दिल्ली पाठोपाठ मुंबईसारख्या शहराला वायू प्रदूषणाने विळखा घातला आहे. मुंबईत होणार्या अनेक बांधकामांच्या कामामुळे धूलिकण, वाहनांद्वारे होणारे प्रदूषण आणि औद्योगिक विभागातून निघणारे रासायनिक कण हवामानात असणार्या आर्द्रतेमुळे हे विषारी धूलिकण हवेतच तरंगल्यामुळे वाढत्या प्रदूषणाच्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असणारा नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण १० वर्षांत १० टक्क्यांनी वाढले. या वायू प्रदूषणामुळे देशभर १ लाख ८ हजार सर्वाधिक अपमृत्यूची नोंद झाली. मुंबईसारखे महानगर सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून आता प्रदूषित शहरांच्या यादीत आले आहे. मुंबईसारख्या महानगराचा प्रदूषित शहरांच्या यादीत समावेश झाल्याने सततच्या वाढणार्या प्रदूषणामुळे अनेक आजारांना नकळत आमंत्रण मिळते. यामध्ये श्वसनाचे अनेक आजार, अस्थमा, फुप्फुसांचा कर्करोग आणि हृदयविकार अशा आजारांना सामोरे जावे लागते. वायू प्रदुषणापासून बचाव करण्यासाठी काही फायदेशीर ठरणारे उपाय …
काळी मिरी : वायु प्रदुषणामुळे सर्वात जास्त त्रास फुफ्फुसांना होतो. ज्यामुळे छातीत वेदना होतात. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी काळी मिरी फार फायदेशीर ठरते. काळ्या मिरीची पूड मधासोबत घेतली तर फुफ्फुसांमध्ये जमा झालेली घाण साफ होण्यास मदत होते. खोकला किंवा कफ झाला असेल तरीदेखील हा घरगुती उपाय फायदेशीर ठरतो.
लसूण : आयुर्वेदामध्ये लसूण एक अॅन्टी-बायोटिक समजलं जातं. थंडीमध्ये लसणाच्या पाकळ्या भाजून खाणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत होते.
आलं : वायू प्रदूषणामुळे लोकांना सतत सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. यापासून बचाव करण्यासाठी आलं मदत करतं. एक चमचा मधामध्ये आल्याचा रस मिक्स करून एक पेस्ट तयार करा. जास्त त्रास होत असेल तर दिवसातून 2 ते 3 वेळा याचं सेवन करा.
ओवा : प्रदुषणाच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी ओवा फायदेशीर ठरतो. सकाळी उठल्या उठल्या ओव्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात. त्याचप्रमाणे ओव्याच्या झाडाच्या पानांचाही आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं.
गूळ आणि मध : शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी गूळ आणि मध उपयोगी ठरतं. वायू प्रदुषणामुळे होणार्या आजारांशी लढण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम हे पदार्थ करतात.