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या आठ नागांची या दिवशी पूजा केली जाते.
नारळी पौर्णिमा – रक्षाबंधन
नारळी पौर्णिमा हा सण कोळी बांधव साजरी करतात. समुद्रकिनारी राहणारे व समुद्राशी खूप जवळचा संबंध असणारे कोळी लोक हा सण खूप उत्साहाने साजरी करतात. यंदा 30 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा हा सण सुद्धा साजरा होणार आहे. श्रावण पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. या दिवशी पावसाळ्यामुळे उधाण आलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी विधिवत त्याची म्हणजे जलदेवता वरुणाची पूजा करून त्याला नारळ अर्पण केला जातो. महाराष्ट्रात नारळीपौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे. ज्यांचा समुद्राशी निगडित असा कुठलाही व्यवसाय नाही अशी मंडळीदेखील कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी समुद्राला नारळ अर्पण करतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी राखी पौर्णिमा असते. मुळात रक्षाबंधन हा सण उत्तर भारतात खूप प्रमाणात साजरी होतो परंतु आता हा उर्वरित भारतातही हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाला ओवाळते व त्याच्या उजव्या मनगटाला राखी बांधते.
कृष्ण जन्माष्टमी
जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस.श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून हा दिवस कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. यंदा 6 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाणार आहे. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी कृष्ण जन्माष्टमी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. याला गोकुळाष्टमी असेही म्हटले जाते.
बैलपोळा
श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी संपते नाहीतर लगेच पिठोरी अमावस्या येते. पिठोरी अमावस्या हा श्रावणातला शेवटचा सण. त्यालाच सर्जा-राजाचा सण म्हणजेच ‘पोळा’ म्हटलं जात. हा सण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा महत्वाचा सण आहे. या दिवशी बैलांचा थाट असतो. त्यांचाकडून कोणत्याच प्रकारची कामं करून घेतली जात नाहीत. या दिवशी आपला बैल सगळ्यात जास्त उठून दिसावा म्हणून शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलांसाठी शृंगार खरेदी करतो. पोळ्याच्या दिवशी सकाळी सर्व प्रथम बैलांना नदी किंवा तळ्याच्याकाठी नेऊन आंघोळ घातली जाते. त्यांना शाल झालरींनी सजवले जाते, त्यांच्या शिंगांना रंगवले जाते. गळ्यात हार, डोक्याला बाशिंग, पायात चांदीचे व करदोड्याचे तोडे, नवी वेसण, नवे कासार घातले जातात. शेतकऱ्यांची बायको बैलांची पूजा करते. या दिवशी घराघरांमध्ये पुरण पोळी, करंजी व 5 भाज्यांची भाजी केली जाते. आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी पिठोरी अमावस्येचे व्रत माता करतात. सायंकाळी आठ कलशांवर आठ मातृका (देवीची रूपे) ठेऊन त्यांची आणि चौसष्ठ योगिनींची पूजा करतात आणि आपले सौभाग्य आणि विशेषतः मुलांसाठी आयुरारोग्य, सुखसंपत्ती वगैरे मागून त्यांच्यासाठी प्रार्थना करतात.