मुंबई : पाण्याच्या टाकीची सफाई करणाऱ्या पाच मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील नागपाडा परिसरात असलेल्या बिस्मिल्ला स्पेस या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत ही घटना घडली आहे. सुरुवातीला हे कामगार काम करताना टाकीत बेशुद्ध पडले असल्याचे सांगण्यात आले. परंतु, त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केल्यानंतर यातील चार कामगारांचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी पाचही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. या घटनेमुळे नागपाडा परिसरात खळबळ उडाली आहे. आज रविवारी (ता. 9 मार्च) दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. (Mumbai News Five laborers die while cleaning water tank, creating stir in Nagpada)
मिळालेल्या माहितीनुसार, नागपाड्यात एका खासगी विकासकामार्फत इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. बिस्मिल्ला स्पेस असे या इमारतीचे नाव असून या इमारतीच्या पाण्याच्या टाकीमध्ये पाच मजूर हे सफाईकरिता उतरले होते. पण टाकी पहिल्यापासून उघडी ठेवली नसल्याने कामगार टाकीत साफसफाई करण्यास उतरले. पण यामुळे टाकीतील गॅस बाहेर पडला नसल्याने पाचही मजुरांना पाण्याच्या टाकीमध्ये अस्वस्थ वाटू लागले. हे कामगार तिथेच बेशुद्ध पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर याबाबतची माहिती मिळताच या पाचही मुजरांना अग्निशमन दलाच्या मदतीने जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी या पाचही रुग्णांना तपासून त्यांना मृत घोषित केले. हे पाचही कामगार कंत्राटी होते, अशी माहिती समोर आली आहे, या घटनेमुळे नागपाडा परिसरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या खासगी बांधकाम व्यावसायिकाअंतर्गत सुरू असलेल्या इमारतीत ही घटना घडली आहे, तिथे काम करणाऱ्या अन्य लोकांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिल्याचेही सांगण्यात येत आहे. तर या मजुरांची अद्यापही ओळख पटलेली नाही. त्यामुळे या मजुरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.