मुंबई : मार्च, एप्रिल महिन्यात सुरू होणारी गरमी आता फेब्रुवारी महिन्यातच जाणवू लागली आहे. कारण, गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये तापमान 37 अंश सेल्सियसपर्यंत नोंदविले गेले आहे. तसेच, कोकणातही तापमान हे 40 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेची लाट जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनारपट्टी परिसरातील तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे मुंबईतील तापमान 35 अंश सेल्सिअसपासून 40 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. (Mumbai Weather heatwave in state in february itself what is the IMDs forecast)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पूर्वेकडून जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीतील तापमानात वाढ झाली आहे. पण येत्या गुरुवारपासून तापमानात घट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक हवामान विभागानेही मुंबई तसेच कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच उष्णतेची लाट असताना विशिष्ट काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात मुंबईमधील तापमानात अचानक वाढ झाली. साधारणपणे मार्च महिन्यात मुंबई तसेच आसपासच्या परिसरात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. पण, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच उष्णता वाढल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
याआधी मुंबईत 19 फेब्रुवारी 2017ला 38.8 अंश सेल्सियस, 23 फेब्रुवारी 2015 रोजी 38.8 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर आता पुन्हा मंगळवार, 25 फेब्रुवारी 2025 रोजी 38.7 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईतील फेब्रुवारीमधील विक्रमी तापमानाची नोंद 25 फेब्रुवारी 1966 रोजी झाली होती. तेव्हा कमाल तापमान 39.6 अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले होते. उष्णतेची लाट जेव्हा एखाद्या मैदानी प्रदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सियस किंवा त्याहून अधिक, किनारपट्टी भागांत 37 अंश सेल्सियस किंवा त्याहून अधिक तसेच डोंगराळ भागांत 30 अंश किंवा त्याहून अधिक असल्यास उष्णतेची लाट आल्याचे घोषित केले जाते. एखाद्या ठिकाणी सरासरी कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान सलग तीन दिवस 3 अंश सेल्सियसने जास्त असल्यास उष्णतेची लाट जाहीर करण्यात येते.