वसई: मुंबई- दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील खानिवडे, खराटतारा येथे झालेल्या भीषण अपघातात कंटेनर वाहू मोठा ट्रक कठड्याचा वरचा भाग तोडून थेट नदी पात्रात कोसळला. तानसा नदी पात्राच्या दोन पुलांमध्ये सुमारे २५ ते ३० फूट खोल खाली कोसळलेल्या ट्रकची केबीन पात्रातील चिखलात रुतली. तर उर्वरित ट्रकचे अनेक भाग चेंदामेंदा झाले. रविवारी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. या अपघातात चालक ठार झाला असून त्याचा सहाय्यक गंभीर जखमी झाल्याचे समजले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनरसारखी अवजड वाहतूक करणारा ट्रक हा मुंबईकडून गुजरातच्या दिशेकडे भरधाव वेगाने जात होता. ( Mumbai-Ahmadabad Highway: Truck falls into river, driver dies )
याचदरम्यान तानसा नदीच्या पात्रावर असलेल्या सेवा रस्ता आणि मुख्य रस्ता अशा दोन पुलांच्या जवळ रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान आला असताना वाहनावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि दोन पुलांच्या मधल्या दरीत ट्रक कोसळला.या दोन पुलांच्या मध्ये कोसळून आतापर्यंत अनेक अपघात घडले असल्याने रस्ते व्यवस्थापनेकडून दोन पुलांच्या सुरूवातीच्या मधल्या भागात सुरक्षा म्हणून सिमेंट काँक्रीटच्या मोठ्या ठोकळ्यांचे अडसर ठेवले आहेत. त्यांच्यावरून सेवा रस्त्याच्या पुलाच्या कठड्याला घासून हा ट्रक खाली कोसळला. अपघाताचा झालेला आवाज ऐकून गावातील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. मात्र भर नदी पात्रातील पुलांखाली असलेल्या अंधारात त्यांना मदत करण्यास अडथळे येत होते. दरम्यान घटनेची मिळताच पोहचलेल्या मांडवी पोलिसांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले. मात्र, यावेळी असलेला अंधार आणि सुरू झालेली खाडीची भरती याचा सामना करत प्रथम जखमी सहाय्यकाला दवाखाण्यात पोहोचवले.व मृत चालकाचा पंचनामा सुरू केला.जर मदत कार्याला १५ -२० मिनिटे उशिर झाला असता तर खाडीला आलेल्या भरतीमुळे मदत कार्यात मोठा अडसर निर्माण झाला असता. तर जेथे अपघात घडला ती जागा अपघाती असून येथून जाणार्या वाहन चालकांना दोन रस्त्यांच्या मध्ये रात्री संभ्रम निर्माण होत असावा, म्हणून इथेच जास्त अपघात घडतात. यामुळे येथे कायम स्वरूपी योग्य उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे स्थानिक मदत करणार्या रहिवाशांनी सांगितले.