मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला फेब्रुवारीनंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यावर, वॉलेटवर ठेवी स्वीकारण्यास किंवा फास्टॅगमध्ये टॉप अप करण्यास बंदी घातल्यानंतर पेटीएमच्या स्टॉकमध्ये गेल्या तीन सेशन्सपासून घसरण होताना दिसत आहे. आजही बाजार उघडताच पेटीएमचे शेअर्स 10 टक्क्यांनी घसरले आणि लोअर सर्किटवर पोहोचले आहेत. पेटीएम शेअर्समध्ये सातत्याने लोअर सर्किट होत आहे. पेटीएमचे शेअर्स आजही घसरून 438.50 रुपयांवर उघडले आहेत. त्यामुळे शेअर्स विकण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये शर्यत सुरू आहे. (Paytm Stocks Paytm shares fall 10 percent after RBI restrictions A big hit for investors)
हेही वाचा – Uddhav Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत लावण्याने उद्धव ठाकरे संतापले; सुनावले खडेबोल
बँकिंग कायदा, 1949 च्या कलम 35A अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करून रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत, आता पेटीएम बँक लिमिटेडकडून कोणत्याही ग्राहकाच्या खाते, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट, वॉलेट, फास्टॅग, एनसीएमसी कार्ड इत्यादींमध्ये ठेव किंवा क्रेडिट व्यवहार किंवा टॉप अप करण्याची परवानगी दिली जाणार नाही. मात्र आरबीआयच्या या निर्णयाचा परिणाम पेटीएमच्या शेअरवर दिसून येत आहे.
5 दिवसांत 40 टक्क्यांहून अधिकने घसरण
पेटीएमचे शेअर्स गेल्या 5 दिवसात 42.35 टक्क्यांनी घसरले आहेत. हा शेअर पाच दिवसांपूर्वी 760.65 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. मात्र आता तो 440 रुपयांच्या खाली आला आहे. एवढेच नाही तर पेटीएमच्या शेअरमध्ये झालेली घसरण थांबण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी बुधवारी पेटीएम शेअर्समध्ये मंदी होती. व्यवहाराच्या शेवटी शेअरचा भाव किरकोळ घसरून 761 रुपयांवर होता आणि व्यवहारादरम्यान शेअरने 774 रुपयांची उच्च पातळी गाठली होती. मात्र आता शेअर्समध्ये सातत्याने घसरन होताना दिसत आहे.
व्यापारी वर्गात चिंता
आरबीआयकडून पेटीएमवर लावण्यात आलेल्या निर्बंधांनंतर सीएआयटीकडूनही पेटीएम न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेटीएमऐवजी दुसऱ्या ॲपचा वापर करण्याचा सल्ला कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने व्यापारी वर्गाला दिला आहे. तसेच देशाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांसोबत व्यवहार न करता इतर कोणत्याही ॲपचा विचार व्हावा, आरबीआयकडून केलेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी दिली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे.