मुंबई : अंधेरी येथे मुंबई मेट्रो रेल्वे कामासाठी ड्रिलिंगचे काम सुरु असताना 1800 मिमी व्यासाची जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली होती. काही विभागातील नागरिकांचा तीन दिवस पाणीपुरवठा बंद होऊन त्यांचे पाण्याअभावी खूप हाल झाले. मात्र पालिका आता मेट्रो रेल्वेच्या संबंधित कंत्राटदाराकडून 1 कोटी 34 लाख रुपयांची नुकसान भरपाई वसूल करणार आहे. सदर रकमेमधून पाणीबाणीचा फटका बसलेल्या नागरिकांनाही काही प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे माजी नगरसेवक पंकज यादव यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे केली आहे. (Andheri Aqueduct Burst Compensation from contractor to citizens too Demand of Bjp former corporator Pankaj Yadav)
हेही वाचा – Nawab Malik : देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राचा अभ्यास करणं गरजेचं; जयंत पाटील यांचा टोला
अंधेरी (पूर्व) येथे सीप्झ गेट क्रमांक 3 जवळ 30 नोव्हेंबर रोजी ड्रिलिंग काम सुरु असताना, वेरावली सेवा जलाशयाच्या 1800 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली व तिला मोठे भगदाड पडले. त्यामधून लाखो लिटर पाणी वाया गेले. या मुख्य जलवाहिनीला वरूनच नव्हे तर आजूबाजूने आणि एकापेक्षा जास्त ठिकाणी छिद्र होऊन गळती लागली. परिणामी घाटकोपर, वांद्रे, अंधेरी, सांताक्रूझ, वाकोला, मरोळ, खार आदी भागातील पाणीपुरवठा तीन दिवस बंद करण्यात आला होता. त्यामुळे सदर विभागातील नागरिकांना तीव्र स्वरूपाच्या पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले.
पिण्याचे पाणी महागड्या दराने खरेदी करावे लागले. पाण्यासाठी वणवण भटकावे लागले. टॅंकरच्या पाण्यासाठी गर्दीत उभे राहून व दूर अंतरावरून पाणी घरापर्यंत आणण्यासाठी खूपच अंगमेहनत करावी लागली, पायपीट झाली. पाण्यासाठी खूपच हाल सहन करावे लागले. कष्ट घ्यावे लागले. त्यामुळे सदर नागरिकांना शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला. आता महापालिकेने जरी जलवाहिनी दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू केला असला तरी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखीन दोन दिवसांचा कालावधी गेला.
हेही वाचा – Fadnavis Letter Bomb : फडणवीसांचे पत्र म्हणजे महायुतीमध्ये वादाची सुरुवात नाही तर…; वडेट्टीवारांचा दावा
पालिकेने जलवाहिनी फोडणे, पाणी वाया जाणे, दुरुस्ती खर्च आणि दंड रक्कम वसूल करण्यासाठी सदर कंत्राटदाराला नोटीस बजावून 1 कोटी 34 लाख रुपयांची रक्कम नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. मात्र पालिकेने सदर संपूर्ण रक्कम आपल्या तिजोरीत न जमा करता, त्यापैकी काही ठराविक रक्कम ज्या नागरिकांना पाणी पुरवठा बंदीचा फटका बसला आहे, त्यांनाही नुकसान भरपाईपोटी द्यावी, अशी मागणी भाजपाचे माजी नगरसेवक पंकज यादव यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे केली आहे.