वसईः वाढवणपाठोपाठ पालघर तालुक्यातील मुरबे येथे आणखी एक बंदर उभारण्याची घोषणा करण्यात आल्याने पालघर आणि डहाणू तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या बंदरांना विरोध करण्यासाठी डहाणूत लहानग्यांनी महायुती सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. त्यानंतर आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्यांचे दहन केले. विविध मार्गांनी आंदोलन करून वाढवण बंदराला विरोध केला जात आहे. मात्र, याविरोधाला न जुमानता केंद्र सरकारने बंदराचे भूमीपूजन केले जाणार असल्याचे जाहिर केल्याने बंदरविरोधक आक्रमक झाले आहेत. त्यातच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने पालघर जिल्ह्यातील मुरबे खाडीत आणखी एक बंदर उभारण्यात येणार असल्याचे जाहिर केले आहे.
या बंदरात डर्टी कार्गोमधून पर्यावरण आणि समुद्री जैवविविधतेला घातक माल उतरवण्यात येणार असल्याची भिती मच्छीमार समाजात पसरली आहे. वाढवणपाठोपाठच मुरबेतील बंदर तयार झाल्यास डहाणू आणि पालघर तालुक्यातील पिढीजात मासेमारी व्यवसाय धोक्यात येण्याच्या भितीने मच्छीमार समाज अस्वस्थ झाला आहे. सरकारच्या या धोरणांचा विरोध करण्यासाठी डहाणू तालुक्यातील धाकटी डहाणू गावातील मच्छीमारांच्या मुलांनी महायुती सरकारची प्रेतयात्रा काढली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. हा लढा अधिक आक्रमक केला जाईल, असा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे युवा जिल्हाध्यक्ष अनुद विंदे यांनी दिला आहे.