Homeमहामुंबईपालघरपालघर शिकार : तब्बल आठ दिवसांनंतर गुपित बाहेर पडले

पालघर शिकार : तब्बल आठ दिवसांनंतर गुपित बाहेर पडले

Subscribe

यामुळे पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गावठी कट्ट्यांचा वापर वनप्राण्यांच्या शिकारीसाठी होत असल्याचे उघड झाले आहे.

पालघर : पालघर तालुक्यातील शिकार्‍यांना रात्रीची शिकार करणे चांगलेच महागात पडले आहे. तालुक्यातील काही शिकारी समूहाने रानडुकराची शिकार करण्यासाठी जंगलात गेले होते.परंतु, प्राणी समजून एका सहकार्‍याकडून गोळी झाडली गेल्याने दोन सहकार्‍यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेला तब्बल आठ दिवस झाल्यानंतर ही माहिती गुपित ठेवण्यात या सहकार्‍यांना यश आले होते. चुकून गोळी झाडून मृत पावलेल्या दोघांपैकी एकावर शिगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून दुसर्‍या इसमाचा जंगलात गाडून ठेवलेला मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे. यामुळे पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गावठी कट्ट्यांचा वापर वनप्राण्यांच्या शिकारीसाठी होत असल्याचे उघड झाले आहे.

पालघर तालुक्यातील बोरशेती, किराट, रावते व आकोली या गावातील सुमारे १०-१५ हौशी शिकारी २८ जानेवारी रोजी बोरशेतीच्या जंगलात रानडुकरांच्या शिकारीसाठी गेले होते. त्यानुसार प्रत्येकाने आपापल्या सहभाग भ्रमणध्वनी वरून निश्चित करून शिकारीनंतर जंगलातच जेवण करण्याचे ठरल्याने मीठ, मसाला, तेल व भांडीकुंडी घेऊन शिकारी मंडळी रात्री मोहिमेवर निघाले होते. बोरशेरीच्या जंगलात अलन डोंगराच्या पायथ्याशी आंब्याचे पाणी या ठिकाणी पट्टेदारी वाघ व २०० किलो वजनापेक्षा मोठ्या वजनाची रानडुक्करे पाणी पिण्यासाठी येत असल्याचे माहित शिकार्‍याना असल्याने, काही कट्टाधारी शिकारी डोंगराच्या कड्यावर तर काही बंदूकदारी जंगलातील झाडांवर बसून होते. या दरम्यान समूहातील काही सदस्य विलंबाने ठिकाणाजवळ येऊ लागले होते. मात्र त्यांनी आपल्याकडील मोबाईलचा टॉर्च अथवा बॅटरी सुरू केली नव्हती व आवाज येऊ नये म्हणून त्यांनी फोन करण्याचे टाळले. अमावास्येची रात्र असल्याने जंगलात काळोख होता.

मध्यरात्रीच्या सुमारास शिकार्‍यांना कसली तरी चाहूल लागल्याने डोंगराच्या कडावर बसलेल्या एका बंदूक धार्‍याने जनावर आल्याचे समजून गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. या गोळीबारात रमेश जन्या वरठा (६०, बोरशेती) याचा जागीच मृत्यू झाला तर ही गोळी त्याला लागून अन्य महालोडा नामक अन्य एका सहकार्‍याच्या पायाला लागली. भयभीत झालेल्या या स्थानिक शिकार्‍यांनी रमेश वरठा याला जंगलात गाडून ठेवले. त्यांच्यापैकी अन्य चार जणांनी शिगाव पाटीलपाडा येथे राहणार्‍या महालोडा नामक शिकार्‍याला त्याच्या घरी नेले. महालोडा यांच्या पायामधून रक्तस्त्राव सुरू राहिला मात्र घटनेबाबत गुपित राखण्यासाठी त्याला औषधउपचारासाठी दवाखान्यात वा रुग्णालयात नेले नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामध्ये त्याचा ३१ जानेवारी रोजी मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. मृत्यू पश्चात त्याच्यावर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेबाबत मनोर पोलीस स्टेशनमध्ये काल (ता ४) स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. रमेश वरठा याचा मृतदेह ताब्यात मिळाला असून या प्रकरणात पोलीस तपास करीत आहेत. विशेष म्हणजे या घटनेला घडून आठवडा उलटल्यानंतर देखील याबाबतची माहिती पोलीस अथवा स्थानिकांमधून गुप्त ठेवण्यात या शिकारी टोळीला यश आले होते. या प्रकरणात मनोर पोलिसांनी आठ लोकांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.


Edited By Roshan Chinchwalkar