भाईंदर : मिरा- भाईंदर शहरात आणि राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात डंपरद्वारे धोकादायक डेब्रिज वाहतूक केली जात आहे. डंपरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त माती, दगड, डेब्रिज भरून रस्त्याने वाहतूक केली जात आहे. डंपरमधून दगड खाली पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे महापालिका आणि पोलीस दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मिरा- भाईंदर शहरात सीआरझेड, खाडी क्षेत्रात रस्त्याच्या बाजूला अवैधरित्या माती भराव केला जात आहे. मिरारोड पश्चिमेला तर दररोज हजारो गाड्या अवैध रित्या डेब्रिज टाकून भराव केला जात आहे. मुंबईतून डंपर वाहतूक करून दहिसर चेकनाक्यावरून मिरा- भाईंदर व वरसावे, घोडबंदर या परिसरात खाली केले जात आहेत. ( Debris Transportation: Possibility of accident due to dangerous debris transportation by dumper)
तसेच राष्ट्रीय महामार्गावरून पुढे गाड्या पूर्ण भरुन धोकादायकरित्या दगड,माती वाहतूक केली जात आहे. ओव्हरलोडेड डंपरमुळे वाहन चालकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या डंपरमधून माती, खडी रस्त्यावर पडून अपघात घडत आहेत. तसेच माती हवेत उडून प्रदुषण वाढत आहे. याकडे महापालिका आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे,अशा तक्रारी आहेत. वाहतूक पोलीस विभागाकडून नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करून दंड आकारला जात असल्याचा दावा केला जात असला तरी, रस्त्यांवर ओव्हरलोडेड ट्रक आणि डंपर बिनधास्तपणे अवैध वाहतूक करत असल्याचे दिसत आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेस धोका निर्माण झाला आहे.
भाईंदर पश्चिमेला आणि राष्ट्रीय महामार्गावर मातीच्या ढिगार्याने भरलेला डंपर आणि त्याच्या वर एक मोठा दगड धोकादायकपणे लटकलेला दिसून आला. डंपरजवळ गाडी चालवताना मागून येणार्या कार चालकाच्या गाडीवर दगड पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असुरक्षित भारांमुळे उडणारे कचर्याचे ढिगारे अनेकदा वाहनचालक आणि पादचार्यांसाठी जीवघेणे ठरत आहेत. याविषयी अनेक तक्रारी केल्या तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. धोकादायकरित्या वाहतूक करणार्या वाहनावर कारवाई करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणार्या डंपरवर कारवाई करण्याची मागणी गो ग्रीन फाउंडेशन ट्रस्ट आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.