उत्तम आरोग्य हवं असल्यास किमान ८ तासांची झोप घेणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. दिवसभर काम केल्यामुळे आपलं शरीर थकलेलं असतं. त्यामुळे साहाजिकच सर्व अवयवांना आरामाची गरज असते. याशिवाय ज्यावेळी आपण झोपतो त्याहीवेळी आपलं शरीर कार्यरत असतं. आपण झोपेत असताना आपलं शरीर रक्त शुद्धीकरणाचं तसंच शरीरातील विषयुक्त पदार्थंचं विभाजन करण्याचं काम करत असतं. यामुळे आपल्या शरीराला झोपेची अत्यंत आवश्यकता असते. मात्र, बरेच लोक हवा तितका वेळ शरीराला आराम देत नाहीत. आवश्यक तितकी झोप घेत नाहीत आणि याचा विपरीत परिणाम त्यांच्याच आरोग्यावर होतो. अर्धवट झोपेमुळे शरीराला काय अपाय होऊ शकतात, याविषयी जाणून घेऊयात.
हाडांचे विकार – आवश्यक झोप न झाल्यास शरीरातील मिनरल्सचे प्रमाण बिघडते. यामुळे कालांतराने हाडं कमजोर व्हायला लागतात. यामुळे पाठदुखी, पायदुखी तसंच सांधेदुखी सारख्या समस्या उद्भवू शकतात.
कर्करोग – तज्ञ सांगतात की पुरेशी झोप न झाल्याने शरीरातील कोशिकांना हानी पोहचते. अपुऱ्या झोपेमुळे स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका संभावतो.
हृदय विकार – आपण झोपेत असताना आपल्या शरीरातील रक्ताच्या शुद्ध-अशुद्धीकरणाचं विभाजन सुरु असतं. झोप अपूर्ण झाल्यास उच्च रक्तदाबाचा धोका बळवण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाबाचं प्रमाण वाढल्यास ऱ्हदय विकाराचा झटका येऊ शकतो.
मधुमेह – झोप पूर्ण न झाल्यास झोप आपल्याला सारखी सारखी भूक लागते. यामुळे आपल्या शरीरात जास्त जंक फूड जाण्याची शक्यता असते. यामुळे उच्च रक्तदाब किंवा मधुमेह यांसारखे विकार होऊ शकतात.
मानसिक ताण – आपल्या मानसिक स्थितीवरही अपुऱ्या झोपेचा परिणाम होत असतो. झोप अपुरी झाल्यास त्याचा परिणाम आपल्या मेंदूवर आणि परिणामाने आपल्या विचारप्रक्रियेवर होतो. यातून आपलं मानसिक संतुलन बिघण्याची आणि मानसिक रोग उद्भवण्याची शक्यता असते.